Monday 8 January 2018

इंजिनिअर सरपंच




"मुलगी आहात म्हणून एखादा निर्णय घेण्यास घाबरू नका, घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. यश नक्की मिळेल. फक्त प्रयत्न करणं थांबवू नका." हे बोल आहेत ऋतुजा आनंदगावकरचे. मंजरथ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी नुकतीच तिची निवड झाली.
सरपंच थेट जनतेतून निवडून द्यावयाचा असल्याने २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणुका यावेळी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. बीड जिल्ह्यातील जनतेसाठी ही निवडणूक अभिमानाची ठरली. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून दोन इंजिनिअर तरुणी सरपंच म्हणून निवडून आल्या. फक्त महिला म्हणून नाही तर उच्चशिक्षित उमेदवार म्हणून गावाने त्यांची निवड केली आहे.


मंजरथ हे माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठचे एक संपन्न गाव. धाकटी काशी अशी या गावाची परिसरात ओळख. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदावर ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर निवडून आली. तर माजलगाव जवळील टालेवाडी गावातून सरपंच म्हणून काजल कमलाकर टाले हिची निवड झाली आहे. या दोघीही युवती इंजिनिअर आहेत. ऋतुजाने एरोनॉटिकल इंजिनिअर म्हणून पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. ती सध्या अहमदाबाद येथे एका संस्थेत एरोनॉटिकल अनालिस्ट म्हणून काम पाहते आहे. तर टालेवाडीची सरपंच झालेली काजल इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून नुकतीच इंजिनिअर झाली आहे.
ऋतुजा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून निवडून आली आहे. तर काजलने महिला सर्वसाधारण जागेवरून विजय मिळवला आहे. दोघीच्या घरी राजकीय पार्श्वभूमी असल्याने प्रतिस्पर्धींना पराभूत करणं त्यांना जड गेलं नाही. आता गावाच्या विकासासाठी हिरिरीने पुढाकार घ्यायचं दोघींनी ठरवलं आहे. ऋतुजा सांगते, “आई वडिलांमुळे आमच्या घराला राजकीय पार्श्वभूमी होतीच. सरपंचपदाची निवडणूक लढवण्याचा गावकऱ्यांनी आग्रह केला. माझी नोकरी सांभाळून मला या पदासाठी वेळ द्यायचा होता. घरातून खंबीर साथ मिळाल्याने मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मला निवडून देत गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला. समाजासाठी काही तरी केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. आता मला ही संधी मिळाली आहे. मी ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करते तेथील प्रत्येकाचा मला या निवडणुकीसाठी पाठिंबा होता. त्यामुळे तेथील काम सांभाळून मी हे सरपंच पदाचे काम करू शकेल याची मला खात्री आहे.” ऋजुता पुढं म्हणते, “मी स्त्रीवादी, समानतावादी विचारांची असल्याने सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहे. मंजरथ गावाचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याच मानस आहे. त्याचबरोबर गावातील युवक, युवतींना विविध क्षेत्रातील नोकरीच्या, कामाच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यात किती यश मिळेल हे तर येणारा काळच ठरवेल. पण मी मात्र माझं १०० टक्के योगदान यासाठी देणार आहे.”
काजल टालेवाडीची सरपंच. इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीच्या शोधात असतानाच तिला सरपंच म्हणून निवडणूक लढवण्याचा आग्रह झाला. आई, वडिलांचा पाठिंबा मिळाला. आणि नोकरीच्या शोधाएवजी तिने निवडणुकीला प्राधान्य दिलं. काजल म्हणाली की, “नोकरी केली तर मी आणि माझे कुटुंबीय एवढ्यांचा फायदा होऊ शकतो. पण सरपंच पदामुळे मला माझ्या गावासाठी चांगलं काम करता येईल. टालेवाडी या छोट्याशा गावातील रस्ते, घरकुल यासारख्या प्रश्नाकडे आपण लक्ष देणार असल्याचं काजलने सांगितलं. गावात सध्या सातवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी मुलींना बाहेरगावी जावं लागतं. किमान १० वी पर्यंत तरी वर्ग वाढवण्यास प्राथमिकता देणार असल्याचं तिने सांगितलं.” करिअर आणि सरपंच पद या दोन्ही जबाबदाऱ्या आपण समर्थपणे पार पाडू असा विश्वास दोघींच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे.
- राजेश राऊत.

No comments:

Post a Comment