साताऱ्यातील माण तालुका. इथल्या भालवडीतील जिल्हा परिषद शाळा. इतर शाळांप्रमाणे त्यांच्याही शाळेत ‘मीना- राजू’ मंचाचा उपक्रम सुरू आहे. त्यात शिवीबंद अभियान, बालकांचे अधिकार, माझं शरीर- माझा अधिकार अशी वेगवेगळी सत्रं देशपांडे मॅडम घेतात. मीना- राजू मंच मुलांच्या मनावर कसा ठसला आहे, याविषयी शाळेतील सुगमकर्त्या ओनस्वी देशपांडे सांगतात.

देशपांडे मॅडम यांनी हा उपक्रम तसेच इतर अनेक सत्रं उत्तमप्रकारे घेतली होती. वेळोवेळी मुलांचे फोटो, मुलांनी केलेले लिखाण, गटचर्चांचे फायलिंग त्यांनी करून ठेवले होते. पण अचानक 2016 च्या मे महिन्यात भालवडी गावात अवकाळी पाऊस कोसळला आणि शाळेची अवस्था दयनीय झाली. शाळेचा पत्रा उडून गेला, फोटो आणि फाईल्स भिजल्या, त्यावर दगड माती कोसळली. हे पाहून विद्यार्थ्यांना आणि मॅडमनाही खूप वाईट वाटलं.
काही दिवसांनी या मीना- राजू मंचाचे काम पाहण्यास काही कार्यकर्ते आले, तेव्हा त्यांना दाखविण्याजोगे आपल्याकडे काहीच नाही, असं मॅडमना जाणवलं. त्याचवेळी मुलांनी मात्र, ‘आम्हांला मॅडमनी शिकविलेलं सगळं लक्षात आहे, काहीही विचारा’ असं आवाहन पाहुण्यांना केलं. आनंदाची गोष्ट म्हणजे ‘माझं शरीर- माझा अधिकार’ या सत्राचं सार अक्काताई नावाच्या मुलीने अगदी एका ओळीत सांगितलं, “माझ्या शरीरावर फक्त माझाच अधिकार आहे, माझ्या परवानगीशिवाय मी कोणालाही स्पर्श करू देणार नाही. कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मी विरोध करेन” अक्काचे उत्तर ऐकून कार्यकर्तेही थक्क झाले. इतर मुलांनीही फार चांगली उत्तरं दिली.
त्यामुळे “कसलंही फायलिंग उपलब्ध नसलं, तरी तुमची हुशार मुलं हाच तुमच्या शिकवण्याचा सर्वात चांगला पुरावा आहे” असा शेरा देऊन ते निघून गेले. ‘मीना- राजू मंचाच्या’ उपक्रमामुळे असे छोटे- मोठे बदल घडून येत आहेत. मुला-मुलींमधे आत्मविश्वास आणि आत्मभान जागृत करण्यासाठी अशा उपक्रमांचा फायदा होतो आहे.
(लेखातील काही मुलींची नावे बदललेली आहेत.)
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.
No comments:
Post a Comment