Friday 22 September 2017

मोलकरीण संघटना

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेष
“घरातील काही अडचणींमुळे मोलकरीण म्हणून काम करायला लागून आता २५ वर्षं झाली. काम करतांना लक्षात आलं की तुम्हा लोकांसारखी काम करतांनाची सुरक्षितता आम्हाला नाही. त्या विरूध्द आवाज उठवूनही १७ वर्षं झाली. या काळातल्या अथक संघर्षात घरकामगार, मोलकरणीसाठी कायदा आलाही पण आजवर त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे आजूबाजूचं वातावरण काहीसं गढुळलं आहे. मात्र पुन्हा या विरोधात एल्गार पुकारण्याची आमची तयारी आहे”, घरकामगार मोलकरणी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा संगीता उदमले हिरीरीने बोलत बोलत होत्या. 


नाशिक शहर परिसरात घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या २० ते ३० हजारांच्या आसपास आहे. असं असूनही त्यांच्या प्रश्नांविषयी, आरोग्य, कामावरील सुरक्षितता याविषयी बोलण्यास फारसं कोणी तयार नव्हतं. कामाच्या वेळा निश्चित नाहीत, प्रसुतीरजा नाही, आरोग्यसुविधा नाहीत, कामावर सुरक्षितता नाही हे सगळंच संगीता उदमले यांना जाणवलं. त्यांना नाशिक जिल्हा घरकामगार, मोलकरीण संघटनेचं सहकार्य मिळालं. आणि त्यांनी २००७ मध्ये या विरोधात आवाज उठविला. महिलांना संघटित करण्यास सुरूवात केली. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत असतांना घरकामगार मोलकरणी कायदा अस्तित्वात यावा यासाठी प्रयत्न सुरू केले. कधी मोर्चा, आंदोलन, निवेदन असे निषेधाचे विविध मार्ग त्यांनी अवंलबले. मात्र हे करत असतांना कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास व्हायचा. 


तुम्हाला हक्क का हवेत, सुट्ट्या का हव्यात अशी विचारणा व्हायची. यासाठी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांसह त्यांनी परिसरात बैठका घेण्यास सुरूवात केली. ‘आम्ही आमचा हक्क सरकारकडेकडे मागतो’ तुम्ही फक्त पाठिंबा द्या, या शब्दात त्यांना कामाच्या ठिकाणीही समज द्यावी लागली. त्यांच्या सततच्या रेट्यामुळे जिल्हा घरकामगार मोलकरीण संघटनेचं मंडळ आकारास आलं. मंडळात आजपर्यंत १२ हजार घरकामगारांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केल्यानंतरही त्या महिलांना ओळखपत्र मिळवून देण्यात अडचणी आल्या. अधिकाऱ्यांनी कागदपत्रासह वेगवेगळ्या कारणांनी अडवणूक केल्याचं त्या सांगतात. 




याच कालावधीत २०१२ मध्ये कायदा संमत झाला. संघटनेने याचा आनंदोत्सवही साजरा केला. मात्र पाच वर्ष उलटले तरी त्याची अंमलबजावणी नसल्याने महिलांचा धीर आता खचण्यास सुरूवात झाली आहे. “ताई, आपण भांडलो पण काय उपयोग झाला नाही” अशा शब्दात महिला सल बोलवून दाखवतात. पण संगीता म्हणतात, “खरी सुरूवात इथून पुढे आहे. आमचा कायदा तयार आहे. सरकार म्हणतो तो रद्द झाला. रद्द तर रद्द पण किमान असंघटित कामगारांच्या सुरक्षित भविष्यासाठी काय असा जाब आम्ही आता विचारणार असल्याचं त्या सांगतात.” त्यासाठी आता ‘पाठीवर हात ठेवत फक्त लढ म्हणा’ असे म्हणणाऱ्यांची गरज असल्याचं त्या शेवटी बोलून दाखवतात.

 - संगीता उदमले
- प्राची उन्मेष

No comments:

Post a Comment