Sunday 22 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का?



भाग एक
वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का आणि एकूणच इंटरनेट व्यसन आणि नवनवीन गॅझेट्च्या अतिवापराबद्द्ल पालकांना त्यांचे प्रश्न मांडायला ‘नवी उमेद’ने सांगितलं, तेव्हा पालकांचे तर प्रश्न आलेच.. पण एका टीन एजर मुलीचाही एक प्रश्न आला. तो असा होता: इंटरनेटची गरज आहे आमच्या पिढीला. तुम्ही त्याला व्यसन का म्हणताय?
या प्रश्नामध्येच या पिढीची मानसिकता, इंटरनेटच्या वापराकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन समोर आला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक आणि सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मुक्ता पुणतांबेकर यांनी याच प्रश्नाच्या उत्तरापासून बोलायला सुरवात केली.
त्या म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीचा एक वापर असतो. पण वापर, अतिवापर आणि गैरवापर यातला फरक ओळखता यायला हवा. दारूचं उदाहरणच घेऊन समजून घ्यायचं झालं तर - दारु औषधांमध्येही वापरली जाते. ती जेव्हा व्यसनासाठी वापरली जाते तेव्हा तो तिचा गैरवापर ठरतो. एखाद्या चांगल्या गोष्टीचा अतिवापर होतो, तेव्हा त्याचं रूपांतर व्यसनात होऊ शकतं. एखादी व्यक्ती दिवसभर सतत व्यायामच करत बसली तर तिला व्यायामाचं व्यसन लागलं आहे, असंच म्हणावं लागतं.
इंटरनेट ही काळाची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानाने जी क्रांती घडवून आणली ती खूप मह्त्वाची आहे. ती नाकारता येणारच नाही. इंटरनेटचा हा जादूचा दिवा आपण सगळेच जण कामासाठी, करमणुकीसाठी वापरतो. ते ठीक असतं. पण हळुहळु आपण त्याच्यावरती अवलंबून रहायला लागतो. त्याहीपेक्षा, त्याचे गुलाम बनून जातो. मग गैरवापर/अतिवापर सुरु होतो. आपलं असं झालंय का?
सुरवातीला आपण हे स्वतःच तपासून बघू शकतो. जसं, आपण १५ मि फोन जवळ नाहीये तर अस्वस्थ होतोय का? आपण सोशल साईट वर एखादी पोस्ट टाकली आहे. तर त्यावर किती लाईक्स आलेत, कमेंटस आल्यात हे दर दोन मिनिटांनी बघावसं वाटतयं का? त्यावर आपला मूड अवलंबून आहे का? या प्रयोगाचं उत्तर हो आलं तर समजावं की काहीतरी गंभीर गोष्ट आहे. इंटरनेट शाप की वरदान हे आपआपल्या बाबतीत असं तपासून बघायलाच हवं.
नव्या पिढीचं इंटरनेट ॲडिक्शन, मुलांचं इंटरनेटवेड हा काळजीचाच विषय आहे. मग पालक म्हणतात की मुलांना इंटरनेटच्या वापराचा वेळ कसा ठरवून द्यायचा? अर्थातच हे प्रत्येकाच्या कामाच्या स्वरुपावर अवलंबून असतं. पण साधारणापणे १८ वयापर्यंतच्या मुलांसाठी दिवसातला अर्धा पाऊण तास इंटरनेट वापरणं ठीक आहे. कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलांना प्रोजेक्ट्स करायची असतात, माहिती गोळा करायची असते. त्यामुळे थोडा जास्त वेळ त्यांना इंटरनेटची गरज लागू शकते. यावर संवाद हाच उपाय आहे. सुरवातीपासूनच पालकांनीच मुलांशी संवाद साधून इंटरनेटच्या वापरावर मर्यादा घालून देणं आणि स्वत:च्या वर्तनातून त्यांना त्या मर्यादांचं मह्त्व समजावून सांगणं गरजेचं ठरतं.
जेव्हा पालकांचे आम्हाला इंटरनेट ॲडिक्शनच्या समस्यांबाबत फोन येतात. तेव्हा बरेचदा आम्ही फक्त त्यांनाच भेटायला बोलवतो. त्यांचा दृष्टिकोन बघतो. त्यांच्याशी बोलतो. त्या नंतर जेव्हा त्यांच्या वागण्यात ते आमच्या टिप्सअनुसार काही बदल करतात. पालकांनी थोडा सूर बदलला तरी फरक पडतो. अर्थात त्यासाठी पालकांनीही थोडा संयम बाळगला पाहिजे. मग मुलांना आमच्याकडे घेउन यायची गरजच पडत नाही.

- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र :
 रूपाली गोवंडे

No comments:

Post a Comment