

हीच योजना नाशिकमधील बागलाण तालुक्यातील आमच्या शाळेत राबविण्याचे निश्चित केले. त्यासाठी शाळेच्या छताचे क्षेत्रफळ, आमच्या क्षेत्रात अंदाजे पडणारा पाऊस याचा अंदाज घेतला. सुमारे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार लीटर पाणी या प्रयोगाद्वारे एका वर्षात जमा होऊ शकते असा आम्ही कयास बांधला.
त्यानुसार 2016 च्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण सेवा योजनेद्वारे आर्थिक मदत घेतली आणि अठरा हजार रुपयांत आमच्या शाळेत जलपुर्नभरण योजना कार्यान्वित झाली.


2016 साली गणेशोत्सवाआधी नदीच्या पाण्याचा पीएच, क्लोरिन, नायट्रेट, फ्लुरॉईड यांची तपासणी आम्ही पर्यावरण सेवा योजनेद्वारे मिळालेल्या उपकरणांद्वारे केली. काही दिवसांनी गणेशविसर्जन झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांनी पुन्हा या सगळ्या चाचण्या केल्या. पाण्याचा पीएच सुमारे दोन टक्क्यांनी वाढला होता, तर पाण्याचा जडपणा (हार्डनेस) सुमारे 100 अंकांनी वाढला होता. नायट्रेट, क्लोरिन, फ्लुरॉईडसचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढल्याचे विद्यार्थ्यांनी नोंदविले.
प्रत्यक्ष प्रयोगातून विद्यार्थ्यांना प्रदूषणाची गंभीर समस्या जाणवली. आपले पाणीसाठे आपण काळजीपूर्वक वापरायला हवेत, ते प्रदूषित होऊ नयेत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे हे त्यांना पटले. यानंतर आम्ही गावात कृत्रिम जलाशयात मूर्तीच्या विसर्जनाचा आणि शाडू मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरतो. इतकेच नव्हे तर माझ्या शाळेतले विद्यार्थी स्वत: शाडूच्या गणेशमूर्ती बनवून त्याची विक्री करतात. जलसाक्षरतेविषयी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे माझ्या शाळेतील विद्यार्थी जबाबदार नागरिक होण्याच्या मार्गावर आहेत, याचे मला समाधान वाटते.
- जयवंत ठाकरे.
No comments:
Post a Comment