
ऑनर किलिंगच्या भीषण प्रकारातून वाचलेल्या मीता आणि सीमा आज मानाचं जीवन जगत आहेत. त्यांची सत्यकथा समजून घ्यायला हवी."बरं झालं मॅडम तुम्ही या मुलीची जबाबदारी घेता आहात. नाही तर हिची रवानगी सुधारगृहात झाली असती. तिथे तिचे आणखी हाल झाले असते." असं पोलिसच म्हणाले तेव्हा मुलीला संरक्षण देण्याचं आम्ही पक्कं केलं. ऑनर किलींगची केस हाताळणाऱ्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुगन्धीताई सांगत होत्या.

भारतभर दरवर्षी एक हजाराहून अधिक ऑनर किलिंगच्या केसेस होतात. अशाच ऑनर किलिंगच्या घटना १९९९ मध्ये पनवेल आणि २००४ मध्ये वसई इथे घडल्या. मात्र तिथे 'सैराट’ इतकं भीषण घडलं नाही. मुलींच्या नातलगांनी त्यांच्याच समोर त्यांच्याच नवऱ्यांचे, नवऱ्याच्या इतर नातलगांचे जीव घेतले गेले. मात्र या घटनांमधल्या मीता आणि सीमा या मुली मागे जिवंत राहिल्या. त्यावेळी त्या कोणत्या मानसिकतेतून गेल्या असतील याची कल्पना करणंदेखील अशक्य आहे. पीडित मीता आणि सीमा या घटनेनंतर एकाकी पडल्या. अशा स्थितीत कोणीही पुढे यायला तयार नसताना देशपातळीवर महिलांच्या हक्कांसाठी लढणारी 'जनवादी महिला संघटना ' मदतीसाठी पुढे आली. संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्या सुगंधी फ्रांसिस ,सोनिया गिल आणि किरण मोघे या तिघींनी या मीता-सीमा यांची जबाबदारी घेतली.
कोर्टात केस जाताच पनवेलची मीता व वसईची सीमा यांच्या पालकत्वाचा, सुरक्षिततेचा प्रश्न पुढे आला. केसदरम्यान या मुलींच्या जिवाला धोका होता. मीताचे नातेवाईक तर ही एकटी सापडली तर हिलाही ठार करू अशी उघड उघड धमकीच देत होते. अशा वेळी कुणाला कळू न देता तिला इकडे तिकडे हलवलं जात असे. कोर्टात सुनावणीच्या वेळीही तिच्या येण्याबाबत गुप्तता पाळली जायची.

मीताला शिकवलं आणि तिचं लग्न करून दिलं. ती शिक्षिकेची नोकरी करत आहे. आपल्या कुटुंबात सुखाने राहात आहे. सीमाला तर तिच्या बाळासह स्वतः सुगंधी फ्रान्सिस यांनी सून म्हणून स्वीकारलं. दोघीही सुगंधी आणि किरण यांना आईचा दर्जा देतात. मीता-सीमाच्या मुलांच्या त्या आजी झाल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या भीषण प्रसंगाचं सावट निवळलं आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्या कृतज्ञ आहेत. .
लता परब.
No comments:
Post a Comment