नवी उमेद Navi Umed

‘संपर्क’ ही लोकसमस्यांचं निवारण व्हावं यासाठी धोरणकर्त्यांकडे पाठपुरावा करणारी संस्था आहे. संपर्कने सुरू केलेला हा ब्लॉग. समस्यानिवारणासाठी आपल्या भोवताली सुरू असलेल्या उमेद वाढवणार्‍या प्रयत्नांची नोंद ठेवणारा. हा मजकूर शेअर करून इतरांचीही उमेद वाढवा. तसंच उमेद वाढवणारा मजकूर पाठवून या ब्लॉगसाठी योगदानही करू शकता.

Friday, 29 December 2017

सफर- नाशिकमधील 'प्रगत' निफाड बीटची

2016 साली निफाड प्रगत बीट असल्याचे जाहीर झाले. ‘प्रगत बीट’ म्हणजे काय तर शाळेत ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण दिले जावे, त्यासाठी किमान 20 प्रकारचे साहित्य शिक्षकांनी बनविलेले असावे, हे निकष 100 टक्के पूर्ण करणाऱ्या शाळेला 'प्रगत शाळे'चा दर्जा दिला जातो. आणि 100 टक्के प्रगत शाळा असणारे बीट हे 'प्रगत बीट' म्हणून घोषित करण्यात येते. सातारा जिल्ह्यातले कुमठे हे पहिले प्रगत बीट. त्यापाठोपाठ चंद्रपूरचे ताडाळी बीट, सांगलीचे मिरज बीट, नाशिकचे निफाड बीट असे अनेक बीट प्रगत झाले.निफाड बीटमधील चांदोरीजवळच्या नागापूरच्या जिल्हा परिषद शाळेत गणित आणि मराठीचे ज्ञानरचनावादी खेळ आम्हांला पाहायला मिळाले. यातील 'गणिती संगीत खुर्ची'चा खेळ मनोरंजक आणि खेळता- खेळता गणित शिकविणारा आहे. यात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात कागदावर लिहिलेले काही आकडे देतात. संगीत खुर्चीत शाळेचा बॅन्ड वाजू लागला की विद्यार्थी खेळू लागतात.
ज्या विद्यार्थ्याला खुर्ची मिळत नाही त्याने इतर विद्यार्थ्यांच्या हातात असलेल्या आकड्यांची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार करून दाखवायचा. इयत्तेनुसार आकड्यांची आणि गणिती क्रियांची काठिण्य पातळी ठरते. काही वेळेला दोन इयत्ता मिळूनही हा खेळ खेळतात आणि प्रेक्षक बनलेले विद्यार्थी गणितं सोडवितात.
याच शाळेतील वैशाली तेलोरे मॅडम यांनी भाषेचे देखील अनेक साधे सोपे खेळ बनविले आहेत. त्यांनी अ ते ज्ञ ही मुळाक्षरे, काना, मात्रा, वेलांटी, उकार ही अकारविल्हे आणि अंकांसाठी त्यांनी चक्क सांकेतिक भाषा बनविली आहे. वर्गात गेल्यानंतर आपले नाव फक्त मॅडमच्या कानात सांगायचे. त्यानंतर तेलोरे मॅडमनी केलेल्या हावभावानुसार विद्यार्थी ते नाव ओळखतात. त्याचप्रमाणे कुठलाही शब्द आणि कुठलीही पाच अंकी संख्यासुद्धा तिसरी- चौथीचे विद्यार्थी ओळखतात. हे करण्यासाठी मॅडम काय हातवारे करीत आहेत, याकडे मुलांना लक्ष द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढली आहे, असे तेलोरे मॅडम सांगतात.
शिवाय पहिली -दुसरीच्या विद्यार्थ्यांना लेखन- वाचनाची सवय व्हावी याकरिता रंगीत साबुदाणे, लग्नातील अक्षतांचे तांदूळ कागदावर चिकटवून विद्यार्थ्यांची नावे लिहून घेतात. वाचनासाठी माशाच्या आकारात कापलेल्या कार्डबोर्ड पेपरवर जोडशब्द लिहिलेले आहेत. प्रत्येक शब्दापाठीमागे धार नसलेल्या ब्लेडचा अर्धा तुकडा जोडलेला आहे. वर्गातील लोहचुंबक लावलेल्या दोऱ्याच्या साहाय्याने विद्यार्थी ते शब्दरुपी मासे उचलतात आणि अवघड शब्दांचे वाचन करतात. कार्डबोर्ड पेपरवर विखुरलेले शब्द वाचून म्हणी तयार करणे, असे अनेक खेळ या शाळेत पाहायला मिळाले. 

 - स्नेहल बनसोडे- शेलुडकर.
Posted by Navi Umed at 23:15 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Nashik

कुरुंजीतलं गमभन



कुरुंजीबद्दलच्या माझ्या अनुभवांची ही शेवटची पोस्ट. खरं तर मी एवढ्या चिकाटीनं लिहीन असं वाटलं नव्हतं. पण नवी उमेदमुळे हे शक्य झालं. आणि अशा सुसंगत लिहिण्यामुळं मलाच काही गोष्टी स्पष्ट दिसायला लागल्या. वाचणाऱ्या लोकांच्या प्रतिसादामुळं हुरूपही वाढला.
कुरुंजीला जायला लागून दोन वर्षं होऊन गेली. प्रत्येक आठवड्याला गेलेच, असं नाही.

आजारपणं, अती पाऊस, अती थंडी, घरातली कामं, कार्यक्रम अश्या कारणांमुळं अनियमितता आहे. पण जाण्याची ओढ असतेच. मुलांना मिस करते. मुलांची चांगली सवय झाली आहे. त्यांना पण माझी. तुम्ही शंभर दिवस जाऊ नका असं गौरव नेहमी सांगत असतो. मी घराचं दार उघडलं की एकेक जण यायला लागतो / लागते. सांगायला लागत नाही. माझ्या केसात हात फिरवत असे कसे तुमचे केस असं म्हणण्या इतपत लहान मुली जवळ आल्या आहेत. थोड्या मोठ्या मुला मुलींना शाळेत कॉलेजात घडलं ते सांगायचं असतं. मुलांसाठी माझं घर हक्काचं ठिकाण बनलंय.
भारतात असलेल्या अनेक बारीक खेड्यांसारखंच कुरुंजी हे एक खेडं. ना वाहनांची चांगली सोय ना आरोग्याची, ना भरपूर उत्पन्नाची शेती, ना जवळपास उपलब्ध रोजगार ! घरटी एक माणूस पैसे कमवण्यासाठी पुण्यात किंवा मुंबईत !
मुलं लहानपणापासूनच प्रत्यक्ष आयुष्यालाच भिडत असल्यामुळं एक प्रकारची हुशारी, चुणचुणीतपणा आहे, हातानं काम करायची सवय आहे. दुर्दैवानं या मुलांना शहरातल्या मुलांसारख्या अभ्यासाच्या सोयी नाहीत. आईवडिलांना पोट भरण्यामागे पळापळ करावी लागते, त्यामुळं मुलांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. शहरापासून एकदम लांब असलेल्या शाळांचे जे प्रश्न असतात ते इथल्या शाळेचे पण आहेत. गाव इतकं लांब की एक दोन तासासाठी कुणी येणार असेल तरी अख्खा दिवस काढावा लागतो.
                                                                      अशा वेळी, गावात मुलांसाठी एक जागा असावी जिथं मुलं एकमेकांसोबत शिकतील. सुतारकाम, शिवणकाम, वेतकाम अश्या त्यांना माहीत असलेल्या गोष्टींच्या वर्कशॉपपासून सुरुवात करता येईल. त्यात इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर यासारख्या गोष्टी आणता येतील. मुलांना कॉम्प्युटरचं आकर्षण आहेच आणि त्यांना ते येणं गरजेचं आहे. कॉम्प्युटर शिकण्यासाठी कन्टेन्ट म्हणून त्यांचे या कामातले अनुभव वापरता येतील.

त्यातून खूप गोष्टी साध्य होतील. मुलं या वर्कशॉप मधून स्वतः झालेलं आकलन शब्दात मांडतील, त्या कामाचे फोटो काढून तेही कॉम्प्युटर मध्ये अपलोड करतील. अशी वेगवेगळी माध्यमं वापरायची सवय त्यांना होत राहील. आता जी त्यांचं जगणं आणि त्यांचं शिक्षण यात तफावत आहे ती यामुळं कमी होईल. मुलं वेगवेगळी स्किल्स शिकतील. यातून कुणाचे करियर उभे राहू शकेल.
सोबत मुलांना शालेय परीक्षा पास होण्यासाठी लागेल ती मदत करायची आहे. या बरोबरच आपल्या गावाचा इतिहास समजावून घेणं, पूर्वापार होत आलेला औषधी वनस्पतींचा आणि घरगुती औषधांचा वापर पुन्हा समजावून घेणं अश्या अनेक गोष्टी मुलांसोबत करायच्या आहेत. मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी / गावी नेऊन काही चांगल्या गोष्टी दाखवायच्या आहेत. गावात दहावीच्या आधी - नंतर शाळा सोडलेल्या मुली आहेत. त्यांना या कामात जोडून घ्यायचे आहे.
एक गोष्ट पहिल्यापासून ठरवली आहे. या कामात जागा खरेदी करणं, इमारती बांधणं अशा गोष्टीत गुंतायचं नाही. गावात गरज असेल त्या प्रमाणात काम असावं. गावातल्या मुलामुलींनी ते चालू ठेवावं. आजूबाजूच्या गावातली मुलं पण येऊ शकतील.
सुतारकाम तर सुरू केलं आहे. मुलांना कॅमेरा हाताळायला पण शिकवलंय. लवकरच शिलाई मशीन नेईन. आपल्या सविता दामले या मैत्रीणीनं त्यासाठी पैसे दिलेत. यासाठी गावातल्या मोठ्या मंडळींची साथ लागेलच. त्यांच्याशी संवाद वाढवायचा आहे. शहरी बाई, त्यात पुन्हा केस कापलेली, बांगडया कुंकू न बाळगणारी बाई बघून त्यांना बिचकायला होत असावं. आपल्या खेड्यातल्या लोकांबद्दल समजुती असतात तश्या त्यांच्याही शहरातल्या लोकांबद्दल असतात. त्यामुळं ही दरी भरून काढायची आहे.
या कामासाठी साधनांची गरज आहेच. सध्या मी माझ्या कुटुंबातलेच पैसे खर्च करते. पण ते पुरेसे नाहीत. या केंद्रात काम करणाऱ्या मुलांना काही मानधन द्यावेसं वाटतं. वस्तूखरेदी आहे, चांगले कॉम्प्युटर लागतील.
आम्ही Existential Knowledge Foundation ही संस्था स्थापन केली आहे. यात पालक, शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतो, natural learning या विषयावर संशोधन सुरू आहे. कुरुंजीचं कामही या संस्थेचा भाग आहे. आम्ही सभासद वेगवेगळ्या पातळीवर काम करतो. कुरुंजीचं काम मी सुरू केल्यामुळं ही पूर्णपणे माझी जबाबदारी आहे.
या कामासाठी मदतीची गरज आहे. बिचाऱ्या गरीब मुलांना मदत असा विचार न करता साधनं सगळ्यांसाठी असतात. ती या मुलांपर्यंत पण पोचवूया अशा विचारानं मदत आली तर ते जास्त आवडेल!
  : रंजना बाजी
Posted by Navi Umed at 23:03 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Kurunji

Tuesday, 26 December 2017

आपल्या बाळांच्या डोळ्यांची इडापिडा टळो


“आमच्याकडे आणेपर्यंत बाळ ३-४ महिन्याचं झालं होतं. बाळाला डोळ्यात Retinopathy of prematurity (ROP) हा विकार उद्भवला होता. प्रोब्लेम चौथ्या स्टेजला पोचला होता. म्हणजे रेटीना जवळजवळ सुटा झाल्यात जमा असतो, आंधळेपणच आलेलं असतं. डॉक्टर प्रीतमनी बाळाच्या डोळ्यांचं ऑपेरेशन केलं. पण एक डोळा ते वाचवू शकले नाहीत. नॉर्मल दृष्टी घेऊन जन्माला आलेल्या बाळांना, योग्य त्या चाचण्या वेळीच केल्या गेल्या नाहीत तर उपचार होत नाहीत. आणि पुढे आयुष्यभरासाठी एक किंवा दोन्ही डोळे गमवायला लागतात.” अर्भकांना होणार्‍या डोळ्यांच्या विकाराविषयी डॉ. हेमालिनी सामंत सांगत होत्या. डॉ. प्रीतम आणि डॉ हेमालिनी सामंत दोघेही आठवड्यातून २-३ दिवस जेजे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची विनामूल्य तपासणी करतात.


