Tuesday 23 January 2018

तो राजहंस एक

मुंबई स्पेशल
आपलं विशेष मुलसुद्धा इतर मुलांप्रमाणे काही तरी करू पहातंय, स्वत:ला शोधू पहातंय, निर्मितीचा आणि स्वकमाईचा आनंद घेऊ पहातंय ह्या जाणीवेचं सुखं मनिषाताईच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून जाणवतं. सोहम, मनिषा सिलम यांचा मुलगा ऑटीस्टीक आहे. ऑटीझम म्हणजे स्वमग्नता. या मुलांची समस्या म्हणजे व्यक्त होता न येणे. समोरच्यांच्या डोळ्यात डोळे घालू न शकणे. समाजाची आज सुद्धा ह्या मुलांकडे बघण्याची ना दृष्टी बदलली आहे ना दृष्टीकोण.
ठाण्यात राहणारं चार-चौघांसारखंच सिलम कुटुंब. सोहमचे वडील ओएनजीसीमध्ये तर मनिषाताई खासगी नोकरीत. सोहमचा जन्म झाला आणि पहिली चार वर्ष व्यवस्थित गेली. नंतर नंतर तो प्रतिसाद देत नाही, बोलत नाही हे जाणवू लागलं. डॉक्टर्स, वेगवेगळ्या चाचण्या, स्पेशलीस्ट या सर्व चक्रातून निदान झालं ऑटीझमचं. तोपर्यंत या कुटुंबात हा शब्दसुद्धा त्यांनी ऐकला नव्हता. सोहमची मोठी बहिण मानसी नॉर्मल होती. त्यामुळे हे काय, कसं स्वीकारावं, कसं सामोरं जावं काहीच कळत नव्हतं, असं मनीषाताई सांगतात. पण मार्ग तर शोधायला हवा, मग साधी शाळा ते विशेष शाळा करत सोहम दहावी झाला. सोहमची बुद्धिमत्ता उत्तम. पाढे, येणाऱ्या वर्षांची कॅलेन्डेर्स अगदी लीप वर्ष लक्षात घेऊन त्याने अगदी लहानपणी लिहून ठेवली होती. संगणक तर आज त्याचा मित्र झाला आहे. अत्यंत कुशलतेने तो क्विलींगच्या वस्तू बनवतो. सोहम आज २१ वर्षाचा आहे. ऑटीस्टीक ते डॉल हाउस बनवणारा कलाकार हा त्याचा प्रवास खूप काही सांगून जातो. त्याने बनवलेल्या राख्या, बाहुल्या आता साता-समुद्रापलीकडे पोहचल्या आहेत.


आपल्याला असलेली ऑटीझमची माहीती, अनुभव, इतर ऑटीस्टीक मुलं, त्यांचे पालक यांच्यापर्यंत पोहोचावी हे मनीषा यांना जाणवू लागलं. त्यातूनच २०१३ मध्ये त्यांनी फेसबुकवर 'तो राजहंस एक' हा ऑटीझम अवेअरनेस ग्रुप सुरू केला. ग्रुपने वर्कशॉपमधून मुलांना चॉकलेटस, बॉक्स, पेपर bags, ब्लॉक पेंटिंग अशा अनेक गोष्टी शिकवल्या. शाडुचे गणपती बनवून विकले. पालकांसाठीही त्यांनी शिबीर घेतलं.
यातूनच पुढं संस्था स्थापन करायची गरज जाणवली. त्यातून ‘राजहंस फाऊंडेशन’ अस्तित्वात आलं. मनीषाताईंनी या मुलांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, enter व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. ह्यात चॉकलेटस, बेकिंग, पाकीट, फ्रेम्स, करंडे, क्विलींगच्या वस्तू हे सर्व शिकवलं जातं. संगणक प्रशिक्षण दिलं जातं. मुलांनी बनवलेल्या वस्तूंचं नंतर प्रदर्शन भरवलं जातं. या मुलांनी इतरांसारखं आयुष्य जगावं म्हणून सहल, संगीत वर्ग, रेस्टॉरंट, सुपरमार्केट भेट, फनफेअर असे विविध उपक्रम घेतले जातात. विविध क्षेत्रातल्या तज्ञ, थेरपिस्टना बोलावून पालकांचं समुपदेशन केलं जातं.
ऑटीस्टीक मुलांच्या हरविण्याच्या बातम्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाला ऑटीस्टीक मुलांचे रेकॉर्ड पोलीस स्टेशनमध्ये असायला हवं असं निवेदन त्यांनी दिलं. त्यासाठी ठाण्यातील सर्व स्पेशल शाळांना भेटी देऊन ६५ च्या वर मुलांचं रेकॉर्ड पोलीसांच्या हवाली केलं.
एप्रिल महिना जगभर ऑटीझमविषयी जागृती करणारा महिना मानला जातो. दरवर्षी याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आपण आपल्या मुलाला कसं स्वीकारतो, वागवतो तसं जग त्याला वागवतं. म्हणून आपल्या मुलाला नेहेमी प्रेमाने, आदराने वागवावे. या मुलांचं जग वेगळ असतं. या मुलांना त्यांच्या पालकांना सामाजिक, भावनिक आधाराची गरज असते. ऑटीझम जागरूकता ही आजची गरज आहे, दया नको; तर मुलांचा स्वीकार ही समाजाची जबाबदारी आहे, हे मनिषाताई कळकळीने सांगतात.
- मेघना धर्मेश, मुंबई

No comments:

Post a Comment