Sunday 30 July 2017

कर के देखो


निर्माण - १८ ते २८ वर्षांच्या मुला-मुलींसाठी
सोलापूरची सीए झालेली सारिका. तिने निर्माण उपक्रमाच्या पाचव्या तुकडीत भाग घेतला. आता महिलांना आर्थिकदृष्ट्या कसं स्वतंत्र होता येईल, महिलांनी व्यवसाय कसा सुरु करायचा, बँकेमार्फत निधी कसा मिळवायचा याचं मार्गदर्शन ती पुण्यात राहून करते. सारिकासारख्यांना समाजासाठी काही करावसं वाटलं, तरी नक्की काय करायचं, हे कळत नाही. 
`निर्माण’ उपक्रम हा असं काही करण्याची इच्छा असणाऱ्या १८ ते २८ वर्षांच्या मुला-मुलींसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. `निर्माण’मध्ये निव्वळ व्यक्तिमत्वविकास नाही, तर सामाजिक बदल घडवण्याला दिशा दिली जाते.
`निर्माण’चे एक संस्थापक सदस्य अमृत बंग यांच्याशी `नवी उमेद’च्या मुंबई प्रतिनिधी मेघना धर्मेश यांनी केलेली बातचीत.
`निर्माण’ची गरज का वाटली ?
- १९७०-८० मध्ये महाराष्ट्रात सुरु झालेली सामाजिक चळवळ १९९० च्या सुमारास बऱ्यापैकी थंडावली होती. सामाजिक संस्था दुय्यम स्थानावर गेल्यासारखं झालं. एक प्रकारची पोकळीच निर्माण झाली होती म्हणा ना..दुसरं म्हणजे युवकांची अवस्था शिक्षण घेऊनही काही हेतू, लक्ष्य नसल्यासारखी झाली होती. भरकटलेपण आलं होत. युवकांना न्यूनगंड, निराशा, निरुद्देशा यांनी घेरलं होतं. माहिती, कौशल्य असून सुद्धा Sense of Purpose हरवलं होतं. समाजातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी युवा पिढीच्या माहिती, कौशल्याचा समन्वय साधण्याच्या उद्देशाने `निर्माण’ अस्तित्वात आलं.
कर के देखो हा `निर्माण’चं सूत्र आहे. आपण चाकोरी सोडायला घाबरतो, असं वाटतं का?
- हो नक्कीच. `निर्माण’ हे मुला-मुलींना चाकोरी सोडून स्वतःचे रस्ते, पायवाट शोधायला सांगतं. आयुष्याचा खऱ्या अर्थाने अनुभव घ्या. समाजाचे प्रश्न समजून घ्या, उपाय शोधा हे सांगतं.
`निर्माण’ शिबिराच्या आतापर्यंत ७ तुकड्या (batches)झाल्या आहेत. आता १५ ऑगस्ट सुरु होणारी आठवी batch असणार आहे. म्हणजे `निर्माण’ला मागणी आहे ही आपल्या समाजाची गरज झाली आहे, असं म्हणायचं का ? आणि मुलींचा प्रतिसाद कसा आहे?
- आता पर्यंत ७ तुकड्यामध्ये मिळून ८७३ मुलं शिबिरात येऊन गेली. आता एका तुकडीत १५० मुल असतात ज्यात ४०% मुली आहेत. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यापैकीं ३४ जिल्ह्यामधुन मुलं येतातं .इथे युवा पिढीला हेतू, दिशा मिळते. त्यामुळे त्यांना `निर्माण’चा भाग होणं आवडू लागलंय. एक अतिशय वेगळ्या जीवनशैलचा अनुभव `निर्माण’ देतय. `निर्माण’मधून शिक्षित झालेली मुलं-मुली वेगवेगळ्या संस्थांत किंवा स्वत:ची संस्था काढून सामाजिक समस्या सोडवतायत यापेक्षा समाधानाची गोष्ट कुठली ? आपणसुद्धा बदल घडवू शकतो याची खात्री त्यांना पटतेय.
मुलाखतीच्या शेवटी अमृतचं एकचं सांगणं होतं की जर आपण मानसिकता बदलली, मी इथे देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही, असं मनाशी पक्कं केलं तर सकारात्मक बदल नक्कीच घडून येईल.

 मेघना धर्मेश 

No comments:

Post a Comment