कोणत्या बाळांना डोळ्याच्या विकाराचा धोका असतो?
डॉ हेमालिनी सांगतात, “कृत्रीम गर्भधारणा तंत्राचा वापर करून जन्मलेल्या, अथवा अपूर्ण वेळेत जन्मलेल्या बाळांना या डोळ्यांच्या विकारांचा धोका असतो. गर्भवती स्त्रीने गर्भारपणात ड्रग्स घेतले असल्यास किंवा तिला ताप आल्यास, काही इन्फेक्शन झाल्यास किंवा ती एचआयव्ही पोझिटिव्ह असेल तरी. यासाठी गर्भारपणात अल्ट्रासाऊंड आणि टोर्च टायटर या चाचण्या करून गर्भाच्या निरोगी वाढीची खात्री करून घेणं आवश्यक असतं. काही समाजात एकाच कुटुंबात विवाह केले जातात. अशा कुटुंबात जन्मणार्‍या बाळांना आनुवंशिक आणि अन्य दोषांबरोबरच डोळ्यांचे दोष असण्याची शक्यता फार जास्त असते. काही वेळा अल्ट्रासाऊंड आणि टोर्च टायटर करूनही काही दोष जन्मापूर्वी समजू शकत नाही. उदा. बाय लेटरल कॅटेरेक्ट, Albinism, ROP हा अपूर्ण वेळेत जन्मलेल्या, कमी वजनाच्या अर्भकांमध्ये आढळून येणारा गंभीर, पण टाळता येण्याजोगा रोग. यासाठीच बाळाच्या जन्मानंतर ते नवजात बाळांसाठीच्या ICU मध्ये असेपर्यंतच्या काळातच त्याची डोळ्यांची तपासणी होणं जरुरी असते. बऱ्याच वेळा या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं किंवा याबद्दलची माहितीच नसते. बाळाला ROP असतो, तेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेत परीक्षण झाल्यास, उपचार करून बाळाची दृष्टी वाचवणं शक्य असतं. पण चौथ्या अवस्थेत रेटीना पूर्णपणे सुटलेला असतो. अणि काही मदत होणं जवळ जवळ अशक्य असतं. काही वेळा पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनसुद्धा केवळ हॉस्पिटलमध्ये बाळाच्या डोळ्यांच्या तपासणीचा सक्तीचा कायदा नसल्यामुळे डोळे तपासले जात नाहीत. वेळीच तपासणी आणि उपचार न झाल्यामुळे दृष्टी गमावलेली कितीतरी बाळं आम्ही पाहातो. जेजे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार कमीतकमी खर्चात किंवा विनामूल्य केला जातो.”
“आपल्याकडे, नवजात बाळाला लसीकरण केलं जातं, ज्या तपासण्या केल्या जातात, त्यात डोळ्यांसाठी असलेल्या तपासण्या सक्तीच्या नाहीत. त्यामुळे त्या सगळीकडे केल्या जात नाहीत. त्याची माहिती नसते. आणि महत्वही लोकांना कळत नाही. खरं तर अशा तपासण्यांची सक्ती आणि त्या करण्याची व्यवस्था सर्व प्रसुतीगृहांमध्ये होणं, फार गरजेचं आहे.” डॉक्टर हेमालिनी पोटतिडकीने सांगत होत्या.
बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांसाठीही जेजेमध्ये व्यवस्था आहे. त्यांनी सांगितलं, “लातूर, औरंगाबाद आणि आसपासच्या गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातले प्रशिक्षित कर्मचारी, तिथल्या लोकांच्या डोळ्यांची प्राथमिक तपासणी करतात आणि गरजू रुग्णांना बसने जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवतात.” दर सोमवारी, काही समाजसेवी संस्थांतर्फे, गरजू रुग्णांना आणलं जातं. इथे डॉ. तात्याराव लहाने (अलिकडे निवृत्त झाले), डॉ. रागिणी, डॉ. प्रीतम आणि डॉ हेमालिनी यांची सक्षम टीम या रुग्णांची मोफत तपासणी करते. त्यांच्या गरजेनुसार त्वरित उपचार केले जातात अथवा त्यांना एक निश्चित तारीख देऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. “खर तर पूर्वी आम्ही शाळांमध्ये प्रबोधन करण्यासाठी शिबीरं घेत होतो. पण त्याला पालकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. मुलांपेक्षा पालकांचं प्रबोधन करण्याची जास्त गरज आहे. आणि जेव्हा जेव्हा बालरोगतज्ञांकडे लहान मुलं डीपीटी किंवा तत्सम प्रतिबंधक लस टोचण्यासाठी जातात तेव्हा त्यांना डोळे तपासून घेण्यासाठी मार्गदर्शन करणं फार गरजेचे आहे.”
जन्मजात अधू दृष्टी असलेल्या बालकांना १८ – १९ वर्ष पूर्ण होईपर्यंत चष्म्याचा नंबर घालवण्याचे, लेझर किंवा तत्सम उपाय करणं शक्य नसतं. कारण वाढत्या वयाबरोबर मुलांच्या डोळ्यांमधलं भिंग, पटल इ. सुद्धा वाढत असतं. पण निदान जे धोके किंवा आजार टाळणं शक्य आहे, त्यासाठी तरी बाळाच्या आई-बापांनी, कुटुंबियांनी सजग राहायला हवं. आणि शासनाने नवजात बाळांच्या डोळ्यांची तपासणी सक्तीची करणंही गरजेचं आहे.
- मनीषा बिडीकर.
Posted by Navi Umed at 22:01 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Mumbai

Monday, 25 December 2017

"शेळ्याच मही बँक..."


सकाळचे आठ वाजून गेलेत, कोवळी उन्हं झाडीपट्टीतला गारवा छान शेकून काढतायेत... किशाभाऊ आपल्या शेळ्या रानभर सोडून, उन्हाच्या तिरपिला पाठ लावून बसलेत. किशाभाऊ कराळे, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील 'करवाडी' या आदिवासी वस्तीवरला एक गरीब मनुष्य. 'अंध' आदिवासी असलेल्या या माणसाच्या आयुष्यात चार पत्र्यांच्या घराशिवाय काहीच प्रॉपर्टी नाही. ना शेतीबाडी, ना पैसाअडका, ना नोकरी ना कामधंदा. आहेत त्या फक्त शेळ्या..!
आई वडील मजुरी करायचे त्यांच्या जीवावर किशाभाऊ कसेबसे सातवीपर्यंत शिकले. पण खाणारी तोंडं मोठी झाली की त्यांना पोसणे कठीण होऊन जातं. परिणामी किशाभाऊंना शाळेची पुस्तक फरताळात टाकून रोजमजुरी करावी लागली. आज त्यांचं वय पन्नाशीकडं झुकलं आहे. साधारण तेराव्या वर्षांपासून त्यांनी मजुरीला सुरुवात केली असावी. किमान 38 वर्षे ते रोज काबाडकष्ट करतात. ना सुट्ट्या, ना पीएफ, ना आरोग्य सुविधा, ना वेतन आयोग त्यांच्या नशिबी फक्त कर्मयोग. रोजमजुरीपासून शेळ्यांपर्यंतच्या प्रवासाची किशाभाऊंची कहाणी संघर्षाने भरलेली आहे. ते सांगत होते, "मी लहानपणी मजुरी करायचो तेंव्हा दिवस बरे होते. मजुरी मिळायची, दाणे मिळायचे, गावं आबादी आबाद होतं. आता काळ बदलला. ज्यांची शेतं आहेत त्यांचीच उपासमार सुरू आहे. मग, आम्हा मजुरांची काय गत? शेतमजुरीत परवडेना तेंव्हा मीही गेलो पुण्यामुंबईला मस कामं केली पण लोकं नुसती राबवून घ्यायची. पदरात काहीच उरायचं नाही. अखेरीला माघारी येऊन ह्या शेळ्या चालू केल्या बघा..."


एकाच्या दोन, दोनच्या चार करत आज किशाभाऊंचा शेळ्यांचा संसार चाळीस वर पोचला आहे. वर्षाकाठी दहा एक शेळ्या त्यांना विक्रीला मिळतात. पाच पन्नास हजार हाती पडतात. घरदार भागतं त्यांचं त्यात. आजही कधीमधी मजुरीनं जातात. त्यावर तेल मीठ भागवतात. गावच्या जंगलात शेळ्या चारून दिवस ढकलणाऱ्या किशाभाऊंच्या मनात स्वतःच्या मुलांना शिकवता आलं नाही, याचं शल्य आहेच. आज तरी शेळ्या नावाच्या बँकेने या माणसाच्या आयुष्यात जगण्याचं चैतन्य निर्माण केलंय.
 - दत्ता कानवटे.
Posted by Navi Umed at 20:50 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Hingoli

Friday, 22 December 2017

मुलांनी सभोवतालातून स्वतःहून मिळवलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवला म्हणून...

नाशिक इथली कुरुडगाव जिल्हा परिषद शाळा. बाहेरून पाहताना कुठल्याही सामान्य शाळेसारखी दिसणारी ही शाळा आत गेल्यानंतर मात्र वेगळीच आहे हे जाणवतं. सगळ्या शाळांमध्ये मुलं रांगेत बसतात, हा प्रकार इथं नव्हताच. मुलं मस्त वर्गाच्या भिंतीना टेकून बसली होती. मध्यभागी राहिलेल्या मोकळ्या जागेत फरशीवर अनेक तक्ते ऑईल पेंटने रंगविले होते. त्यात गणिती क्रियांसाठीचे रंगीबेरंगी फुलपाखरी तक्ते, आकड्यांची सापशिडी, भाषेचे खेळ, इंग्रजी रंगांची नावं असं बरंच काही होतं. मध्यभागी असलेल्या या मोठ्या मोकळ्या जागेत विद्यार्थी येऊन खडू हातात घेऊन स्वयंअध्ययन करीत होते.या शाळेचे मुख्याध्यापक अंबादास म्हस्के सांगतात, "आज माझी शाळा 100 टक्के प्रगत आहे, पण अगदी तीन वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. वर्गात काही विद्यार्थी हुशार असतात, काही मध्यम गुणवत्तेचे असतात आणि काहींच्या समोर डोकं फोडलं तरी ते शिकू शकत नाहीत अशी असंख्य शिक्षकांप्रमाणे माझीही प्रिय समजूत होती. पण 2015 मध्ये नाशिकच्या काही शिक्षकांनी कुमठे बीटला भेट दिली आणि आमचा शिकविण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला."






