Sunday 30 July 2017

एका डॉक्टरच्या जिद्दीची गोष्ट


शासकीय रुग्णालय. एक व्यक्तीला कारमधून उतरवून व्हीलचेअरमध्ये बसवलं जातं. 
असेल एक पेशंट म्हणून कुणी दुर्लक्ष करतं. पण थोड्या वेळातच कळतं की ही व्यक्ती इथं डॉक्टर आहे. त्यांचं नाव आहे रवींद्र ढाकणे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असतानाच चालता, धावता येत नाही हे लक्षात आलं. पुढच्या चार-पाच महिन्यातच मायोपॅथी आजाराचं निदान झालं. आणि हातापायांना अपंगत्व आलं. आजारावर कायमस्वरूपी उपचार नाहीत. शिवाय वय वाढत जाईल तसं आजार वाढत जाणार हेही कळलेलं.
ढाकणे सांगतात, “हातापायाचं काम थांबलं हे लक्षात आल्यानंतर मी पूर्णपणे शून्य झालो. आता पुढं काय? या विचाराने निराश झालो. मात्र पुढच्या काही तासांतच या आजारावर मात करायची, रडत बसायचं नाही असा निर्णय घेतला आणि जिद्दीनं एमबीबीएस पूर्ण केलं.”
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आरोग्याची पूर्णपणे काळजी घेतली तरी एखादा मोठा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
डॉक्टर मूळचे लातूरचे. 
डॉक्टर व्हायचं हेच त्यांचं स्वप्न. नवी मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेजचे ते विद्यार्थी.
ढाकणे यांना पहिलं पोस्टिंग मिळालं रत्नागिरीत 2010 साली.
गेली सात वर्षे ते सकाळी 9 ते 2 या वेळेत शासकीय रुग्णालयात काम करत आहेत. रुग्णालयात डॉक्टरांची केबिन आहे पहिल्या मजल्यावर. शिपाई व्हिलचेअरमधून त्यांना अक्षरश: तिथवर उचलून नेतात. आणि डॉक्टरांचं काम सुरू होतं.
डॉक्टर म्हणतात, ‘‘या आजारात माझ्या कुटुंबियांनी आत्मविश्वास वाढविला. पत्नी सुनिताने खंबीर साथ दिली. आणि छोट्याशा सोहमने जगण्याची उमेद दिली. म्हणूनच ही लढाई मी हसतमुखाने लढतोय. वय वाढेल तसा हा आजार वाढत जाणार ही वस्तुस्थिती पत्नी सुनितालाही माहीत आहे. ती दररोज मला रूग्णालयात न्यायला आणि सोडायला येते, कुटुंबाची ही इच्छाशक्ती माझी ताकद आहे", असही ढाकणे यांनी सांगितलं. जोपर्यंत मी व्यवस्थित आहे, तोपर्यंत रूग्णांना सेवा देत राहणार असंही ते म्हणतात.
एकीकडे शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याच्या बातम्या आपण वाचतो. आणि इथं तर स्वतः आजारी असताना रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी धडपडणारा डॉक्टर आहे.

- जान्हवी पाटील, रत्नागिरी 

No comments:

Post a Comment