Tuesday 24 October 2017

वैद्यकीय क्षेत्रातील ‘देवदूत’

त्याचं नाव प्रल्हाद. सोलापूरच्या वैशंपायन मेडिकल कॉलेजमधून त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. आता नोकरीचा शोध घ्यायचा होता. मग आरोग्य विभागात नोकरीची जागा रिक्त असल्याचं कळलं. त्याने तशीच कागदपत्रं पिशवीत टाकली. आणि ती नोकरीसाठी मुंबईत धावला. सरकारी नोकरी मिळालीही; पण कुठे तर सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण रुग्णालयात. साल होतं १९९०. तसंच काही न खाता-पिता त्यांनी एसटी पकडली आणि सिंधुदुर्ग गाठलं. एव्हाना रात्र पडली होती. फरशी हॉटेल्स असण्याचा तो काळी नाही. असतील तरी हातात पैसा नाही. मग, बसस्थानकाच्या कठडय़ावरचं त्यांनी झोप घेतली. इतकी वाईट परिस्थिती असतानाही आपल्याला नोकरी मिळणार या आनंदानेच हे डॉक्टर सिंधुदुर्गात रूजू झाले. तिथं चार महिने काम केल्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांची बदली झाली.
आणि आतापर्यंतच्या 25 वर्षात हजारों रूग्णांचे ‘देवदूत' ठरले. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.प्रल्हाद देवकर यांची ही गोष्ट.


मध्यंतरी रत्नागिरीत काही शाळांमध्ये आरोग्य तपासणी झाली. या तपासणीत जवळपास 200 मुलांमध्ये अपेंडीक्स, हर्निया, हृदयाला छिद्र, पायामध्ये गाठ अशा विविध गंभीर आजारांचं निदान झालं. या सर्व शस्त्रक्रिया मोजक्या काही दिवसांत डॉ. देवकर यांनी यशस्वी केल्या. इतकंच नाही तर, गेल्या 20-22 वर्षाच्या कालावधीत देवकर यांनी 15 हजाराहून अधिक शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत केल्या आहेत. त्यामुळेच आज डॉ.देवकर हे सर्वसामान्य गरीबांसाठी तर रत्नागिरीचे ‘देवदूत' ठरले आहेत.
कामाची दखल म्हणून ‘दि प्राईड ऑफ इंडिया’चा ‘भास्कर अवॉर्ड’ही त्यांना मिळाला आहे. आजही 12 तासाहून अधिक काळ ते शासकीय रूग्णालयात काम करत असतात. रत्नागिरी शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोठा तुटवडा आहे. आणि दररोज उपचारासाठी भरती होणाऱ्यांची संख्या मात्र वाढतीच आहे. सिव्हील सर्जन म्हणून काम करताना एखादा गंभीर रूग्ण दाखल झाल्यानंतर डॉ.देवकर त्या रूग्णाची तपासणी करतात. हे करतानाच रूग्णालयाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठीही धडपडतात. त्यातूनही महिन्याला 100 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करून त्यांनी रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे.
अतिशय साधी राहणीमान आणि रूग्णांप्रती असलेली तळमळ यामुळे ते रूग्णांचे देवदूतच ठरले आहेत. खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी हजारो रुपये घेतले जातात म्हणून रूग्ण शासकीय रूग्णालयात येतात. अशावेळी ड्युटी संपली असली तरी ते रूग्णांसाठी थांबून उपचार करतात. एकाच दिवशी दहा-पंधरा शस्त्रक्रियाही डॉ.देवकर यांनी केल्या आहेत. हे सगळं करत असताना त्यांनी कोणताही गाजावाजा केलेला नाही. सकाळी लवकर हॉस्पीटल गाठायचं आणि रात्री उशीरापर्यंत थांबायचं हा त्यांचा ठरलेला दिनक्रम. डॉक्टर म्हणतात, “लोकांच्या प्रोत्साहनामुळे आणि सहकार्यामुळे मी न काम थकता करू शकतो”.
डॉ.प्रल्हाद देवकर


जान्हवी पाटील.

No comments:

Post a Comment