विचारप्रक्रियेत झालेल्या बदलाबद्दल ते म्हणाले, "ज्ञानरचनावादी- मुलांनी सभोवतालातून स्वतःहून मिळवलेल्या ज्ञानावर आधारित - शिक्षण देणारे संपूर्ण प्रगत बीट म्हणून कुमठे बीटची ख्याती होती. आमच्या गटाला बाहेरून सर्वसाधारण दिसणारी शाळा पाहणीसाठी मिळाली होती. माझ्या तर मनात येऊन गेले की, 'का आलो आपण ही शाळा पाहायला? यापेक्षा तर माझी शाळा चांगली आहे.' पण आम्ही आत गेलो आणि तिथल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य, हुशारी पाहून हा गैरसमज गळून पडला. तिथली मुलं चुटकीसरशी वजाबाकी, भागाकार अशा अवघड समजल्या जाणाऱ्या गणिती क्रिया करीत होती. 'रेन' हा एक शब्द दिल्यावर तिसरीतील मुलाने चक्क 28 इंग्रजी वाक्ये स्वत:हून घडाघडा बोलून दाखविली. पहिलीत दाखल झालेली मुलं जुलै महिन्यातच वाचन करीत होती आणि मग माझी खात्रीच पटली, गड्या आपलं चुकतंय!!"







"तिथून परत आल्यानंतर वर्गातील विद्यार्थी अप्रगत आहेत, कारण त्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण नाही, त्यांना खोड्या करायलाच खूप आवडतं असे शिक्के मारणं, मी पूर्णपणे थांबवलं. शिक्षक म्हणून प्रत्येक मुलाला सर्वोत्तम शिकवणं आणि प्रगत करणं, हेच आपलं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे, याची नव्याने जाणीव झाली. मग शाळेत काही मूलभूत बदल करण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम मुलांशी संवाद वाढवला, प्रत्येक विद्यार्थ्याला 'तू शिकू शकतोस/ शकतेस' असा विश्वास बोलण्यातून देण्यास सुरुवात केली. आम्ही शाळेत कमीत कमी खर्चातील ज्ञानरचनावादी साहित्य तयार केले. मण्यांच्या माळा, लाकडी चमचे, शब्द- चित्र कार्ड, खोट्या चलनी नोटा असं बरंच साहित्य बनविलं. वर्गात ऑईल पेंटने विविध गणिती क्रियांचे तळफळे रंगवून घेतले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत समोर उभं राहून न शिकविता वर्गात मुलांच्या गटात जाऊन त्यांच्यासोबत बसून शिकवणं सुरु केलं." म्हस्के सर बदलाची प्रक्रिया सांगत होते.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.
Posted by Navi Umed at 22:00 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Nashik

Thursday, 21 December 2017

कुरुंजीतलं गमभन

कुरुंजीतलं गमभन : रंजना बाजी
कुरुंजीत भाड्याने घर घेऊन राहायचं ठरल्यावर आम्ही कुरुंजीत घर शोधत फिरत होतो. एका घराच्या अंगणात तीन चार बायका गोधडी शिवत बसल्या होत्या.त्यातली एक पुढं येऊन म्हणाली, माझ्या मुलीचं हाये घर ! बघा. आम्ही बघितलं. गावाच्या साधारण मध्यभागी घर आणि समोर शेत. छानच होतं ते.
‘घराचं भाडं पाश्शेच हाये, मागं टॉयलिश बांधलंय त्याचं दोनशे जास्ती.’ या बोलीवर घर ठरलं आणि घर दाखवणाऱ्या सरुबाईबरोबर ओळख झाली आणि पुढे मैत्रीही.



सरुबाईला तीन मुली आणि एक मुलगा. दोन मुली लग्न झालेल्या, तिसरी नववीत शाळा सोडून घरी बसलेली सोळा सतरा वर्षांची एक मुलगी आणि आय टी आय झालेला पुण्यात नोकरी करणारा मुलगा. घरात म्हातारी सासू आणि नवरा.
कुरुंजीत स्वैपाकाचा घाट घालायचा नव्हता. त्यामुळे जाईन तेव्हा मी सरुबाईच्या घरी दोन्ही वेळा जेवते. त्यातून तिची माझी जास्त ओळख होत गेली.
सरुबाई म्हणजे मूर्तीमंत कष्ट आणि ग्रामीण निरागसता यांचं मिश्रण आहे. मळे गावातून, तीन किमी अंतरावरच्या कुरुंजीत ती लग्न करून आली. शाळेत न गेल्यामुळे लिहिता वाचता येत नाही. पण तिच्या परिघामध्ये त्याला महत्त्वही नसावं.
वर्षभर कोणत्या ना कोणत्या कामात ती व्यग्र असते. दिवसभर कष्ट करणं, घरी येऊन काम आणि झोपणं. तिचा कष्ट करण्याचा आवाका बघितला, की थक्क व्हायला होतं आणि त्याची अपरिहार्यता समजली, तर वाईटही वाटतं.
भाताच्या पावसाळी हंगामात ती इरलं घालून सकाळी बाहेर पडते, ते अंधारापर्यंत शेतात काम करत असते.


इतर अनेक जमीनधारकांसारखं तिचे पण वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीचे तुकडे आहेत. एक माझ्या घरासमोर तर बाकीचे गावापासून पलिकडे. लावणीच्या काळात एका तुकड्यावर काम संपलं, की दुसरीकडे असं सतत सुरू असतं. त्या दिवसांत रात्रीच्या जेवणाला गेले, तर अत्यंत दमलेली सरुबाई खाटेवर पडलेली असते किंवा चुलीकडं पाय करून शेकत बसलेली असते. मी वाढून घेते, असं म्हटलं तरी ती लगबगीनं वाढायला येते.
लावणी, तण काढणं, भात कापणं, झोडणं, मळणी या सगळ्या गोष्टी सरुबाई नवऱ्याच्या बरोबरीनं करते. थंडीत, इतर गावकऱ्यांच्या बरोबर दिवसभर डोंगरावर गवत कापून भारे वाहून आणते. शेतात काम नसेल तेव्हा गावात किंवा आजूबाजूला कुठे काम असेल तर दिवसभर घर बांधंणं, मजुरी करणं, अशी कामं करून ती उत्पन्नात भर घालते.
सरुबाईंचे (त्यांच्या भाषेत मालक ) अण्णा हे उत्तम गृहस्थ. त्यांना कधी मी ओरडताना, भांडताना बघितलं नाही. गावात पण त्यांचं नाव चांगलं. दारू न पिणारा अत्यंत सज्जन माणूस!



सरुबाईचा नवऱ्यावर खूप जीव. बरेचसे नवरे बायकांना मारतात, आयमाय उद्धारतात, हे सांगताना सरुबाई अभिमानानं म्हणाली होती, आमच्या मालकानं कधी रागात माझ्या आईचं नाव काढलं नाही बघा ! जेवताना अण्णांच्या ताटात भरपूर भाजी, भात, वशाट वाढत तिचं प्रेम व्यक्त होत असतं.





सरुबाईची एक मुलगी खूप लांब राहते, असं तिनं सांगितलं होतं. कुठं लांब तर अकुर्डीला. पिंपरी चिंचवड भागात. ही मुलगी नंतर वेल्हे भागात सासरी राहायला आली. एके दिवशी संध्याकाळी सरुबाईच्या घरी गेले तर सरुबाई अत्यंत कासावीस होऊन बसली होती. ‘ पोरींना एकटं जायाला काय हुतं? बाप कश्याला लागतो सोडवायला?’ अशी बडबड सुरू होती. विचारल्यावर समजलं, की अण्णा सकाळी लेकीला सासरी सोडायला गेलेत. कुरुंजी ते हायवे, तिथून नसरापूर आणि तिथून तिचं गाव असा वेडावाकडा प्रवास होता. सरुबाईच्या दृष्टीनं प्रवास म्हणजे माणसानं सकाळी जाऊन अंधाराच्या आत परत आलं पाहिजे. अण्णांचा अजून पत्ता नव्हता. फोन लागत नव्हता. मुलीचं गाव दरीत असल्यामुळं रेंज नसायची. सरुबाईचा धीर सुटला होता. स्वतःच्या मुलीला ती बोल लावत होती. अन्नाला शिवायला पण तयार नव्हती. कशीबशी समजूत घालून, दटावून तिला जेवायला लावलं. दुसऱ्या दिवशी अण्णा सकाळी परतल्यावर तिचा जीव भांड्यात पडला.




सरुबाईच्या विश्वात इंग्रजी नाही. त्यामुळं तिचे शब्दप्रयोग कधी कधी मजेशीर असतात. गावात एक आज्जी खूपच आजारी होती. तिला काय झालंय असं विचारलं तर सरुबाई म्हणाली, तिचा डीपी लई हललाय. खूप विचार केल्यावर लक्षात आलं की त्या आज्जीचं बीपी वाढलं होतं.
अशी ही भाबडी,जीव लावणारी बाई. खूप दिवस नाही गेले तर गेल्यावर गालावरून हात फिरवणारी, खा, खा असा आग्रह करणारी, जत्रेच्या वेळेला लागतील म्हणून थोडे जास्त पैसे दिल्यावर मिठी मारत डोळ्यात पाणी आणणारी! 
Posted by Navi Umed at 23:46 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Kurunji, Pune

Monday, 18 December 2017

मुलांनी आणलं पुस्तकांना; पुस्तकांनी आणलं मुलांना


जिल्हा नाशिक. तालुका सिन्नर. इथलं पाडळी हे छोटंसं गाव. इथल्या पाताळेश्वर विद्यालय या जिल्हा परिषद शाळेतली ही गोष्ट. वाढदिवस सगळ्या मुलांची अगदी आवडता. हल्ली तर केक कापणं, भेटवस्तू देणं आणि मोठ्यांदा गाणी लावणं एवढाच वाढदिवसाचा कार्यक्रम झाला आहे. पण इथल्या मुलांनी मात्र अगदी वेगळा विचार केला. वाढदिवसावर होणारा खर्च वाचवत ‘विद्यालयास पुस्तक भेट’ हा उपक्रम त्यांनी सुरु केला. आज यामुळे विद्यालयाच्या ग्रंथालय विभागात २५० पुस्तकं जमा झाली आहेत. आणि गेल्या महिन्यात, बालदिनाचं औचित्य साधत या पुस्तकांचं प्रदर्शनही भरविण्यात आलं होतं. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांची ही संकल्पना. वाढदिवसाच्या दिवशी मुलं केक, चॉकलेट, जंकफूड खातात. यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोकाच जास्त आहे. हे टाळण्यासाठी ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे, त्याने शाळेस एक पुस्तक भेट द्यावं असं देशमुख यांनी सुचविलं.
शाळा सुरु होतानाच याविषयी त्यांनी मुलांना सांगितलं. पुस्तक वाचायला आवडेल असं, माहितीपूर्ण हवं. उगाच स्तोत्र, घरातली अडगळीतील पुस्तकं आणायची नाही. हेतू हाच की मुलांना विविध साहित्यप्रकारांची ओळख व्हावी. या उपक्रमामुळे, आज शाळेच्या खजिन्यात अनेक नामवंत लेखकांची चरित्रं, आत्मकथा, ज्ञानकोष आदी साहित्य असल्याचं देशमुख अभिमानाने सांगतात. मुलांच्या देणगीतून शाळेच्या ग्रंथ विभागात अग्निपंख, गरूडझेप, व्यक्तिमत्व विकास, मी व माझा बाप, शतपत्रे, दैनंदिन दासबोध, महाश्व्वेता, निवडक अग्रलेख व पत्रे, धडपडणारी मुले, अॅडॉल्फ हिटलर, रमाबाई रानडे, विक्रम आणि वेताळ, ॠषीमुनींच्या महान कथा, नितीमुल्ये, काबुल कंदाहारकडील कथा, संताच्या कथा, महान स्त्रिया, असे गुरू असे शिष्य, तेनाली रामाच्या कथा, मनोरंजक कथा, गोष्टीतून संस्कार, बाल नाटुकली यासह अन्य पुस्तकं जमा झाली आहेत.
ही पुस्तकं वाचण्यासाठी मुलांची झुंबड उडते. वर्गवार आठवड्याचं नियोजन असलं, तरी मुलं शाळा भरण्याअगोदर दीड तास आधीच येतात. शाळेच्या मोकळ्या आवारात ठेवलेल्या टेबलवरून हवी ती पुस्तकं घेऊन तिथंच वाचत बसतात. पुस्तकं वाचून पुन्हा जागेवर ठेवा, एवढंच बंधन त्यांना असल्याने मुलं खुश आहेत. शाळेतली विद्यार्थिनी साक्षी रेवगडे सांगते की, “मुख्याध्यापकांनी आम्हाला पुस्तकं आणायला सांगितली. पालकांनीही याला प्रतिसाद दिला. आम्ही ठरवून एकमेकांकडून पुस्तकं मागवून घेत वाचतो. वाचनाची आवड वाढते म्हणण्यापेक्षा, आत्तापर्यंत हा आनंद गमावला याची सल जास्त आहे.” आम्ही अजून पुस्तकं जमा करणार असल्याचं तिनं आर्वजून सांगितलं.


