Sunday 28 January 2018

विद्यार्थी रमले आहेत पुस्तकांत!!

'वाचेल तो वाचेल’ या सूत्रावर विश्वास ठेवणारे आपण. पण सध्या कुमार वयात असलेले किती विद्यार्थी पुस्तकं वाचतात? ज्यांच्या घरात सुशिक्षित, वाचनाचा छंद जोपासणारे आणि पुस्तके विकत घेऊ शकणारे पालक आहेत, असेच विद्यार्थी वाचनवेडाकडे वळतात. बाकीच्यांना मोहवून टाकण्यासाठी टीव्ही, इंटरनेट, मोबाईल आणि गेम्स यांचे मायाजाल आहेच. 
म्हणूनच मुलांना वाचनाच्या मोहमयी दुनियेत रमविण्यासाठी मी शाळेतील वाचनालयाचा वापर करून घ्यायचे ठरविले. वाचनालयातील पुस्तकांचे वयोगटानुसार वर्गीकरण केले, लहान मुलांसाठी परीकथा, बडबडगीते, भरपूर चित्रे असलेली पुस्तके, कोडी, बोधकथा अशी पुस्तके तर जरा मोठ्या वयोगटासाठी देशभक्त, समाजसेवक, शास्त्रज्ञ, लेखक अशा थोर व्यक्तींची आत्मचरित्रे, चरित्रे, पर्यावरण, अंतराळ, वैज्ञानिक कथासंग्रह, गाजलेल्या कथा- कादंबऱ्या, कवितासंग्रह अशा पुस्तकांचा संच वेगळा काढला.



शिवाय वाचनालयात मुलांना वाचत बसता येईल अशी आसनव्यवस्था, पुरेशा प्रकाश येईल याचीही सोय केली. दर दिवशी दोन वर्ग वाचनालयात जाऊन एक तास वाचन करतील असं वेळापत्रक आखून दिलं. दोन्ही वर्गांच्या वेळाही वेगवेगळ्या ठेवल्या. मी वर्गशिक्षिका असलेल्या वर्गाला जेव्हा प्रथमच वाचन तासिकेसाठी वाचनालयात नेलं, तेव्हा पुस्तकांची उघडी कपाटे आणि टेबलवर काढून ठेवलेली पुस्तकं पाहून मुलं खुशच झाली. पुढचा एक तास कपाटातील कोणतंही पुस्तक स्वत:च्या हाताने घ्यायची त्यांना मुभा आहे, हे कळल्यावर ती थेट टेबल आणि कपाटाकडे पळाली.




एवढ्या वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं त्यांना प्रथमच हाताळायला मिळत होती. माझ्या शाळेत येणारी बहुतांश मुलं ही शेतकरी, शेतमजूर आणि कामगार कुटुंबातील आहेत. त्यांच्या घरी म्हणावं तसं शैक्षणिक वातावरण नाही, त्यामुळे घरात पुस्तकं असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पाठ्यपुस्तकं वाचण्याचा कंटाळा करणारीही मुलं या अवांतर वाचनाच्या पुस्तकात मात्र अगदी सुरुवातीपासून रमून गेली. जादूच्या- पऱ्यांच्या जगात आणि हेलन केलर, नसीमा हुरजूक यांच्यासारख्या शारीरिक समस्यांवर मात करीत कर्तृत्त्वाची शिखरं गाठणाऱ्यांची चरित्रे वाचताना मुलांचे डोळे विस्फारत होते. मुलांना हा वाचनाचा तास फारच आवडू लागल्याने आता मुलं पुस्तकं वाचण्यासाठी घरी नेतात आणि त्याच्या नोंदीही तेच ठेवतात.
या सगळ्याचे फार सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. अभ्यासात फारशी गती नसणाऱ्या वैष्णवीने उल्कापातामुळे तयार झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे फोटो आणि माहिती आणली होती. ती माहिती मी वैष्णवीलाच वाचायला लावली. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून हजारो वर्षांपूर्वी झालेल्या उल्केच्या आघाताने बेसॉल्ट खडकात तयार झालेले सरोवर आहे. यात अनेक अनोख्या दुर्मिळ वनस्पती तसेच परिसरात वेगळे प्राणी- पक्षी आढळत असल्याने देशोदेशीचे अभ्यासक इथे भेट देतात, हे ऐकून वैष्णवीसाठी वर्गाने टाळ्या वाजविल्या. आमच्या वाचन तासिकेच्या उपक्रमामुळे मुलं दररोजचे वर्तमानपत्रसुद्धा रस घेऊन डोळसपणे वाचू लागली आहेत.
वाचनामुळे त्यांचा शब्दसंग्रह वाढतोय, त्यांना स्वत:ची लेखनशैली सापडू लागली आहे, आता निबंध लिहिण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना कुठल्याच गाईडची गरज पडत नाही, त्यांची कल्पनाशक्ती आता बहरू लागली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी चौकस बनत चालले आहेत, हेच मला वाचन तासिकेचे सर्वात मोठे यश वाटते.
रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील या वाचनवेडाच्या प्रयोगाबद्दल आमखी जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/students-discover-the-joy-of-readi…/

No comments:

Post a Comment