Sunday 19 November 2017

ही धडपड शिक्षण थांबू नये म्हणून!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
ठाण्यातील शहापूरच्या देसलेपाडा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एकही विद्यार्थी शाळाबाह्य नाही आणि आदिवासी, कामगार वर्गातील मुले असूनही विद्यार्थी शाळेला नियमित येतात, हे या शाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. पण शाळेच्या या परंपरेत 2016-2017 च्या शैक्षणिक वर्षात मात्र खंड पडला. शाळेत पाचवीत शिकणारा विद्यार्थी गणेश धानके दिवाळीनंतर शाळेत आलाच नाही. खरंतर या शाळेत कोणताच विद्यार्थी न सांगता शाळेला दांडी मारत नाही. मात्र गणेशच्या कुटुंबाकडून कसलाच निरोपही न आल्याने त्याच्या वर्गशिक्षिका मंगल डोईफोडे अस्वस्थ झाल्या. डोईफोडे मॅडमनी गणेशच्या वर्गमित्रांकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र गणेश लांबच्या कादबाव पाड्यावरुन येत असल्याने नेमकी माहिती मिळेना. गणेशचे आई- वडील वीटभट्टी कामगार आहेत, ते त्याला दुसऱ्या गावी तर घेऊन गेले नसतील ना? अशी चिंता शिक्षिकांना वाटू लागली. त्यानुसार गावात चौकशी केली असता समजलं, की धानके कुटुंब खारबाव पाड्यावर वीटभट्टीच्या कामासाठी स्थलांतरित झालं आहे.
गणेश दुसऱ्या गावी गेलाय खरा, पण त्याचं शिक्षण चालू असेल का? हे पाहण्यासाठी त्याला खारबावला जाऊन भेटायचं असं त्यांनी ठरवलं. शिक्षिकांनी धानके कुटुंबाला खारबावला सोडणाऱ्या जीपचालकाला शोधून काढलं आणि गणेशकडे घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र 75 किमी अंतरावरील खारबावला जाण्यासाठी जीपचालक अडीच हजार रुपये मागू लागला. भाड्याची ही रक्कम दोन्ही मॅडमच्या आवाक्याबाहेरची होती. शेवटी कशीबशी त्याची समजूत घालत तो दीडहजार रुपयांवर तयार झाला.
शेवटी एका दिवशी शाळा सुटल्यावर दोघी शिक्षिका प्रचंड खड्डे आणि धुळीने भरलेल्या रस्त्यावरून खारबावला पोहोचल्या. त्यांनी गाडी थेट वीटभट्टीकडे घ्यायला लावली. जीपचा आवाज ऐकताच वीटभट्टीजवळच्या झोपडीतून एक बाई कोण आलंय, ते पाहायला आली. ती होती गणेशची आई. तिनं शिक्षिकांना ओळखलं आणि हाका मारून झोपडीत बोलावलं.
मॅडमना पाणी देऊन गणेशच्या आई वडिलांनी इकडे कशा काय आलात, असं विचारलं. “आम्ही गणेशचीच चौकशी करण्यासाठी आलो आहोत. आहे कुठे गणेश? आणि तुम्ही काहीच न कळवता कसं काय खारबावला आलात?” अशी चौकशी डोईफोडे मॅडमनी केली. मॅडमना उत्तर देण्याआधी, गणा…अशी जोरदार हाक वडिलांनी मारली आणि मातीत खेळणारा गणेश हजर झाला. ” बाई, तुम्ही इकडं आलात?” दोन्ही मॅडमकडे पाहून गणेश खूपच खुष झाला.
गणेशच्या वडिलांनी उत्तर दिलं, “बाई, आमचं जिणं हे असं हातावरचं. कादबावमधलं काम संपलं बगा. मग कान्ट्रॅक्टर म्हन्तू तिकडं जावं लागतं, नवं वीटभट्टीचं काम इकडं खारबावला लागलं. पोटासाठी पोराबाळांना घेऊन इकडं यावं लागलं बगा. पन इतंबी गणाला साळंत घातलंया, काळजी करू नगा. तुमाला कळवायचं तेवढं राहूनच गेलं बगा, निगताना.” गणेशनेही पुस्ती जोडली. “बाई मी आता खारबावच्या जिल्हा परिषद शाळेत जातोय, पर आपल्या शाळेची खूप आठवण येते बघा.”
आपल्या विद्यार्थ्याने गाव सोडले असले तरी शिक्षण सोडले नाही, याचा शिक्षिकांना आनंद झाला. “गणेशला खूप- खूप शिकवा, त्याचे शिक्षण मधेच थांबवू नका. दुसऱ्या गावात जायची वेळ आली तर प्रसंगी ‘शिक्षण हमी कार्ड’ घ्या” असा सल्लाही त्यांनी गणेशच्या पालकांना दिला. 

 - स्नेहल बनसोडे- शेलुडकर

No comments:

Post a Comment