- प्राची उन्मेष.
Posted by Navi Umed at 21:02 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Nashik

Sunday, 17 December 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


"आजची तरुण पिढी सतत मोबाइल-सोशल मिडिया- इंटरनेटमध्ये गुंग असते." ही एक ठरलेली तक्रार. पण तरुण पिढीला नावं कशासाठी ठेवायची? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण इंटरनेटने वेढलेले आहेत. काहींना कामासाठी, काहींना बिनकामाचं, काहींना खेळण्यासाठी, तर काहींना मित्र-मैत्रिणी गोळा करण्यासाठी. आपण आत्ता कुठे आहोत, काय करत आहोत, मनात कोणता विचार चालू आहे हे सगळं दुसऱ्याला सांगण्यासाठी इंटरनेट हवंच. असं, सतत गॅझेट्स वापरण्याचे मेंदूवर, मुलामणसांच्या क्षमतांवर काही परिणाम होत आहेत. त्याबद्दल काही निरीक्षणं, काही शंका, काही प्रश्न.
- इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर (IAD) हा आजार लोकांना होतो आहे.
- सायबर रिलेशनशिप ऍडिक्शन या नावाचा आजार होतो आहे. अशी मुलं सर्व वेळ आभासी मित्र-मैत्रिणींशी बोलत असतात, ते नवनवे आभासी मित्र-मैत्रिणी गोळा करत राहतात. त्यामुळे त्यांना खरोखरच्या मित्र-मैत्रिणींमध्ये फारसा रस उरत नाही. अशी मुलं प्रत्यक्ष भेटणं टाळतात. मोबाईल हातात घेऊन, एकमेकांना त्यातलं काही दाखवत गप्पा मारणं हे नेहमी दिसणारं दृष्य आहे.
- सायबर सेक्स ऍडिक्शन हाही प्रकार दिसून आला आहे. हाताशी सहज उपलब्ध असलेली अतिरेकी माहिती, चित्र, फोटो, व्हीडिओ, गोष्टी, विनोद याकडे एक चाळा म्हणून लोक वळतात. पुन्हा पुन्हा तेच तेच बघत राहतात. यातून मेंदूतली संबंधित क्षेत्र पुन्हा पुन्हा उद्दीपित होत राहतात.
- कारपेल टनेल सिंड्रोम - वजन वाढणं, डोळे कोरडे होणं, डोळ्यांवर आणि मानेवर ताण येणं. त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे.
- दीर्घकाळ लक्ष देऊन एखादं काम पूर्ण करणे हा प्रकार कदाचित कमी होण्याची शक्यता आहे. मुळातच अटेंशन स्पॅन कमी होतो आहे, त्यामुळे सराव करणं, पुन्हापुन्हा एखादी गोष्ट जमेपर्यंत सराव करणं ही गोष्ट कमी होईल. याचा परिणाम अभ्यासावर होतो आहे. वेळखाऊ पण आवश्यक कामं पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या चिकाटीवर होऊ शकतो. संगीत कलेसाठी, वाद्यवादन यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी जो रियाझ लागतो, तो ही मुलं कसा करू शकतील?
एखाद्या विषयाच्या संशोधनासाठी वर्षानुवर्ष काम करावं लागतं. आजची पिढी ते करू शकेल का?
यावर उपाय काय?
ज्या मुलांसमोर खरोखर एखादी ध्येयासक्ती असेल, एखादी पॅशन असेल तर ती मुलं कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता पुढे जातातच. म्हणून आपल्या मुलांमध्ये अशी पॅशन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
 : डॉ. श्रुती पानसे
Posted by Navi Umed at 22:38 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Online Safety

Friday, 15 December 2017

शेतीची ‘विद्या’

विद्या रुद्राक्ष, राहणार डिघोळअंबा, ता.अंबाजोगाई, जि बीड. शिक्षण बीएस्सी, मायक्रोबायोलॉजी. २५ वर्षांपासून शेती करणार्‍या विद्याताई शेती परवडतच नाही असे म्हणणाऱ्यांसाठी आदर्श आहेत. उत्तम शेतीने त्यांनी स्वत:च्या कुटुंबाची उन्नती साधली आहेच. परिसरातील शेतकऱ्यांसाठीही त्या मार्गदर्शक ठरल्या आहेत. शिवाय, बचतगटांच्या सदस्यमहिलांना त्यांनी रोजगारही मिळवून दिला. विद्याताईंची यशकथा त्यांच्याच शब्दांत - “घरातल्या बायका म्हणजे, शेतीत राबवणारं हक्काचं मजूर.


शेतीच्या निर्णयप्रक्रियेत महिलांच स्थान नगण्यच! पण गुंतवणुकीच्या तुलनेत नफ्याचा विचार आणि काटकसर करणं, या बायकी स्वभावगुणांचा उपयोग शेतीत कधीच करुन घेतला नाही. अन् मी नेमकं हेच केलं. १९९३ साली मी १५ एकर शेतीची धुरा खांद्यावर घेतली. नोकरीनिमित्ताने कोकणात गेलेल्या पतीसोबत मीही गेले होते. पण तिथलं वातावरण न मानवल्याने दोन मुलांसह मी गावी परतले आणि शेतीत लक्ष घातलं. बेभरवशी पाऊस आणि तितकीच बेभरवशी भावाची हमी, त्यामुळे गुंतवणूक अधिकची होऊन फार तोटा पदरी पडू नये असं वाटायचं. गहू, ज्वारी, पिवळी ज्वारी, कार्‍हळ, तूर, मुग, उडीद या हंगामी पिकांसाठी सेंद्रीय शेतीचा पर्याय निवडला. सुरुवातीला गायी घेतल्या, विक्रीसाठी दूध आणि खतांसाठी शेण असा दुहेरी उद्देश! मग कंपोस्ट सुरु केलं. तेच खत शेतीसाठी वापरलं. शेणाचा आणखी उपयोग करुन घेत बायोगॅस केला. तो अजून सुरु आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या माऱ्याने शेतीच बिघडलेलं आरोग्य सुधारलं अन् खतांचा अवाढव्य खर्च कमी झाला. दुधाचे पैसे झाले अन् घरच्या गॅसचाही खर्च घटला!



सगळं व्यवस्थित जमण्यात अन् चुकांमधून शिकण्यात तीन वर्ष गेली. उत्पन्न घटलं. “बायकांनी ‘किचन बजेट’च पहावं, ‘शेतीच बजेट’ नाही. बायकांना शेतीतलं काय कळतं? आमच्या पिढ्यान् पिढ्या शेतीत गेल्या. आता बायकांकडून शेती शिकायची का?” असे टोमणे मिळायला लागले. पण पतीचा पाठींबा होता. ३ वर्षानंतर मात्र सुपरिणाम दिसू लागले. शेतीच्या झिरो बजेटकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं. गांडूळ खत, कंपोस्टमुळे खतांचा खर्च कमी झाला, गायी होत्याच. त्यामुळे गोमुत्र आणि कडूनिंबाचा पाला यांचा कीटकनाशक म्हणून फवारणीसाठी उपयोग केला. बीजप्रक्रियेसाठी प्रभावी ठरणारं गोमुत्र वापरलं. पेरणीसाठी घरी तयार केलेलं बियाणं वापरलं. यामुळे शेतीचा खर्च निम्म्यावर आला. गुंतवणूक कमी झाल्याने एखाद्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न घटलं तरी फार तोटा झाला नाही. शिवाय, ज्या पिकांची विक्री होते, त्यांच्या काढणीनंतर उरलेला भाग जनवारांना चारा म्हणून आणि उर्वरित भाग कंपोस्टसाठी वापरता येतो अशाच पिकांना प्राधान्य दिलं. कारण, गाईंना चारा, कंपोस्टसाठी कच्चा माल, गोमूत्रापासून फवारणी, शेणापासून बायोगॅस अशी ही साखळी होती. पिकांमध्ये फेरपालट केला, मिश्रशेती केली, एकमेकांना पूरक पिकं घेतली. याचा फायदा झाला. मुरमाड जमिनीत गाळ टाकला, बांधावर लिंबाची झोड लावल्याने पक्षीथांबे झाले. हे पक्षी पिकांवरील किडे खाऊ लागले. विहिरीच्या मोजक्या पाण्यावर ठिबक, तुषारसिंचन करुन पिकं घेतली. विविध प्रयोग करताना २५० केशर आंबा लावला. परिसरात प्रसिद्ध झाल्याने बाहेर पाठवण्याऐवजी स्थानिक बाजारपेठेतच या अंब्याला मोठी मागणी आहे.
 “खंर मी शेतीतच रमले होते. पण २०१४ मध्ये बचतगटांचं ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरलं. मुंबईच्या या प्रदर्शनाने खूप शिकवलं. सभाधीटपणा, आपल्या उत्पादनांची बाजू पटवून सांगायची कला. १९९७ साली, पहिल्यांदा, आम्ही कल्पना चावला बचतगट सुरु केला. महिला सहकाऱ्यांना २ रुपये शेकडा, अशा अल्प व्याजदरात दिलेल्या कर्जाचा फायदा महिलांच्या कुटुंबांना झाला. कुणाच्या मुलाच्या शिक्षणाला, कुणाच्या मुलीच्या लग्नावेळी हे पैसे कामी आले. आज या गटाची उलाढाल सात लाखांवर आहे. पाच वर्षांपूर्वी दुसरा, सरोजनी नायडू बचतगट सुरु केला. यामध्ये ४० महिला आहेत. नव्या बचतगटाने अवघ्या एक रुपया शेकडा दराने कर्ज दिलं. याचीही उलाढाल ३ लाखांपर्यंत गेली. आमच्या बीड जिल्ह्याने चार वर्ष दुष्काळ सोसला. शेतीचं उत्पन्न नसल्यात जमा, हातालाही काम नाही, अशी स्थिती. अशा वेळी बचतगटांनी विविध उत्पादनं घेऊन प्रदर्शनात विक्री केली. अशी, महिलांनीच कुंटुंबं सावरली. तूर, मूग, हरभरा या डाळी प्रदर्शनात मांडल्या. सेंद्रीय उत्पादनं असल्याने प्रतिसाद मिळाला. पिवळी ज्वारी, गहू ज्वारी, काऱ्हळं यांचं पॅकींग करुन विक्री केली. सुरुवातीला शासनाच्या तेजस या ब्रॅण्डनावाने विक्री केली. आता रुद्राक्ष ऑरगॅनिक फुड हा स्वत:चाच ब्रॅण्ड तयार केला आहे.”
“२५ वर्षांपासून शेती करताना अजूनही मी थकले नाही. पहाटे चारपासूनच दिवस सुरु होतो. मागे वळून पाहताना सुखद अनुभव आहेत. मोठा मुलगा अविनाश कानपूर आयआयटीमध्ये शेवटच्या वर्षाला आहे. धाकटा आशुतोष अमरावतीमधून बीटेक झाला. तो नागपूरला एका नामांकित कंपनीत आहे. पतींने स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने सध्या दोघं मिळून शेती करतो. जमेल तसं इतरांना मार्गदर्शनही सुरुच आहे.
- अमोल मुळे.
Posted by Navi Umed at 22:59 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Beed

