Tuesday 23 January 2018

घोराडचे शेतकरी इथं घडवताहेत भविष्य

जिल्हा वर्धा. तालुका सेलू. इथलं घोराड गाव. येथील काही युवकांनी एकत्र येत ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत 25 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी ‘केजाजी ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी’ची स्थापना केली. कंपनीचा उद्देश आहे, कृषी व्यवसायात खर्च कमी आणि अधिक उत्पादन मिळावं. कृषी पदवीधर व कृषी डिप्लोमाधारक युवकांनी एकत्रित होऊन कृषी उद्योग सुरू केला. यात 300 शेतकऱ्यांनी भाग घेतला. त्यांनी 10 हेक्टर शेती 25 वर्षांसाठी लीजवर घेतली आहे. त्यात सामूहिक शेती करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. धान्याची सामूहिक सफाई व प्रतवारी केंद्र त्यांनी सुरू केलं आहे. शेतकऱ्यांना लागणारी सामुग्री कमी दरात उपलब्ध करून देणे. कृषी केंद्रातून रासायनिक खतं, बियाणं स्वस्त दरात उपलब्ध करून देणे, अमोनिया ऍसिड तयार करून देणे असे कार्यक्रम त्यांनी या कंपनीतून सुरू केले आहेत. शेतकऱ्यांचा धान्य घेऊन ते ग्राहकांना देत त्यांना अधिक लाभ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता शेतकरीही त्यांना सहकार्य करू लागले आहेत.
 
 नुकतंच कंपनीला एक वर्ष पूर्ण झालं. आता शेतकऱ्यांना व्यवसायाच्या माध्यमातून थेट लाभ देण्याकरीत धान्याची विक्री करण्यात येणार आहे. सामूहिक रेशीम उद्योग, कृषी उद्योगास जिल्हाधीकारी शैलेश नवाल, तहसीलदार महेंद्र सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भरती, तहसील कृषी अधिकारी बाबुराव वाघमारे यांनी या कंपनीला भेट देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विवेक माहुरे, सचिव शैलेश राऊत यांनी ही कंपनी सुरु केली. विवेक माहुरे म्हणतात, “शासनाच्या वतीने असा प्रोजेक्ट तयार करण्याकरीता प्राथमिकता देण्यात येते. असे काही प्रोजेक्ट सुरू आहेत. याची माहिती आम्ही ‘आत्मा’चे पावन देशमुख यांच्याकडून घेतली. त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. आणि येथील प्रसिद्ध देवस्थान संत केजाजी महाराजांचे यांचे नाव देऊन आम्ही कंपनी सुरु केली. शासनाकडून 13 लाख 50 हजार अनुदान मिळालं. 4 लाख 50 हजार आम्ही जमा केले. आणि 18 लाखात कंपनी सुरू केली. शेड आणि मशीन घेतल्या. यानंतर कामाला सुरवात झाली. इतरत्र कुठं काम करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग सुरु करण्याची संधी यातून मिळाली. गटात आज 300 शेतकरी आहेत. कृषी डिप्लोमाधारक पियुष तेलरांधे हा युवक आमच्यासोबत आहे. कंपनीच्या मालाला शहरात मागणी आहे. भावही चांगला मिळतो आहे. तालुक्यात सुरू झालेली ही शेवटची ऍग्रो कंपनी. पण, एका वर्षातच कंपनीने भरारी घेतली आहे”. ते पुढं म्हणाले, “वर्धा येथे सावंगी डॉक्टर कॉलनी, बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, रेल्वे स्टेशन येथे मॉल सुरु करण्यात येणार आहे. येथे महिलांना काम करण्याची संधी देत नवीन उत्पादने तयार करण्यात येणार आहे”.
 - सचिन म्हात्रे.

No comments:

Post a Comment