Sunday 30 July 2017

'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र'ची दोन वर्षे


सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा : 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र'ची दोन वर्षे
देशात शिक्षण हक्क कायदा 2010 सालापासून अंमलात आला. मात्र प्रत्येक मूल केवळ शाळेत दाखल होऊन चालणार नाही तर वयानुरुप त्याला अपेक्षित गुणवत्ताही गाठता यायला हवी. म्हणूनच 22 जून 2015 पासून महाराष्ट्र सरकारने 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' हा कार्यक्रम हातात घेतला. राज्यात शाळेत येणारं प्रत्येक मूल वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि गणिती क्रियांमध्ये तरबेज व्हावं असा प्रयत्न याद्वारे होत आहे.
हे सगळं घडवू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे शिक्षक. या कार्यक्रमाने शिक्षकांना आपली शाळा प्रगत करण्यासाठीचं स्वातंत्र्य आणि स्पेस दिली. पारंपारिक घोकंपट्टी, मुलांना छडीचा- शिक्षेचा धाक दाखवणं बंद केलं. महाराष्ट्रातील बहुतांश शाळा आता 'ज्ञानरचनावादी' शिक्षणपद्धती वापरु लागल्या आहेत. यात हसत- खेळत, मुलांना समजून घेत शिकविलं जातं. त्यासाठी साध्या-सोप्या शैक्षणिक साहित्याचा वापर केला जातो. शिक्षक आता 'सुलभक' म्हणून काम करतात.
'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ ने जशी शिक्षकांना आपली ‘स्पेस’ दिली, तसेच साचेबद्ध भूमिकेतून बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य अधिकाऱ्यांना दिलं. अधिकाऱ्यांची भूमिका बदलून ती ‘शिक्षक संवादी’ बनवली गेली. शिक्षकावर देखरेख करणं यापेक्षा वर्गातील मुलं किती सक्षम आहेत? गणित, भाषेच्या साध्यासोप्या क्रिया त्यांना जमतात का, मुलं आनंदी आहेत का? याची तपासणी करण्याचं काम अधिकाऱ्यांवर सोपविलं गेलं.
'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पायाभूत चाचण्यांचे आयोजन. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वयोगटानुसार वाचन, लेखन, संख्याज्ञान क्षमता किती आहे, याची पडताळणी या पायाभूत चाचण्यांद्वारे होते. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि आर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्या घेण्यात येतात.
विद्यार्थ्यांने किती गुण मिळवले, हे तपासून पाहणं हे या चाचण्यांचं उद्दिष्टच नाही. तर विद्यार्थ्याला नेमकं किती समजलेलं आहे, त्याला कोणता भाग अजिबातच कळलेला नाही, कोणता भाग जास्त सुलभ करुन शिकवणं आवश्यक आहे, हे चाचण्यांच्या मूल्यमापनातून कळावं, अश्या प्रकारे प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या. या चाचणीच्या उत्तरपत्रिका तपासताना बोलीभाषेतील उत्तरांचा स्वीकार करावा, स्व- अभिव्यक्तीमध्ये लेखनाच्या चुका न दाखवणं, केवळ स्मरणावर आधारित प्रश्न न विचारता आकलन आणि ज्ञानाचा प्रत्यक्षात वापर कसा करावा, यावर भर देण्यात येतो.
या चाचण्या सोडवतानाही मुलांचं शिकणं व्हावं, यासाठी काही नमुना प्रश्न, उदाहरणं, प्रश्नपत्रिकेतच सोडवून दिलेली असतात उदा.
पायाभूत चाचणी: भाषा विषय
शिवाय ज्ञानरचनावाद समजून घेण्यासाठी शिक्षक स्वखर्चाने ‘प्रगत’ शाळांना अभ्यास भेटी देऊ लागले आहेत. त्यात 100 टक्के प्रगत झालेलं सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट, वाई, चंद्रपूरमधील ताडाळी, नाशिक जिल्ह्यातील निफाड, पुण्यामधील हवेली, सांगलीतील मिरज, कोल्हापुरातील गडहिंग्लज, लातूर तसेच रत्नागिरीतील चिपळूणला भेट देणाऱ्या शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे.
आता हा कार्यक्रम 'जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' झाला असून राज्यातील सर्व शाळा प्रगत करण्याचं आणि 100 टक्के शिक्षक तंत्रस्नेही बनविण्याचं या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे.
लेखन: स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

No comments:

Post a Comment