Thursday, 14 December 2017

कुरुंजीतलं गमभन :शेती आणि त्याला अनुषंगिक कामं

शेती आणि त्याला अनुषंगिक कामं नक्की काय असतात याबद्दलची माझी माहिती बऱ्यापैकी ऐकीव होती. मुळशी तालुक्यात काम करताना बायका पुरुषांना वेळोवेळी शेतात काम करताना बघितलं होतं.
कुरुंजीत गेल्यापासून हे चित्र जास्त स्पष्ट झालं. भातशेतीचं चक्र पूर्ण बघितलं.
शाळेत शिकलो होतो की जून पासून शेतात कामं सुरू होतात. पण कुरुंजीत एक वेगळंच चक्र डोळ्यासमोर आलं.
पौष महिन्याच्या पौर्णिमेला (जानेवारी महिन्यात) देवीची जत्रा भरते. त्यानंतर थोड्या दिवसात लोक ‘कवळं’ गोळा करायला रानात जातात. कवळं म्हणजे झाडांच्या फांद्या. या छाटून मोळ्या बांधून आणल्या जातात. या फांद्या नंतर शेतात वाळण्यासाठी पसरवल्या जातात. उन्हात त्या वाळत राहतात. साधारण शिमग्याच्या आसपास त्यात शेण मिसळून त्या जाळतात. ही भाताची रोपं तयार करण्याची सुरुवात असते. पावसाच्या आधी यात बियाणं पेरतात. पहिल्या पावसानंतर रोपं उगवून येतात. यांना दाढ्या म्हणतात. खरा मान्सून सुरू झाला आणि शेतात भरपूर पाणी साठून चिखल झाला की ही तयार रोपं थोड्या थोड्या रोपांची मूठ तयार करून एका ओळीत किंवा असंच विशिष्ट अंतरावर लावली जातात. लावणी झाली, की मध्ये मध्ये तण काढायचं काम असतं.


साधारण दिवाळीच्या आगेमागे भात पक्व होऊन पिवळा पडतो आणि कापायला तयार होतो.
या तयार भाताची कापणी करून ती रचून ठेवली जातात त्या रचनेला उडवं म्हणतात. मग आपापल्या सोयीनुसार मळणी करून भात वेगळा केला जातो आणि गिरणीतून तो पॉलिश होऊन तांदूळ म्हणून खाण्याजोगा होऊन पोत्यात भरून ठेवला जातो.
हे सगळं मी काही शब्दांत मांडलं खरं... पण लिहितानाच मला शब्दांची निरर्थकता समजत गेली. कित्येक हजार वर्षांतून माणसानं कमावलेलं "traditional wisdom" अजूनही चालत आहे. ती एक अनुभवायची गोष्ट आहे.
बियाणं पेरल्यावर पावसाची उत्सुकतेनं वाट बघणं, रोपं लावून झाल्यावर त्यांना पाहिजे तेवढं पाणी शेतात जमा होतं की नाही, हेही पावसावर अवलंबून असणं, वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेल्या जमिनींसाठी पाट काढून घालून पाण्याचं नियोजन करणं, तासनतास गच्च पावसात उकिडवं बसून रोपं लावणं, सतत ओणवं उभं राहून तण काढणं, एकाच कुटुंबाच्या मालकीचे जमिनीचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे ती पळापळ, कुणा नातेवाईकांकडे मनुष्यबळ कमी असेल, तर त्यांना त्यांच्या कामात मदत करायला जाणं, जनावरांची मदत घेणं, कापणी मळणीत सगळ्या कुटुंबाचा बैलांसकट सहभाग वगैरे. एक मोठा सृजन सोहळा सुरू असतो आणि यात आख्खी कुटुंबं बुडून, दमून जातात. घरातल्या प्रत्येक सदस्याला यात भाग घ्यायला लागतो. आजी, आजोबा ते नातवंडं सगळी कामाला लागलेली असतात. वरून पाऊस कोसळत असतो. सगळीकडे पाणी, प्रवाह, धबधबे, हिरवाई..

कुरुंजीत बघितलं, की पुरुष आणि बायका दोघं बरोबरीनं राबतात. भातकापणी झाल्यानंतर गावाजवळच्या डोंगरावर वाढलेलं गवत जनावरांसाठी चारा म्हणून आणलं जातं. यासाठी बायका पुरुष सकाळीच निघतात. गवताचे भारेच्या भारे डोक्यावर वाहून आणतात. घरासमोर, शेतात ती रचली जातात. पाऊस आला की घरात पोटमाळ्यावर त्यांची रवानगी होते.
नवीन तांदूळ घरात आला की जत्रेचे वेध लागतात. घरं सारवली जातात, घरातली बाईच भिंतींना पुन्हा लिंपून रंग देते, घरातली सगळी भांडी लख्ख घासून पुन्हा मांडण्यांवर मांडली जातात. अंथरुणं, पांघरुणं धुतली जातात. जत्रेसाठी सगळे नातेवाईक जमा होतात. नवे कपडे घेतले जातात. जत्रा भरते. पहिल्या दिवशी पुरण पोळी, नंतर मटणाची जेवणं होतात आणि मंडळी पांगतात आणि माझ्या मते भाताचं मोसम संपतो. नवीन चक्राला सुरुवात होते.
यातच कोंबडया, शेळ्या, बकऱ्या , गाई, म्हशी पाळल्या जातात. डेअरीला थोडं फार दूध जातं. बैल तर असतातच.
पावसाळ्याच्या आधी सरपण गोळा करून ठेवणं आहे, गोवऱ्या थापून पाणी न लागेल असं रचून ठेवणं आहे. उन्हाळ्यात सांडगे घालणं आहे.
नियमितपणे येणाऱ्या निसर्गाच्या चक्राला प्रतिसाद देत निसर्गाला धरून जगणं हे इथं अजूनही दिसतं.
रंजना बाजी
Posted by Navi Umed at 22:55 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Pune

** इंटरनेट वापरणाऱ्या जगभरातल्या प्रत्येक ३ व्यक्तींपैकी १ बालक आहे **

युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय संस्था दर वर्षी जगभरातल्या बालकांसंबंधी एखादा कळीचा विषय घेऊन त्याचा अभ्यास अहवालरूपाने सादर करते. यंदाच्या अहवालाचं डिजिटल प्रकाशन आत्ताच महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी विद्यासागरराव यांच्या हस्ते आणि झुबेरी आणि जयंती या बालकांच्या अनुभवकथनाने झालं. अहवालाचा विषय आहे: डिजिटल विश्वातली बालकं. राज्यपाल म्हणाले की आजोबा या नात्याने मला माझ्या नातवंडांची, म्हणूनच महाराष्ट्रातल्या मुलामुलींचीही काळजी वाटते.
युनिसेफच्या अहवालातल्या ठळक नोंदी:
- इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक ३ व्यक्तींपैकी १ बालक आहे.
- ९०% मुलंमुली स्मार्टफोनचा वापर मित्रमैत्रिणी जोडण्यासाठी करतात.
- मुलांची ऑनलाईन उपस्थिती इतकी मोठी असूनदेखील, डिजिटल विश्वातल्या धोक्यांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी सुविहित व्यवस्था नाही.
- अर्थव्यवस्था डिजिटल होत चालली असताना, डिजिटल दरीही वाढत चालली आहे. संपूर्ण जगातल्या तरुणांचा तिसरा हिस्सा, म्हणजे ३४.६ कोटी तरुण आज ऑनलाइन नाहीत.
- डिजिटल विश्वात अतिदुर्बल घटकांमधील मुलं मागे पडत आहेत.
- सर्व वेबसाईट्सपैकी ५६ टक्के इंग्रजीत आहेत. त्यामुळे, स्वतःला समजेल असा वा सांस्कृतिकदृष्ट्या जवळचा वाटेल, असा मजकूर अनेक मुलांना सापडत नाही.
आणखी बरंच काही शेअर करण्यासारखं आहे. ते आम्ही लवकरच या पेजवरून करूच.
अहवालासाठी लिंक http://uni.cf/2j2GvHC

 उमेद अपडेट / राजभवन, मुंबई इथून
Posted by Navi Umed at 04:23 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Maharashtra Governor, Mumbai, UNICEF

Tuesday, 12 December 2017

गावकारभार स्त्रियांच्या हाती l त्या गावाला शुद्ध पाणी देती

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातलं गाव लोणखेडा. या ११ हजार लोकसंख्येच्या गावाच्या ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हाती आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने ग्रामपंचायतीचा कारभार आपल्याकडे सोपवला आहे, याची जाणीव असलेल्या, या महिला. शहादा तालुक्यात सुधारणावादी चळवळींचं वातावरण पूर्वापार आहेच. म्हणूनच, खानदेशात इतरांच्या तुलनेत पुढे राहणारा. लोणखेडा गावात आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामपंचायत चालवणाऱ्या कारभारणींचं गावाचा कायापालट करण्यात मोलाचं योगदान आहे.
गावातल्या आजारांचं मूळ दूषित पाण्यात आहे आणि आजारांना गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांना शुद्ध पाणी दिलंच पाहिजे, या विचाराने प्रेरित झालेल्या शांताबाई भिल या गावाच्या महिला सरपंच आणि अन्य सदस्यांनी गावात तीन ठिकाणी ATM सारखं पाण्याचं ATW मशीन बसवून गावकर्‍यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं आहे.
आपल्या गावाला क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा होतोय, हे महिलांच्या लक्षात आलं होतं. क्षारयुक्त पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांना पिटाळण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत बैठकीत ठराव करून गावात तीन ठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याचं मशीन बसवायचं ठरवलं.
गावाच्या उपसरपंच कल्पना पाटील म्हणाल्या, “पाणी शुद्ध करणार्‍या RO यंत्रणेची देखभाल करण्यासाठी खर्च येणार. तो भागवण्यासाठी आणि फुकटात मिळणार्‍या वस्तूचं मोल नसतं. म्हणून आम्ही या पाण्याला दर लावायचं ठरवलं.”
ग्रामपंचायतीने गावकर्‍यांना कार्ड दिलं आहे. एक रुपयात एक लिटर आणि पाच रुपयात सात लिटर पाणी उपलब्ध करून दिलं आहे. या पाण्याचा फायदा लोणखेड्याच्या शेजारची गावंही घेतात. गावात ग्रामपंचायतीने शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्याने खूपच फायदा झाला. आमच्या गावात साथीच्या रोगांचं प्रमाण कमी झाले असल्याचं गावकरी सांगतात. सुजाण स्त्रिया गावाचे प्रश्न निगुतीने सोडवतात, याचं हे ठळक उदाहरण.

- कावेरी परदेशी.





