तृतीयपंथी म्हटलं की, समाज अशा व्यक्तींकडे वेगळ्या नजरेने पाहतो. त्या व्यक्तीला व कुटुंबाला अनेक यातनाही सहन कराव्या लागतात. ज्ञानेश्वर शंकर कांबळेही त्याला अपवाद ठरला नाही, तृतीयपंथी असल्याचं निष्पन्न झाल्यावर १४ व्या वर्षी साडी घालायला सुरूवात केली. त्यावेळी गावापासून, दहा किलोमीटरवर मगराचे निमगाव गावात त्याने आसरा घेतला. या गावातील लोकांनी त्यास रहायला जागा देऊन, देवाचा जोगती म्हणून सांभाळून घेतले. शेळ्या, मेंढ्या, जनावरे राखत तो आपली उपजीविका भागवत होता. २००० सालापासून तो पुन्हा गावात येऊन राहू लागला. गावातील लोकांनी त्यास रहायला जागा दिली आणि तो पुन्हा समाजाशी जोडला गेला. तो म्हणतो, “तृतीयपंथी व्यक्तीने आपले कुटुंब, समाज सोडू नये”. ग्रामीण भागात आठवडी बाजारात जाऊन लोक देतील तेवढे दान घेणे व परत आपल्या घरी येणे, हा त्यांचा नित्यक्रम. परंतु, तरंगफळ गावात माऊलीने कधीच कुणाला त्रास दिला नसल्याचे, विरोधी गटातील गावकरीसुध्दा मान्य करतात. माऊली गावकऱ्यांच्या कुठल्या ही मदतीला नेहमी धावून जातो. गावात चांगला परिचित असल्याने तो एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आला असल्याचं गावकरी सांगत होते. एक तृतीयपंथी सरपंच गावाने निवडून दिला, याचा अभिमान अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याचं शिक्षण जेमतेम सातवी. पण, शिक्षण कमी असले तरी गावासाठी काहीतरी करण्याची धमक त्यांच्या बोलण्यातून जाणवते. हगणदारी मुक्त गाव संकल्पना राबविणार असल्याचं ते सांगतात. गावातील राजकारण बाजूला ठेवून अंतर्गत गटारी, रस्ते, स्वच्छता, पिण्याचा पाण्याची सोय अशी कामं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तृतीयपंथी वर्गाला समाजात हिणवले जाते. मात्र अशा व्यक्तीस तरंगफळ गावाक-यांनी आपला कारभारी म्हणून, ज्ञानेश्वर कांबळे यास निवडून देऊन आदर्श निर्माण केला आहे.
तृतीयपंथी समाजाबद्दल बोलताना ते म्हणतात, “या समाजातील वर्गाला मान सन्मान मिळत नाही. या समाजातील व्यक्ती वाम मार्गाला लागून व्यसनांच्या आहारी गेले आहेत. त्यांचाशी भेदभाव न करता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजे आहे.” आम्हांला कुठे तरी हक्क मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. “गावासाठी आपण काही तरी करावं. आणि तृतीयपंथी व्यक्तीने मुख्य प्रवाहात यावं, समाजापुढे एक आदर्श निर्माण व्हावा, म्हणून सरपंचपदाची निवडणूक लढवली असल्याचं माऊली सांगतो
- गणेश पोळ.
No comments:
Post a Comment