Wednesday 10 January 2018

घरकुल: बर्वे पतीपत्नींच्या जगण्याचा विस्तार

घरात मूल जन्माला येणं किती आनंदाचं असतं. ते मूल सुदृढ, निरोगी असेल, हे गृहीत धरून आपण स्वप्न बघत असतो, बाळाच्या जन्माची तयारी करत असतो. आपलं मूल मतिमंद आहे, असं जेव्हा नंदिनी आणि अविनाश बर्वे यांना कळलं, तेव्हा काय झालं असेल त्यांना? नंदिनी यांनी लिहिलंय, की जीवन संपवूनच टाकावंसं वाटलं त्यांना. पण जीवन संपवून टाकणं सोपं नसतं. मतिमंद कौस्तुभसह जगणंही सोपं नव्हतंच. बर्वे दांपत्याने या व्यक्तिगत प्रश्नाचा व्यापक विचार केला. आणि दिवंगत मेजर ग. कृ. काळे यांच्या प्रेरणेने, अनेक पालकांच्या मदतीने त्यांनी, त्यांच्या कौस्तुभसारख्या मुलांसाठी वसतिगृह उभारायचं ठरवलं. मतिमंद पाल्यांच्या पालकांनी एकत्र येऊन १९९१ साली अमेय पालक संघटना हा ट्रस्ट स्थापन केला. डोंबिवलीपासून ७-८ किलोमीटर अंतरावरच्या खोणी गावात सव्वा एकर जागा घेतली. इथेच १९९६ साली, घरकुल सुरू झालं. बर्वे पतीपत्नींचं जगणं थांबलं नाही, विस्तारलं.
मतिमंदत्व हे अपंगत्वाच्या अन्य प्रकारांपेक्षा वेगळ्या प्रकारचं आहे. अन्य अपंग मुलं शिक्षण, प्रशिक्षण, सहाय्य याद्वारे पुष्कळशी स्वावलंबी होऊ शकतात. ‘समजणं' ही प्रक्रियाच मतिमंदांच्या बाबतीत होत नसल्याने पालकांना कायमच यांची काळजी घ्यावी लागते. मतिमंदत्व तीव्र असलेल्यांचा तहहयात सांभाळ करणं भाग असतं. हे जाणून घरकुल वसतिगृह सुरू केलं गेलं. या घरकुलात जिव्हाळ्याचं घरपण किती आहे, ते तिथे भेट दिल्यावरच कळतं.
सध्या संस्थेत तीस मतिमंद आहेत. अगदी वीस ते साठ वयोगटातली. मुलांचा सांभाळ, अंघोळ घालणं, जेवूखाऊ घालणं, त्यांचं हगणंमुतणं असं सगळंच घरकुलातले कर्मचारी अगत्याने करतात. सामान्य माणसासारख आयुष्य या मतिमंदांना देण्याचा प्रयत्न करतात. खेळ, अभ्यास, चित्र काढणं, गाणं, नाटक हा इथल्या दिनक्रमाचा भाग आहे.. इथे सांभाळणार्‍यांबद्दल मुलांच्या मनात आदर आणि प्रेमाची भावना असते. संस्थेत काम करणाऱ्यांचं कौतुक करावं तेवढ कमीच.
इथल्या पाल्यांचा काही खर्च पालक उचलतात, तर बाकीचा खर्च संस्था करते. संस्था आर्थिक मदतीसाठी कोणत्याही बड्या व्यक्तीकडे जात नाही. आपले नातेवाईक, मित्रपरिवार अशा अनेक मार्गातून आर्थिक मदत मिळते. संस्थेत कुणी लहानमोठं नाही. इथे सगळे समान आहेत. ज्या व्यक्तीच्या मनात अशा कामाबद्दल सद्भावना असेल त्या सगळ्या व्यक्तींचं या संस्थेत स्वागत आहेच. शासनाच्या अनुदानाशिवाय हा उपक्रम उभा आहे कारण सुजाण, संवेदनशील हितचिंतक संस्थेस लाभले आहेत. घरकुलाच्या दोन दशकांच्या वाटचालीत ज्यांची ही समस्या नाही, असे अनेकजणही जोडले गेले.
घरकुल आतून बाहेरून प्रसन्न करणारं आहे. गवताची काडीसुद्धा नव्हती, त्या जागेवर आज शंभर वृक्ष आहेत. दोन मजली इमारत, बाग, पटांगण, मुलांसाठी प्रशस्त खोल्या, कार्यक्रमासाठी स्टेज असं सुविधासज्ज घरकुल. विविध भागातले लोक घरकुलला भेट दयायला येतात. कुणी वाढदिवसाला, कुणी मैत्री व्हावी म्हणून, तर कुणी आपल जीवन सार्थक करण्यासाठी जेष्ठ नागरिकांपासून कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत. जैन हॉस्पिटलचे डीन डॉ अविनाश, सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे यांनीदेखील भेट दिली आहे. अलिकडेच लुब्रीझॉल कंपनीने संस्थेला 15 लाखांचा सौर ऊर्जा प्रकल्प व मुलांसाठी एक गाडी दिली.
लोकसंख्येमध्ये मतिमंदत्वाच्या प्रमाणाच्या मानाने निवासी वसतिगृहांची संख्या अत्यल्प आहे. तेव्हा अशा पालकांनी एकत्र येऊन परिसरातील अशा मुलांसाठी आपआपल्या विभागात काम करण्याची गरज आहे, असं बर्वे सांगतात.
- विजय भोईर.

No comments:

Post a Comment