Posted by Navi Umed at 22:51 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Nandurbar

Monday, 11 December 2017

सहजीवनाची आगळीवेगळी सुरूवात

लग्न म्हटलं की अहेर, भेटवस्तू, हार-तुरे, पुष्पगुच्छ, साड्या, दागिने, कपडेलत्ते आलंच. अलिकडे, देणं-घेणं टाळणं, अहेरही न घेणं, अगदी पुष्पगुच्छही नको, असं काही लग्नांत ठरवून केलं जातं. जालना इथल्या एका नवदांपत्याने लग्नात अहेर स्वीकारला नाहीच. अणि द्यायचंच असेल, तर शालेय मुलांसाठी पेन, वही, पुस्तकं हे शालेयसाहित्य द्या, असं आवाहन लग्नपत्रिकेतून केलं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, हजाराहून अधिक वह्या,पेनं वगैरे जमा झालं. या साहित्याचं वाटप लवकरच गरीब विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. 
ऋषिकेश ढासाळकर हे जालनारहिवासी. ते मुंबईत शासकीय सेवेत वर्ग दोनचे अधिकारी. मुंबईत, मंत्रालयात न्याय व विधी विभागात वर्ग दोनच्या अधिकारी असलेल्या दीपाली जोशी यांच्याशी त्यांचा विवाह गेल्या महिन्यात जालन्यात झाला. नवदांपत्याने सहजीवनाची, सुखी संसाराची स्वप्न पहायची, हौसमौस करायची...सगळेच करतात. मात्र, सुशिक्षित सरकारी अधिकारी असलेल्या या दाम्पत्याने, आपल्या सहजीवनाची सुरुवात एका सत्कार्याने केली.
अहेरात भेटवस्तू, हारतुरे न घेता त्या ऐवजी गरीब मुलांना देण्यासाठी शैक्षणिक साहित्य स्वीकारावं, हे त्यांना सुचलं आणि त्यांनी ते अंमलात आणलं. आपल्या लग्नपत्रिकेवरच तशी विनंती करून हा विचार त्यांनी पसरवला. दोघांनी आपल्या सहजीवनाची सुरूवातच अशी आगळीवेगळी केली.
ऋषिकेश- दीपाली यांनी भेटवस्तूंवर होणारा खर्च टाळून मंगलप्रसंगी असं सामाजिक कर्तव्य केलं. हे खरोखरच प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे.
या दोघांना सगेसोयरे, मित्रमंडळी यांनी शुभेच्छा दिल्या,आशिर्वाद दिले.
उद्या हे शालेय साहित्य ज्या गरीब विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान, हसू फुलेल, ते या नवदंपतीला लाखोगणती आशीर्वादापेक्षा भारी असेल. 
- अनंत साळी.
Posted by Navi Umed at 22:30 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Jalna

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


या तंत्रज्ञानाच्या युगात मोठ्या होणार्‍या मुलांच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आहेत. आधीच विभक्त कुटुंब पद्धती, मुलांना खेळायला पुरेशी मोकळी जागा नसणं, अभ्यासाचं ओझं, यामुळे मुलांचं जग लहान होत चाललं आहे. त्यातून ते जर तंत्रज्ञानाने आणखीच आक्रसलं, तर? तर, एरवी सहजपणे शिकता येणारी काही मूलभूत कौशल्य त्यांना शिकता येणार नाहीत. उदाहरणार्थ, दुसर्‍यांशी संवाद, समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचून अंदाज घेणं, अशा प्रकारे अंदाज घेत आपण वागणं, टीमवर्क, स्वतः च्या आणि दुसऱ्या व्यक्तीच्या समस्या सोडवणं, या सर्व कौशल्यांमध्ये आजची मुलं मागे पडत आहेत, असं संशोधनातून समोर येत आहे. आज गॅझेट्सचा अतिवापर करणारी मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा इतरांशी जुळवून घेणं ही मूलभूत कौशल्य नसल्यामुळे त्यांना अडचणीचं ठरणार आहे. उद्याच्या प्रौढ समाजाबद्दल विचार करताना हे लक्षात नको का घ्यायला? गॅझेट्सना सुरक्षित अंतरावर ठेवणं म्हणूनच आवश्यक आहे.
आज मोठ्या असलेल्या माणसांवर ही तंत्रज्ञानाच्या अतिवापराचे परिणाम वेगवान आहेत. त्यांना त्यांचे ताणतणाव कमी करायचे असतात. तऱ्हेतऱ्हेची आव्हानं असतात, प्रत्येकाचे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक प्रश्न असतात. या प्रश्नाशी झुंजण्यात दिवस जातो. हे सगळं विसरण्यासाठी माणसं स्वतःला रमवण्याचा प्रयत्न करतात. तरीही, काही जणांवर या गॅझेट्सचा घट्ट विळखा पडतोच.
मेंदूची क्षमता अफाट आहे. पूर्ण आयुष्यात आपण आपल्या मेंदूचा पुरेपूर वापर करू शकत नाही. मेंदू खूप सारी कौशल्य शिकू शकतो, हातांनी करण्याच्या गोष्टीसुद्धा अभिनव पद्धतीने करू शकतो, पण आपणच मेंदूला पुरेसं काम देत नाही, अशी आजची स्थिती आहे. क्षमता असताना मेंदूला काम दिलं नाही तर तो उलट क्रमाने उत्क्रांत होत जाणार की काय ? बापरे!
तसं नको व्हायला.
म्हणून मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं असेल तर -
1. वेळेची मर्यादा पाळणं आवश्यक. ठराविक वेळेनंतर मोबाईल पाहायचाच नाही. यासाठी स्वतःशी किंवा मुलांशी कठोर वागावं लागेल.
2. मुलं-मुलं, मोठी माणसं एकत्र येतील, समोरासमोर बसून बोलतील याच्या संधी, निमित्त शोधून काढा.
3. मेंदूला चालना देणारे उपक्रम करा.
4. आनंदी संवेदना देणारं डोपामाईन द्रव्य मुलांना कोणकोणत्या कृतीतून मिळेल त्याची योजना करा.
 : डॉ. श्रुती पानसे
Posted by Navi Umed at 05:01 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Online Safety

Saturday, 9 December 2017

35 वर्षांपूर्वी घेतलेला हुंडा केला परत


परभणीतले सत्यनारायण रामजीवन चांडक हे भारतीय स्टेट बँकेत शाखाधिकारी होते. नुकतेच ते साकोली शाखेतून निवृत्त झाले. समाजातील गरजूंना मदत करणारे ही त्यांची ओळख. विशेषतः ‘सेवालय प्रकल्प’, हसेगाव, लातूर इथल्या एचआयव्हीबाधितांच्या पुनर्वसनविषयक गरजांसाठी ते वेळोवेळी पुढे असतात. सेवानिवृत्तीनिमित्तानेही, त्यांनी साकोलीला सेवालयच्या 'हॅपी म्युझिक शो' चं आयोजन केलं. आणि लोकसहभागातून 1 लाख 35 हजाराची मदतदेखील केली. पण, चांडक यांची खरी गोष्ट पुढेच आहे.
त्यांचं 35 वर्षांपूर्वी म्हणजे 1981 मध्ये बसंती यांच्याशी लग्न झालं. तेव्हा प्रथेप्रमाणे त्यांनी सासऱ्यांकडून 21 हजाराचा हुंडा घेतला होता. आता मुलं मोठी झाली. त्यांचेही विवाह पार पडले. आता दोन्ही मुलं पवन आणि पंकज वडिलांना विचारू लागली, “बाबा, आम्ही तर आमच्या लग्नात हुंडा नाही घेतला. तुम्ही का घेतला? तुम्ही तो परत द्यायला हवा.” बाप-लेकात दिलखुलास चर्चा व्हायची. योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन, असं म्हणत ते चर्चेला विराम द्यायचे.
सत्यनारायण चांडक यांची एकसष्टी नुकतीच साजरी झाली. त्यावेळी चांडक पती-पत्नींची खाद्यसामुग्रीने तुला करून त्या वजनाचं साहित्य सेवालय प्रकल्पाला दिलं गेलं. हीच वेळ साधून सत्यनारायण यांनी 35 वर्षांपूर्वी हुंडा घेतला ते चुकलं, अशी प्रांजळ कबुली दिली. आणि 21 हजाराचा चेक मेहुण्याच्या हाती दिला. परंतु रूढीपालन करणार्‍या मेहुण्यांनी ते पैसे स्वीकारण्यास नम्र नकार दिला. मग मदतीची खरी गरज समाजातील वंचित बालकांना आहे, हे जाणून सत्यनारायण यांनी ते हुंड्याचे पैसेही सेवालयालाच दिले.
सत्यनारायण चांडक यांनी, लग्नानंतर 35 वर्षांनी का होईना, हुंडा परंपरा चुकीची असल्याचं मान्य केलं. हुंड्याची रक्कम परतही केली.
लग्नात हुंडा घेणार्‍यांनो, कराल का तुम्ही त्यांचं अनुकरण? 

- बाळासाहेब काळे.

Posted by Navi Umed at 00:34 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Parbhani

Thursday, 7 December 2017

लहान वयात भक्तीचा मार्ग धरणं, सत्तरीपर्यंत निभावणं! विलक्षणच.

 साठ वर्षांपूर्वीचं कुरुंजी डोळ्यासमोर आणूया. रस्ते नाहीत. प्रवास फक्त भाटघर धरणाच्या पाण्यातून, लॉन्च आणि होड्यातूनच. घनदाट जंगलाचा परिसर. अर्थातच वीज नाही्च. गावात नदीजवळ देवीचं देऊळ होतंच. मूर्ती म्हणून एक मोठा दगड उभा असलेला. देवळात दिवा लावायला एकजण रोज यायचा, तेवढंच. बाकी कुणीच नसायचं. या दिवा लावणाऱ्या माणसाला जाणवायला लागलं होतं, की देवळात कुणाचा तरी वावर आहे. कोण ते मात्र दिसेना. एके दिवशी तो दिवा लावल्यावर बाहेर लपून बसला. थोड्या वेळानं देवळात मूर्तीच्या मागून एक तेरा चौदा वर्षांची पोरसवदा मुलगी पुढे आली. आणि इथून सुरू झाली मठातल्या अनसुयाबाईंची विलक्षण कहाणी.
या जेजुरीत राहणाऱ्या मुलीचे आईवडील रीतीप्रमाणे तिचं लग्न ठरवत होते. पण भक्तीमार्गाकडे ओढ असलेल्या अनसूयेला ते पसंत नव्हतं. कुरुंजीत नलावडे आहेत. तीही नलावड्यांचीच. त्यामुळं ती जेजुरीतून थेट कुरुंजीला पोचली आणि देवळात आसरा घेतला. आईवडील तिची समजूत घालायला आले. पण ही मुलगी गेली नाही. तिथंच जंगलात देवाची उपासना करत राहिली.
कुरुंजीत आम्ही पहिल्यांदा जाताना पोळीभाजीचा डबा घेऊन गेलो होतो. रस्त्यात कुरुंजी मठ अशी पाटी दिसली. आत वळून मठापर्यंत गेलो. बाईंचा कुणी मदतनीस होता. त्यानं देवळात जेवायला बसू शकता असं सांगितलं. आम्ही डबे उघडले. थोड्याच वेळात तोच मदतनीस भाकरी, भाजी आणि लोणचं घेऊन आला. बाईंनी पाठवलंय असं सांगितलं.

