Monday 31 July 2017

अपमानातून सन्मानाकडे



१४ जुलै. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातलं दांडेगाव. विद्यार्थ्यांची अदालत भरलेली. उघड्यावर शौचाला बसणार्‍या २३ जणांना पकडून विद्यार्थ्यांसमोर हजर करण्यात आलं. या सर्वांना प्रत्येकी २०० रुपये दंडासह परिसर स्वच्छ करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. या कारवाईचा धसका घेऊन गावकऱ्यांनी शौचालय उभारणीचं नियोजन सुरू केलं. ३६ कुटुंबांनी ३० शौचालयांसाठी, त्याच रात्री उशिरापर्यंत खड्डे खोदून बांधकामास सुरुवात केली. त्यानंतर अशीच कारवाई १५ ते १८ जुलैदरम्यान सुकटा, भवानवाडी, पाडोळी या गावांत करण्यात आली. आता तिकडेही शौचालय बांधण्याच्या कामाला जोरदार सुरूवात झाली आहे.
उघड्यावर शौचाला जाण्याची मानसिकता बदलावी म्हणून आपल्याकडे अनेक युक्त्या-प्रयुक्त्याशोधून काढल्या जातात. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांनी संपूर्ण जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियान कार्यक्रम सुरू केला असून, यात उघड्यावर शौचाला जाणाऱ्या गावकऱ्यांसाठी अदालत भरवली जाते. अदालतीत गावातले विद्यार्थी अशा गावकर्‍यांना शिक्षा बजावतात. पालकांत बदल घडवून आणण्यासाठी मुलांना सक्रीय करण्याचा पर्याय लागू पडतो आहे.
जिल्ह्यांत अधिकारी-नागरिक यांची गुडमॉर्निंग पथकं तयार केली आहेत. प्रत्येक गावात भल्या पहाटे पथक पोचतं. सोबत एक-दोन पोलीस असतात. उघड्यावर शौचासाठी गेलेल्या नागरिकांचे फोटो काढून त्यांना फुलं भेट देत ‘गांधीगिरी’ करण्यात येते. त्यानंतर या गावकऱ्यांची ‘लोटापरेड’ गावच्या पारावर आणली जाते. तिथे विद्यार्थ्यांची अदालत सुरू होते. विद्यार्थ्यांपैकीच कोणी वकील, न्यायाधीशाची भूमिका वठवतात आणि खटल्याची सुरूवात होते. कधी रोख रकमेच्या दंडाची तर कधी गावातील सार्वजनिक ठिकाणी झाडू मारण्याची शिक्षा सुनावली जाते. दंडाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केली जाते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांनी गावस्तरावर असा उपक्रम राबवावा, अशा सूचना सीईओ रायते यांनी दिल्या आहेत.
आतापर्यंत ४०६ लोटाबहाद्दरांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ८१, २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शिक्षेचा सुपरिणाम म्हणून गावाची, मंदिराची आणि शाळेच्या परिसराची स्वच्छता झाली आहे. कारवाई करण्यात आलेल्या ४०६ लोटाबहाद्दरांपैकी ३५० जणांनी शौचालय बांधकाम तातडीने सुरुवात केली आहे.
विद्यार्थी अदालत या उपक्रमाचं जिल्ह्यात कौतुक होत आहे. विद्यार्थी अदालत उपक्रमाला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. जे. वाघमारे मार्गदर्शन करतात. सीइओ रायते म्हणतात, "देशाने विविध क्षेत्रात प्रगती साधली. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत अजूनही आपण मागे आहोत. गावकऱ्यांना आपल्या मुलांकडूनच स्वच्छतेचं महत्व सांगितलं जावं, त्यांच्याकडून गावकऱ्यांसमक्ष अपमान झाल्यानंतर ईर्षेने पालकांनी घरी तात्काळ स्वच्छतागृह बांधावं, असा या उपक्रमामागचा हेतू आहे."
दांडेगावतील अन्नपूर्णा भोगील म्हणाल्या, “गावकऱ्यांच्यासमोर विद्यार्थी न्यायालयाने शाळेतील परिसर झाडण्याची शिक्षा दिल्यामुळे मला अपमान झाल्यासारखं वाटलं. म्हणून मी शौचालय बांधायला सुरुवात केली आहे. शौचालयाच्या गरजेकडे मला आहे. मी दुर्लक्ष केलं होतं. आता मला शौचालय बांधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच माझा सन्मान आहे.”

- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment