Wednesday 20 September 2017

‘ती’च्या उमेदकथा

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेषविद्यार्थिनींची मासिक पाळी हा विषय शाळेतल्या शिक्षिका कसा हाताळतात ते समजून घेण्यासारखं असतं. अलिकडे औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या गोळेगाव इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बघितली. तिथल्या शिक्षिका पिंकी सोनावणे भेटल्या. त्यांची कामावरची पकड चेहर्‍यावरूनच जाणवत होती. त्यांनी मासिक पाळी काळातल्या स्वच्छतेच्या व्यवस्थापनासंबंधीचं प्रशिक्षण घेतलं होतं.
प्रशिक्षणामुळे विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून गेल्याचं त्यांनी सांगितलं. युनिसेफच्या भारती सहलिया यांनी घेतलेल्या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थिनींनी मासिक पाळी काळात स्वच्छता कशी राखावी आणि या नैसर्गिक क्रियेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, कसा असावा यावर चर्चा झाली.
सोनावणेबाई प्रांजळ कबुली देत म्हणाल्या, “खरं तर मीच मासिक पाळीविषयी खरी माहिती प्रथमच घेत होते. मासिक पाळीविषयीच्या संभ्रमांपायी मीच बर्‍याचदा कामात, आत्मविश्वासात कमी पडले होते. ट्रेनिंगमध्ये या विषयावर उघड चर्चा झाली तेव्हा मलाही अवघडल्यासारखं झालं होतं. मात्र मासिक पाळीविषयीचे समज गैरसमज या विषयावर भारतीताई बोलू लागल्या तेव्हा चर्चेत रस येऊ लागला. एका वेगळ्याच विश्वासाने आतून उभारी घेतली.”
“याच गोष्टी वर्गात मुलींना सांगू लागले तेव्हा मुली अवघडल्यासारख्या झाल्या. मुलींना वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करून खुलवून पाहिलं, तरी त्या बोलायला तयार होईनात. मग मी माझे स्वतःचे अनुभव, गैरसमज याविषयी चर्चा सुरू केली. त्यानंतर मुली हळूहळू तोंड उघडू लागल्या.”
“एकीने उठून सांगितलं, "बाई प्रियंका काल खोटं कारण सांगून शाळेतून मध्येच निघून गेली. तिला पाळी आली होती. " वर्गात हशा पिकला. मी मात्र गंभीर झाले. त्याचबरोबर खजीलही. खजील अशासाठी की आपण एक स्त्री शिक्षक असूनही आपण या मुलींचे प्रश्न समजून घेतले नाहीत. त्या वारंवार सुट्टी घेतात किंवा शाळेतून मध्येच निघून जातात याचं कारण समजून घेतलं नाही. आता मात्र तसं होऊ द्याच नाही असं ठरवलं. शाळेचे मुख्याध्यापक संजय वैष्णव यांनीही प्रोत्साहन दिलं.”
“आता वर्गात खूप फरक जाणवतोय. मुली जवळ आल्यात. त्यांचा विश्वास मी संपादन केला आहे. त्या घरातल्या गोष्टीही शेअर करू लागल्या आहेत. मुलींच्या अभ्यासातून त्यांचा वाढलेला आत्मविश्वास दिसू लागलाय. मुलींच्या सूप्त गुणांना प्रकाशात आणण्यासाठी मीही प्रयत्न करते आहे. मुली खुप खुश दिसतात. आता वर्गातील उपस्थितीही वाढली आहे.”
शरीर-मनाने सुदृढ स्त्रिया ही समाजाची गरज आहे. अशा स्त्रियाच निरोगी समाज तयार करतात. मासिक पाळीतून मनुष्य जन्मतो. त्यामुळे मासिक पाळी विषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायलाच हवा. त्यातच समाजाचं भलं आहे. पिंकी सोनावणे तेच काम करत आहेत.


- पिंकी सोनावणे, प्राथमिक शिक्षिका, गोळेगाव, जि औरंगाबाद
 - लता परब

No comments:

Post a Comment