जेवण झाल्यावर आम्ही बाईंच्या निवासात गेलो. भगवी वस्त्रं नेसून केस डोक्यावर बांधून बाई जमिनीवर बसल्या होत्या. पंच्याहत्तरीच्या असाव्यात. म्हातारपणामुळं चालणं जमत नव्हतं. कसंनुसं सरकत चालायच्या. त्यांच्या गरजेच्या वस्तू जमिनीवरच पसरून ठेवलेल्या. त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांच्या बोलण्यातून विरक्ती जाणवत होती. सहजपणे रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर अश्या संतांची वचनं त्या सांगत होत्या. मठात बरीच झाडं, भाज्या लावल्या होत्या. गावापासून दूर, जंगलात, नदीपलीकडे त्यांचा मठ आहे. परवापरवा पर्यंत एकट्याच रहात. आता तब्येत नादुरूस्त झाल्यामुळे कुणी ना कुणी भक्त सोबतीला मदतीला असतात. गावातल्या लोकांना बाईंबद्दल प्रेम, आदर आहे. त्यांच्याबद्दलच्या गोष्टी लोक खूपच आस्थेनं सांगतात.
अनसूयाबाईंना गावातल्या काही लोकांनी जागा दिली. तीच मठाची जागा. तिथं जमिनीखाली एक गुहा आहे. बाईंनी चार वर्ष या गुहेत राहून तपश्चर्या केली. रोज भल्या पहाटे चार वाजता त्या नदीत अंघोळीसाठी उतरत. नंतर दिवसभर गुहेत तपश्चर्या. तेजूची आज्जी मठातल्या बांधकामाच्या वेळी मजुरीला होती. तिने हाताचा पंजा नागाच्या फण्यासारखा वाकवून दाखवत, गुहेच्या तोंडाशी ‘हा’ त्यांच्या रक्षणासाठी बसायचा असंही सांगितलं होतं. खाली गुहेत बसूनही अनसुयाबाईंना बांधकामाचं किती सामान संपलं, किती शिल्लक आहे हे अचूक माहीत असे, हे तेजूच्या आज्जीने सांगितलेलं. अनसुयाबाई पूर्वी तरुणपणी गौराईच्या सणात गौराईचे खेळ खेळायला गावात येई. खेळ मनसोक्त खेळून झाले की एकटीच कंदील घेऊन अपरात्रीची पण निर्भयपणे जंगलातल्या मठात चालत जाई.
एकदा एक शिपाई वाईट इच्छा धरून बाईंकडे गेला. बाईंनी त्याच्याबरोबर धरणात पोहण्याची शर्यत लावली आणि तो पाण्यात बुडून मेला ही गोष्टसुद्धा कानावर आलेली
बाईंचे भक्त भरपूर आहेत, असं ऐकण्यात आलं होतं. त्या वेगवेगळ्या गावात कीर्तनं करायल जात असत. खूपदा, बसमध्ये भेटणारे लोक, कुरुंजी म्हटल्यावर, मठावरच्या बाईंची खुशाली विचारतात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं म्हणाली, मठावर जाऊया. मग धरणाच्या वाळलेल्या पात्रातून चालत आम्ही मठावर गेलो. बाई बाहेर अंगणात बसल्या होत्या. मुलांनी त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. त्या खूप प्रेमानं बोलल्या. त्यांनी मुलांना लिंबाचं सरबत करून दिलं. मुलांनी त्यांना काय मदत पाहिजे ते विचारलं. बागेची थोडीफार सफाई केली. मठाचं कुंपण काही ठिकाणी मोडलं होतं. ते पुन्हा येऊन दुरुस्त करू असं मुलांनी आश्वासन पण दिलं. मुलं आणि बाई यांचा चांगला संवाद सुरू होता. मी सार्थककडे कॅमेरा देऊन फोटो काढ असं सांगितलं. फोटो काढणार म्हटल्यावर बाईंनी बाजूला पडलेली ओढणी डोक्यावर पांघरून घेतली आणि मुलांना प्रेमानं जवळ घेऊन फोटो काढून दिला.
या मनस्वी अनसुयाबाईंचं गेल्या रविवारी देहावसान झालं.
एका मुलीनं एवढया जुन्या काळात लहान वयात भक्तीचा मार्ग धरणं, त्यासाठी एवढं धाडस करणं आणि ते सत्तरीपर्यंत निभावणं! विलक्षणच.
रंजना बाजी 
Posted by Navi Umed at 21:34 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Pune

Tuesday, 5 December 2017

प्रथमेशची राॅकेटझेप

प्रथमेशच्या अद्वितीय यशाची बातमी मिळताचक्षणी त्याला भेटण्याची उत्सुकता वाटली. क्षणात फोन करून मी त्याच्याशी भेट ठरवली. मीही काल दुपारी तीन वाजता पवईत पोचले. मला नेण्यासाठी स्वत: प्रथमेशच आला होता. अरूंद गल्ल्यांतून वाट काढत, फक्त एकच व्यक्ती कशीबशी उभी राहू शकते, अशा ठिकाणी पोचलो. इथेच त्याच्या छोट्या घरात एक पलंग आणि त्याच्यासमोर किचन. प्रलंगाला लागूनच एक खिडकी आणि खिडकीत प्रथमेशची अभ्यासाची पुस्तकं. गेली पंचवीस वर्ष इथे रहाणा-या प्रथमेशने अवकाशालालाच गवसणी घातली आहे. त्याची, भारत सरकारच्या इस्रो (Indian space research organisation) या अवकाशसंशोधन संस्थेत शास्त्रज्ञ या पदासाठी निवड झाली आहे. या पदासाठी मुंबईतून निवडला गेलेला तो पहिला विद्यार्थी. इस्रोमध्ये प्रवेश करून त्याने गरूडझेपच नव्हे, चक्क रॉकेटझेप घेतली आहे

प्रथमेशचा इस्रोपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. प्रथमेशचे वडील सोमा हिरवे हे मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक, आई गृहिणी, लहान भाऊ बारावीत आहे. प्रथमेशचं शालेय शिक्षण पवईच्या मिलिंद विद्यालयात झालं. त्याला दहावीत ७७.५३ टक्के गुण मिळलले. वडिलांनी कलचाचणी करवून घेतली तेव्हा तज्ज्ञांनी त्याला कलाशाखेकडे जाण्याचं सुचवलं. प्रथमेशने मात्र इंजिनिअर बनण्याचाच दृढ निश्चय केला होता. विलेपार्ल्यातल्या भगुभाई मफतलाल पाॅलिटेक्निकमध्ये २००७ मध्ये त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. 

दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे सुरूवातीला त्याला इंजिनिअरिंगचे इंग्रजी भाषेतलेले धडे समजणं कठीण जायचं. मात्र तिथल्या प्राध्यापकांनी प्रथमेशला इंग्रजी वाचनाची आवड लावून त्याची ही अडचण दूर केली. ८४ टक्के मिळवून महाविद्यालयात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीतून तो दुसरा आला.
एल अँड टी स्वीच गिअर अाणि टाटा पाॅवर या कंपन्यांमध्ये त्याने वर्षभर इंटर्नशिप केली. एल अँड टीमधील अन्वेष दाससरांनी डिप्लाेमावर अवलंबून न राहता पुढे शिकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नवी मुंबईच्या श्रीमती इंदिरा गांधी काॅलेज अाॅफ इंजिनिअरिंगमधून २०१४ मध्ये पदवी संपादन केली. पदवीत मुंबई विद्यापीठातून २५व्या रँकने उत्तीर्ण झाला.
पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रवेशपरिक्षांची तयारी करण्यासाठी हैदराबादच्या ‘एसीई इंजिनिअरिंग अकॅडमी’ या संस्थेत प्रवेश घेतला. त्याचबरोबर देशपातळीवर घेतलेल्या जाणाऱ्या विविध स्पर्धापरिक्षांची तयारीही सुरू केली. पण त्याला इस्रोबद्दल जास्त आकर्षण असल्याने त्यानेे याच परिक्षेवर जास्त भर दिला.
पहिल्याच प्रयत्नात, इस्रोच्या प्रवेशपरीक्षेत संपूर्ण भारतातून दुसरा येऊनही केवळ एकच पद उपलब्ध असल्याने त्याची निवड हाेऊ शकली नाही. मात्र जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत त्याने या वर्षीच्या मे महिन्यात पुन्हा परीक्षा दिली. यावेळी ९ जागांसाठी १६ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. नोव्हेंबरमध्ये परीक्षेचा निकाल लागला आणि त्याची इस्रोमध्ये निवड झाली. 
प्रथमेशची आई म्हणाली, "मी फार काही शिकलेली नाहीये. मला कळत नाही की माझ्या लेकराने नक्की काय यश मिळवलं. मी त्याला वेळेवर खाऊपिऊ घातलं." त्याचे वडील म्हणाले, "तो देशातील अनेक मुलांन मध्ये पहिला आला एवढंच कळलं."
जिद्द, चिकाटी आणि एकाग्रता यामुळे यशाआड येणा-या सर्व अडथळ्यांवर मात करता येते, याचं लखलखीत उदाहरण म्हणजे प्रथमेश. 
प्रथमेश म्हणाला, "समस्यांपेक्षा आपलं साहस मोठं असतं. जीवनात समस्या नेहमी येतच राहणार. आपण त्यावर मात करत राहायचं."
Posted by Navi Umed at 23:29 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Mumbai

जे विकतं तेच पिकवा

"जे विकतं तेच पिकवा, तरच शेती फायद्याची ठरेल." शेतकरी सखाराम शिंदे सांगत होते. बीडपासून दहा किलोमीटरवर शिवणी गावाच्या टोकाला शिंदे यांची शेती आहे. त्यांच्या शेतात जायला डोंगराच्या पायथ्यापासून रस्ता धरावा लागतो. पण एकदा त्यांच्या शेतीत फेरफटका मारला की प्रवासाचा सगळा शीण निघून जातो. शिवाय एका जिद्दी शेतकऱ्याच्या प्रयत्नांचं दर्शन घडतं.
शिंदे यांच्या शेतीप्रयोगाला सुरवात झाली, १९८९ पासून. त्यावेळी त्यांनी दोन एकरात निलगिरीची झाडं लावली. परंतु कोणी तरी त्यातली काही झाडं जमीनदोस्त केली. पण शिंदे खचले नाहीत. त्यांनी निलगिरीत बांबू आणि सागवान हे आंतरपीक घेतलं. ही सगळी झाडं त्यांच्या मेहनतीने बहरली. वृक्षलागवडीसाठी त्यांना १९९४ मध्ये, शासनाकडून ‘वनश्री पुरस्कार’ मिळाला. नवनवी माहिती घेण्याच्या सवयींमुळे ते डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या सानिध्यात आले. दोन एकर डोंगराळ जमीन विकत घेत त्यांनी तिथं डाळिंब लागवड केली. जवळपास दहा वर्षं त्यांची शेती डाळिंबाच्या बागेमुळे तरली. पण त्यावर रोग पडल्याने संपूर्ण बाग मोडून काढावी लागली. तरीही खचून न जाता शिंदे यांनी, नव्या जिद्दीने डाळिंबाऐवजी फुले सरबती या वाणाच्या लिंबाची बाग लावली. सध्या त्यांच्याकडे लिंबाची २०० तर मोसंबीची ११ झाडं आहेत. त्यातून चांगलं उत्पन्न मिळू लागलं आहे. शेवगा, केसर आंबा, सिताफळ ही झाडंही त्यांच्या शेतात आहेत. 














लिंबू पिकामुळे त्यांचं लिंबू वर्गातील ‘गळलिंबू’ आणि ‘पामेलो’ या वनस्पतीकडे लक्ष गेलं. जेमतेम शालेय शिक्षण घेतलेल्या शिंदे यांनी इंटरनेटच्या माध्यमातून या दोन्ही झाडांची माहिती घेतली. सुरवातीला गळलिंबुची झाडे लावली. त्याला आता फळधारणा होत आहे. मुतखडा, पोटाच्या विकारावर गळलिंबू उपयुक्त असल्याने त्याला अगदी पुण्यातून सुध्दा मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल शंभर रुपयाला एक या भावाने पुण्याच्या मार्केटमध्ये हे गळलिंबू विकलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पामेलो हे लिंबूवर्गीय झाडदेखील त्यांनी शेतात लावलं आहे. त्यालाही आता फळधारणा झाली आहे. पामेलो या फळाचा उपयोग उत्साह वाढवणे, मूत्रमार्ग विकार, पित्तविकार आणि स्वादुपिंडाची क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. लोकांची मागणी असलेलं पीक घेतलं तर शेतीत नुकसान होत नाही. त्यामुळे जे परंपरेने पिकतं ते विकू नका, तर जे विकलं जाऊ शकेल तेच पिकवा असा सल्ला सखाराम शिंदे शेतकऱ्यांना देतात .
- राजेश राऊत.

