Monday 25 September 2017

बचतगटामार्फत रोजगार निर्माण करून दिला

‘ती’च्या उमेदकथा – नवरात्रोत्सव विशेष

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका. इथलं तळेगाव ठाकूर गाव. येथील कल्पना दिवे यांनी बचतगटाच्या माध्यमातून एक गृहउद्योग सुरु केला. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मालाला भाव मिळावा, शेतकरी महिलांना काम मिळावं हा या बचतगटाचा उद्देश.
अल्पावधीतच त्या उदयॊगाची भरभराट झाली असून महाराष्ट्राबाहेरही त्यांच्या पदार्थांना मागणी आहे. दिवे कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच. संयुक्त कुटुंब. या कुटुंबातील पुरुष मंडळी शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. कुटुंबातील महिलांना देखील प्रयोगशीलता स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच गृहविज्ञान विषयात पदवी घेतलेल्या कल्पना दिवे यांनी गावातील 11 शेतकरी महिलांना सोबत घेतलं. आणि 2002 साली ‘गोदावरी महिला बचतगटा’ची स्थापना केली. बचत गटाद्वारे त्यांनी सुरुवातीला लोणचं बनविण्यास सुरुवात केली. सध्या या बचत गट समूहातर्फे 10 प्रकारची लोणची, तीन ते चार प्रकारचे पापड, सरबतं यासह आवळा कॅन्डीची निर्मिती करण्यात येते. या बचतगटाचा एक खास पदार्थ म्हणजे आवळा - खवा पुरणपोळी. ही पुरणपोळी सध्या संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून आता विदर्भाबाहेर तिला मागणी आहे.
जिल्हाभरात जिथे जिथे कृषी प्रदर्शनी असते तिथं या महिला आपल्या मालाची जाहिरात, विक्री करतात. महिन्याकाठी एक लाख रुपयाच्या वर गटाची उलाढाल आहे. ज्या महिलांना शेतीची कामं जमत नाहीत त्या महिलांना कल्पना यांनी शिकवलं. आणि बचतगटामार्फत रोजगार निर्माण करून दिला. त्यामुळे गावातील महिला आज आंनदी आहेत.


- कल्पना दिवे, कृषी उद्योजक.
 - अमोल देशमुख, अमरावती


No comments:

Post a Comment