Wednesday 12 July 2017

स्पेशल केअर फॉर सिनिअर सिटिझन्स





‘‘79 वर्षांच्या आजी फक्त एका आठवड्यातच ईमेल लिहायला शिकल्या. हे बघितलं आणि ज्यांना तंत्रज्ञानात रस आहे, त्यांना ते शिकवायला आम्ही सुरुवात केली’’, वृद्धाश्रमासाठी काम करणारी नेहा खरे सांगत होती. “स्पेशल केअर फॉर सिनिअर सिटिझन्स या मुंबईतल्या संस्थेत 2006 मध्ये मी नोकरी स्वीकारली. आता हे सेंटर मला घराइतकंच प्रिय आहे. इथे मला वृद्धांची मानसिकता समजू लागली. यांचा दिनक्रम म्हणजे सकाळचं आवरून टीव्ही बघायचा, दिवसभर नुसतं बसून राहायचं. कधी स्टाफविषयी तक्रारी तर कधी रूममेटविषयी. लहान मुलांसारखं वागणं. जाणवलं की त्यांची एनर्जी चांगल्या ठिकाणी कामी यायला हवी, त्यांचं मनही रमावं. त्यांच्या संगतीतच उपक्रम सुचत गेले,” नेहा सांगते.
मुलांप्रमाणेच वृद्धांनाही काळजीपूर्वक जपण्याची गरज असते. त्यामुळे हे पालकत्वच असतं. आम्ही ज्येष्ठ नागरिकांची फक्त व्यवस्था लावत नाही; तर त्यांना काही क्रिएटिव केल्याचा आनंद मिळत राहील, हे बघतो. या वयात खूप बोलण्याची, शेअरिंगची आवश्यकता असते. नेमकं, रिकामा वेळ हातात असलेली मंडळी आजूबाजूला नसतात. आम्ही उपाय शोधला. ज्यांना संस्थेत काही वेळ येऊन काम करायचं आहे, अशांना, विशेषत: विद्यार्थ्यांना आम्ही बोलावतो. दुपारची वेळ गप्पांमध्ये छान जाते आणि या ज्येष्ठांचा बाहेरच्या जगाशी, घडामोडींशी संपर्कही राहातो. घरात सगळ्या वयोगटाच्या व्यक्ती असल्या की परिपूर्णता वाटते, तशी इथेही राखण्याचा हा प्रयत्न. आठवड्यातून एकदा भेटायला येणाऱ्या छोट्या मित्र-मैत्रिणींची ते वाटच बघत असतात. गप्पांना चांगलं वळण लागतं नि त्यांची आयुष्याबद्दलची कुरकूर कुठल्याकुठे निघून जाते.
ते हसतेखेळते राहावेत यासाठी प्रयत्न करत असताना कळलं, की त्यांना पाळीव प्राणी आवडतात. प्राण्यांच्या संगतीत वेळ चांगला जातो. दुखणी विसरायला, लवकर बरं व्हायलाही मदत होते. मग पाळीव प्राणी बाळगणार्‍या आणि आमच्या सेंटरसाठी काही करू इच्छिणार्‍यांना आठवड्यातून एक संध्याकाळ त्यांच्या पेटसह यायला सांगितलं. ही पेट थेरपी चांगली लागू पडली आहे.
शरीर हेल्दी राहाणं सगळीकडे बघितलं जातं पण मन हेल्दी राहणं अधिक महत्त्वाचं. वृद्धांना अनुभवी असल्याचा मान देताना आपण विसरतो की ते मनानं नाजूक होत असतात. संस्थेत राहाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी नसतेच. एका मुलाने आपल्या आईला - घरी रंगकाम काढलंय, त्याचा त्रास नको - हे कारण सांगून इथे आणलं. खरं तर कायमसाठीच पाठवलं होतं. वृद्ध आईला वास्तव कळल्यावर नैराश्याचा मोठा झटका आला. म्हणूनच अपत्यांनी खरेपणानं व्यवहार केला पाहिजे, असं मी ठासून सांगते. त्यांची सहवासाची भूक भागण्यासाठी एका खोलीत दोघा-तिघांनी राहाणं, रूममेट्सची अदलाबदल, एकाचे नातेवाईक आले की इतरांनाही त्यांच्याशी गप्पा मारणं असं चालतं.
संस्थेत प्रत्येक सण-उत्सव, सगळेसगळे डेज् साजरे होतात. आपण मुख्य समाजापासून दूर राहात आहोत, अशी भावना यामुळे त्यांच्या मनात राहात नाही. उत्सवाची सजावट त्यांच्यासह सगळे मिळून करतो. रंगकाम आणि रांगोळी त्यांना आवडते. एरवी कॅरम, पत्ते, संगीत, टीव्ही, लायब्ररी. नाश्त्यातही पाणीपुरी, पावभाजी असे बदल. यामुळे कंटाळा हा शब्द इथे नाही.
आज घराघरात वृद्धांची वाढती संख्या, त्यांना सांभाळण्याचा बिकट प्रश्न, हे आहेच. तरी आनंद टिकवण्याचे काही छोटे उपाय करून आपण त्यांचं जगणं सुसह्य करू शकतो. त्यांची कोणती कौशल्यं शाबूत आहेत, हे लक्षात घेऊन त्यांना ती वापरण्यासाठी आपण मदत केली पाहिजे.
प्रवास पालकत्वाचा: नेहा खरे, इनचार्ज, काउन्सेलर,

शब्दांकन: सुलेखा नलिनी नागेश, वर्षा जोशी-आठवले
#नवीउमेद #Patenting #वृद्धांचंपालकत्व

No comments:

Post a Comment