Thursday 13 July 2017

''प्रेम आणि काळजी घेणारं माणूस भेटलं की माणसाच्या आयुष्यात बदल घडतो'


१९७८-७९ चा काळ. मुंबईतल्या वर्सोव्यात एका चाळीतल्या गुजराती कुटुंबात बाळ जन्माला आलं. शेजारचं मराठी कुटुंब गुजराती कुटुंबाचा भाग असल्यासारखं. मराठी कुटुंबातली एक कॉलेजकन्या त्या बाळाला खेळवत असे. एकदा, खेळवताना बाळ वेगळं वाटतंय, अशी शंका तिला आली. तिने ते स्वतःच्या डॉक्टर ताईच्या लक्षात आणून दिलं. तपासणीत बाळ मतिमंद असल्याचं निघालं. त्या कुटुंबासाठी तो मोठा धक्का होता. पुढे, ते कुटुंब बाळाकडे लक्ष देईनासं झालं. कॉलेजकन्येला ते जाणवलं. तिने बाळाच्या आईला विचारलंदेखील, ''भाभी, असं का वागताय एवढ्या गोड मुलाशी ?'' त्या कुटुंबानं त्यांना ते मूल नको असल्याचं सांगितलं. मुलीनं क्षणात उत्तर दिलं ''तुम्हाला तो नको आहे, तर मी त्याला सांभाळेन. त्याला दत्तक घेईन.'' ती बाळाला तडक घरी घेऊन आली. विशेष म्हणजे, तिच्या वडिलांनाही याचं कौतुकच वाटलं. काही दिवसांनी मुलीच्या कुटुंबियांच्या समजावण्यावरून त्या गुजराती कुटुंबात परिवर्तन घडलं आणि ते त्या मुलाला परत घरी घेऊन गेले. कॉलेजकन्येने मुलाकडे लक्ष देणं सुरूच ठेवलं. पुढे त्या मुलामध्ये सुधारणाही झाली.
ही कॉलेजकन्या म्हणजे उत्कर्षा लाड-मल्ल्या. अंधेरीतल्या भवन्स महाविद्यालयाच्या अलिकडेच निवृत्त झालेल्या उपप्राचार्या. शंभरहून अधिक मुलामुलींना सर्वतोपरी मदत करत त्यांचं पालकत्व निभावणार्याा आणि प्रसिद्धीपासून दूर राहणार्या . त्यांचे पती विजय मल्ल्या यांचीही त्यांना मोलाची साथ आहे.
उत्कर्षा सांगतात ''आई शशिकला आणि वडील मनोहर लाड दोघेही सुधारणावादी. राष्ट्र सेवा दलातले. त्यामुळे मानवतावाद आम्हा पाच बहिणींमध्ये आपोआपच रुजला. वडिलांना आमच्या लग्नांपेक्षा आम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं, महत्वाचं वाटायचं.” आई-वडिलांचाच वारसा उत्कर्षा पुढे चालवत आहेत.
''मातृत्व, पालकपण यासाठी विवाह, नवरा, स्वतःचीच मुलं असणं आवश्यक आहे, असं नाही. आपल्यामध्ये आंतरिक प्रेम, दयाभाव असला की दुसर्यां ची दुःख समजतात. मदत करावीशी वाटते,” त्या सांगतात. अंध विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी लेखनिक, वाचक मिळत नसल्याची खंत महाविद्यालयात पाहुण्या म्हणून आलेल्या, अंध विद्यार्थांसाठी स्नेहांकिता संस्था चालवणार्याय परिमला भट यांनी व्यक्त केली. तेव्हा उत्कर्षा यांनी भवन्समध्ये सेंटर सुरू करून मुलामुलींना या कामासाठी प्रेरित केलं. वर्षभरातच अंध विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लेखनिकांची संख्या ३०-४० वरून ७०-७५ वर पोचली. या आपल्या लेखनिक-वाचक मुलांचं उत्कर्षामॅडमना अपार कौतुक वाटतं. स्नेहाकिंत आणि इतर अनेक संस्थाचा त्या आधार बनल्या आहेत.
परिक्षांच्या वेळी अपंग मुलांची सोय करणं हे शाळा- महाविद्यालयांना आव्हानात्मक वाटणारं काम उत्कर्षामॅडमच्या संवेदनशीलतेमुळे आणि पुढाकाराने साध्य झालं. सहकारी शिक्षकांच्या अपंग विद्यार्थ्यांविषयीच्या मनोभूमिकेत बदल घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
परिस्थितीमुळे गांजलेल्या कितीतरी मुलामुलींना, त्यांच्या कुटुंबांना वैद्यकीय, आर्थिक मदत देत, नैराश्यातून बाहेर काढत त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचं काम उत्कर्षामॅडमने केलं आहे.
''प्रेम आणि काळजी घेणारं माणूस भेटलं की माणसाच्या आयुष्यात बदल घडतो'', उत्कर्षा सांगतात. त्या स्वतः हे जगल्या आहेत. जगत आहेत.
प्रवास पालकत्वाचा : उत्कर्षा लाड - मल्ल्या
शब्दांकन: सोनाली काकडे

No comments:

Post a Comment