

यासाठी गावात आम्ही एक मीटिंग घेतली. पण गावकऱ्यांचं म्हणणं वेगळं पडलं. गावाला लागून एक सरकारी आश्रमशाळा आहे. गावातली मुलं पण इथेच जातात. गावकरी म्हणाले, तुम्ही इथं शाळा सुरू केली तर आमच्या गावातल्या आश्रमशाळेवर परिणाम होईल. तुम्हाला जे काम करायचे ते तुम्ही आमच्या आश्रमशाळेत करा. आम्ही होकार दिला.
दरम्यान गावात एक लहान घर भाड्यानं घेतलं होतं. मी गुरुवारी / शुक्रवारी सकाळी पुण्याहून सरळ आश्रमशाळेत जात असे. तिथून मग कुरुंजीतल्या घरी राहून शनिवारी संध्याकाळी परतत असे. शाळेत वेगवेगळ्या वर्गांबरोबर काही उपक्रम करत असे. चित्रकला, मुक्त खेळ वगैरे.
शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर मी मुलांबरोबर चालत घरी येत असे. अशा प्रकारे गावातल्या मुलांबरोबर ओळख झाली आणि माझं कुरुंजीचं घर हे गावातल्या मुलांचं हक्काचं ठिकाण झालंय. मी गावात असताना एखादं मूल बराच वेळ घरी आलं नाही तर आईवडील इथंच बघायला येतात.
कुरुंजी हे भोरपासून 40 किमीवर असलेले एक चिमुकले गाव. ऑफिशियली लोकसंख्या हजाराच्या वर असली तरी बरीच मंडळी पुण्या मुंबईत राहतात. आता राहणारी साठेक कुटुंबं आहेत. भरपूर पाऊस, भाटघर धरणाचं पाणी गावामागे असल्यामुळे निसर्गसंपन्न ठिकाण आहे. जवळपास काही उद्योग धंदे वगैरे नसल्यामुळे खूपच शांत भाग आहे. दिवसातून तीन चारदा बस येते. बाकी खाजगी जीप क्वचित. एकप्रकारचा संथपणा आहे. पावसात भात लावला जातो. दुसरे पीक नाही. सगळी कुटुंबं एकमेकांशी नात्यानं जोडलेली आहेत. त्यामुळं एक community चा फील येतो. हरिजन वस्ती वेगळी आहे. पण तसं येणं जाणं दिसतं एकमेकांकडे.
याआधी मी वीस वर्षे सामाजिक संस्थेत काम केलं होतं. पण यात गावाचा सततचा संपर्क नसे. एक तर ग्रामीण कार्यालय गावाबाहेर स्वतंत्र वेगळं होतं, दुसरं म्हणजे मीटिंग इ.साठी थोडा वेळ गावात जाऊन पुन्हा संस्थेच्या कार्यालयातच आम्ही बसत असू.

या राहण्याला दुसरेही जास्त महत्त्वाचे कारण आहे. Existential Knowledge Foundation या आमच्या संस्थेत आम्ही ‘शिकणे’ learning या विषयावर काम करतो. माणसाचं मूल किंवा कोणताही सजीव जन्मल्यापासून शिकतच असतो. कारण जगण्यासाठी ती अत्यावश्यक गोष्ट आहे. सभोवतालची परिस्थिती, माणसं मुलाच्या शिकण्यावर प्रभाव पाडत असतात. जगण्यासाठी आवश्यक skills मूल असं अनुभवातूनच शिकतं, आत्मसात करतं. मुलाला जेवढं मोकळं अवकाश मिळेल तेवढं ते बहरून येतं. पण शिक्षण फक्त शाळेशीच निगडित केल्यामुळे विशेषतः शहरात मुलांच्या सहज शिक्षणाचा संकोच होतोय.
ग्रामीण भागात मुलांना बरीच मोकळीक असते. त्यांच्या भोवती शेती, पशुपालन अशा बऱ्याच प्रक्रिया चालू असतात आणि मुलांचा त्यात अर्थपूर्ण सहभाग असतो.
त्यामुळे खेडयात राहून तिथे सहज शिकणे ( natural learning) कसे होत असते, निसर्गाला धरून कसे जगणे चालू असते, traditional wisdom वर कसा भर आहे या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करणे, प्रत्यक्ष तिथे राहून
समजून घेणे हा उद्देश्य इथे राहण्यामागे आहे.

यासाठीच प्रश्नावली, मुलाखती अश्या कृत्रिम पद्धती न स्वीकारता मी सहज पद्धतीने होणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी गप्पा, भेटी आणि निरीक्षणे यातूनच माझे शिकणे चालू राहील.
- रंजना बाजी
No comments:
Post a Comment