Posted by Navi Umed at 21:54 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Beed

Monday, 4 December 2017

खादीचे चाहते असलेले झाडवाले बाबा



ते स्वतः चरख्यावर सूत कातून त्याचेच कपडे वापरतात. स्नानासाठी स्वतः तयार केलेला साबण वापरतात. स्वतःचे कपडे धुतात. दंतमंजनही घरीच तयार करतात. स्वतःच्या लग्नातही त्यांनी खादीचेच कपडे घातले. शिवाय वधूलाही खादीचीच साडी घेतली. लग्नात हुंडा घेतला नाही. वयाच्या ६७ व्या वर्षीही त्यांना चष्मा लागलेला नाही. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी कोणत्याही प्रकारचे औषध घेतलेलं नाही. हे हिंगोलीतले दादाराव शिंदे. सेवानिवृत्त शिक्षक. १९५० सालचा जन्म. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी खादीचा अंगीकार करून निर्व्यसनीश, स्वावलंबी जीवन जगण्याचा निर्धार केला. 



जयप्रकाश नारायण यांच्या विचाराने प्रेरित होऊन दादाराव शांतीसेनेत सहभागी झाले. वसमत येथील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या प्रेरणेने त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. त्यांचं मूळ गाव बाभळी ता.कळमनुरी. इथल्या व्यसन सोडून देणाऱ्या व्यक्तीस ते एक हजार रुपये बक्षीस देतात. आतापर्यंत त्यांनी १२ जणांना असं बक्षीस दिलं आहे. शिवाम्बू चिकित्सा पद्धतीचे ते प्रखर समर्थक आणि प्रचारक. मानवी मुत्राचे अभ्यासक. या बाबत १९९९ साली, मुंबईतल्या राज्य विज्ञान प्रदर्शनात विविध प्रयोग सादर केले होते. २००० साली कोल्हापूरला झालेल्या इंटरनॅशनल वर्कशॉप ऑफ नॅचरोपॅथी अँड शिवाम्बू या जागतिक परिषदेत ते निमंत्रित होते.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांची ‘स्वदेशी तज्ञ’ म्हणून सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यक्षपदी त्यांनी काम केलं आहे.
सध्या पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनासाठी दादाराव कार्यरत आहेत. हिंगोली शहरात स्थानिक रहिवाशांसह त्यांनी वृक्षारोपणाचं काम हाती घेतलं आहे. या कार्यात त्यांनी आतापर्यंत एक हजाराच्या वर झाडांची लागवड केली आहे. झाडांचं संगोपन व संवर्धन चांगल्या रीतीने होण्यासाठी त्या झाडांना संरक्षक जाळ्या लावण्यासाठीही ते पुढाकार घेतात. या कामामुळे त्यांची ‘झाडवाले बाबा’ अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला ते एक झाड लावतात. अतिशय साधी राहणी असलेले निरोगी, आनंदी दादाराव शिंदेे. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.

- गजानन थळपते.
Posted by Navi Umed at 20:53 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Hingoli

Sunday, 3 December 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


आपल्या मेंदूमध्ये सदासर्वकाळ विद्युतरासायनिक लहरी निर्माण होत असतात. हे मेंदूसाठी आवश्यक असतं. यालाच ब्रेन वेव्हज म्हणतात. ज्यावेळी मुलं किंवा मोठी माणसं गॅझेट्स हाताळत असतात त्यावेळी एरवी निर्माण होणाऱ्या मेंदूच्या लहरींपेक्षा या लहरींचा पॅटर्न वेगळा असतो. मेंदू शास्त्रज्ञांना आढळलं की, जी मुलं मोबाईलवर खूप जास्त वेळ गेम खेळत असतात त्यांच्यामध्ये त्यांना एडीएचडी (attention deficit hyper disorder)हा आजार जडू शकतो. या मुलांमध्ये एकाग्रतेची समस्या निर्माण होऊ शकते.
मुळात गॅझेट्सची सवय लागायला अनेक मानसिक कारणं असतात. परीक्षेतले कमी गुण, सततचं अपयश, आईबाबांची बोलणी खाणं, मित्र- मैत्रिणीनंबरोबर मैत्रीपूर्ण संबंध नसणं, अभ्यासाचा / नेमून दिलेल्या कोणत्याही कामाचा आत्यंतिक कंटाळा, काहीही करावसं न वाटणं, घरात किंवा आसपासच्या वातावरणात भांडण, रुसवाफुगवा, नैराश्य अशी नकारात्मकता, घरात माणसं नसल्याने आलेला एकटेपणा, आईबाबांनी टीव्ही बघू न देणं, आळस, एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये धावणं, सतत लेखन, पाठांतराचं ओझं, अभ्यास- गृहपाठ असा अतिशय व्यस्ततेचा बराच काळ गेला असेल तर थोडासा जरी मोकळा वेळ मिळाला तरी मुलं लगेच मोबाईलकडे वळतात. हेच काय ते एकमेव मनोरंजन, असं त्यांना वाटायला लागतं.
म्हणजेच, आजूबाजूच्या घटनांमधला, माणसांमधला रस कमी झाला, कोणत्याही गोष्टीबद्दल छान वाटेनासं झालं की मुलं या स्वस्त मनोरंजनाकडे वळतात. या माध्यमातून त्यांना सतत काही तरी मिळत राहतं. काही गोष्टींपासून लांब जाण्यासाठी जसा व्यसनांचा सहारा घेतला जातो, तसंच. मोबाईलचा वापर करता करता त्यात इतके गुरफटून जातात की हे योग्यच आहे, इथेच तर सगळी मजा आहे असं त्यांना वाटायला लागतं.
गॅझेट्सच्या मानसिक दुष्परिणामांच्या अशा अनेक केसेसशी संबंधित मोठ्या प्रमाणात अभ्यास आणि संशोधन होत आहे. अमेरिकन ऍकेडमी ऑफ पेडियट्रिक यांनी प्रत्येक वयोगटात किती वेळ मोबाईल हाताळावा यासाठी वेळ मर्यादा आखून दिलेली आहे. त्यानुसार दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल मुळीच द्यायचा नाही. तीन ते पाच वयाच्या मुलांना एक तासाच्या वर कोणतीही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स देऊ नयेत असं स्पष्ट केल आहे. 10 ते 18 वयोगटातल्या मुलांनी केवळ दोन तास वापरला तर हरकत नाही. तर त्यावरच्या वयोगटांना या पेक्षा थोडा अधिक काळ चालू शकतो असं सांगितलेलं आहे. पण, यापेक्षा किमान दुप्पट तरी वेळ मुलं मोबाइल हाताळत असतात .
मोठ्या माणसांनी मोबाईल हाताळला, त्यावर काही वेळापुरते गेम खेळले तर चालू शकतं. यामुळे त्यांचे ताणतणाव काहीसे कमी होतात आणि काही वेळानंतर सहजपणे मोबाईल बाजूला ठेवून ते आपापल्या कामाला लागू शकतात. परंतु मुलांचं असं होत नाही. ते मोबाइल बाजूला ठेवत नाहीत. अशी गॅझेट्स बाजूला करायचा प्रयत्न केला तर मुलं भयंकर चिडचिड करतात. तो बाजूला ठेवायला सांगितल्यानंतर त्यांना ते जमत नाही. एखादं व्यसन सोडवतांना त्या माणसामध्ये withdrowal symtoms दिसतात, तेच symptoms मोबाईल पासून मुलांना दूर करताना दिसून येतात. याचा अर्थ मेंदूने ही सवय घट्टपणे लावून घेतलेली आहे.
ऑनलाईन एक्टिविटी ही खूप वेगात चालू असते. आपण एकाच वेळेला अनेक गोष्टी हाताळू शकतो. आता तर मोबाईलमुळे एकाच वेळी whatsapp ,फेसबुक, instagram, कॅलक्युलेटर, अलार्म, बॅंक, अशा अनेक गोष्टी वेगात होऊ शकतात. ते ही बसल्याजागी ! मात्र शास्त्रज्ञांच्या मते मेंदू एका वेळी एकच काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याला जास्त कामाला लावलं तर विलक्षण थकवा येतो. चिडचिड वाढते. लहान मुलांच्या बाबतीत तर मेंदूतले पॅटर्न बदलू शकतात. म्हणूनच काही प्रमाणात इ लर्निंग आवश्यक असलं, तरी सर्रास digitization नको. यापुढच्या काळात मोबाईलसारखी गॅझेट्स महत्वाची आहेत असं मानून ती हाताळण्याचं योग्य प्रशिक्षण मिळायला हवं.
  डॉ. श्रुती पानसे


Posted by Navi Umed at 21:03 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: Online Safety
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

About Me

My photo
Navi Umed
View my complete profile

Blog Archive

  • ►  2020 (123)
    • ►  February (32)
    • ►  January (91)
  • ►  2019 (293)
    • ►  December (36)
    • ►  November (33)
    • ►  September (10)
    • ►  August (45)
    • ►  July (11)
    • ►  June (39)
    • ►  May (47)
    • ►  March (39)
    • ►  February (18)
    • ►  January (15)
  • ►  2018 (306)
    • ►  December (23)
    • ►  November (18)
    • ►  October (34)
    • ►  September (38)
    • ►  August (31)
    • ►  July (20)
    • ►  June (16)
    • ►  May (20)
    • ►  April (16)
    • ►  March (20)
    • ►  February (36)
    • ►  January (34)
  • ▼  2017 (328)
    • ▼  December (22)
      • सफर- नाशिकमधील 'प्रगत' निफाड बीटची
      • कुरुंजीतलं गमभन
      • आपल्या बाळांच्या डोळ्यांची इडापिडा टळो
      • "शेळ्याच मही बँक..."
      • मुलांनी सभोवतालातून स्वतःहून मिळवलेल्या ज्ञानावर व...
      • कुरुंजीतलं गमभन
      • मुलांनी आणलं पुस्तकांना; पुस्तकांनी आणलं मुलांना
      • वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद
      • शेतीची ‘विद्या’
      • कुरुंजीतलं गमभन :शेती आणि त्याला अनुषंगिक कामं
      • ** इंटरनेट वापरणाऱ्या जगभरातल्या प्रत्येक ३ व्यक्त...
      • गावकारभार स्त्रियांच्या हाती l त्या गावाला शुद्ध प...
      • सहजीवनाची आगळीवेगळी सुरूवात
      • वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद
      • 35 वर्षांपूर्वी घेतलेला हुंडा केला परत
      • लहान वयात भक्तीचा मार्ग धरणं, सत्तरीपर्यंत निभावणं...
      • प्रथमेशची राॅकेटझेप
      • जे विकतं तेच पिकवा
      • खादीचे चाहते असलेले झाडवाले बाबा
      • वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद
      • आदिवासी वस्तीतील आदर्श शाळेचा वस्तुपाठ- टेंभेपाडा
      • दुसऱ्या वर्षीही मांजरा नदीचं पात्र तुडूंब, ३५० हेक...
    • ►  November (25)
    • ►  October (23)
    • ►  September (26)
    • ►  August (29)
    • ►  July (30)
    • ►  June (31)
    • ►  May (16)
    • ►  April (28)
    • ►  March (29)
    • ►  February (34)
    • ►  January (35)
  • ►  2016 (39)
    • ►  December (25)
    • ►  November (11)
    • ►  October (2)
    • ►  August (1)
Picture Window theme. Powered by Blogger.