रात्री जरा झोपायला उशीरच झाला. नवीन आलेलं एक 7 दिवसाच बाळ सारखं किरकिरत होतं. त्याला मांडीवर घेऊन पाहिलं, थोपटलं, दूध दिलं तरीही शांत होतं नव्हतं. बरं, हे बाळ आमच्या बाहेरच्या अंगणात रात्री भर पावसात कुणीतरी अचानकपणे ठेवून गेल्यानं, पावसाच्या आवाजात ते समजायलाही वेळ लागला. किती वेळ ते पावसात रडत होतं देव जाणे! ते इतकं भिजलेल्या अवस्थेत सापडलं होतं की, लगेच त्याला पुसून स्वेटर वगैरे घालून दवाखान्यात नेण्यात आलं. तिथून ते बाळ संस्थेत आणलं. त्याला पाळण्यात झोपवून किरकिरत असतानाच झोके देण्याचे उद्योग आम्ही लहान मुली करत असू. मला तर त्या पाळण्याच्या झोक्याच्या कुरकुर आवाजानेच गाढ झोप लागायची.
मुलींच्या हॉलजवळच बाळांची खोली होती. तिथं नेहमी 7,8 बाळं असायचीच. दोन, तीन कुमारी मातांचीही सोय त्याच पाळणाघराला लागून असलेल्या मुलींच्या हॉलमध्ये असायची. आमच्या संस्थेत मुलींचा हॉल, मुलांचा हॉल, स्वयंपाकघर, जेवणाचा हॉल, ऑफिस, तळघर, टेरेस, छोटंसं का होईना अंगण असा प्रशस्त परिसर होता. तो आजही तसाच आहे.
आज सकाळपासूनच गडबड होती. संस्थेतील गृहमाता कमालीची भेदरलेली होती. एकसारखा घाम पुसत होती. सकाळची शाळा असल्याने मी आपली माझं आवरण्याच्या गडबडीत होते. सहज तिला विचारलं, काय झालं सुमनमावशी?
ती काहीच न बोलता, बाळांना अंघोळी घालायच्या तयारीला लागली. मनातून भयंकर भेदरलेली होती, हे तिच्या एकूण हलचालींवरून लक्षात येत होतं. मधूनच डोळे पुसत होती, पदर घेऊन घाम पुसत होती, तेही सकाळ सकाळ! मला वाटलं रात्रभर बाळांनी झोपून नसेल दिलं, तशीही ती कामाला येऊन 15 दिवसच झालेत. म्हणूनही कदाचित सुमनमावशींच्या भेदरलेपणाकडे कुणी लक्ष दिलं नाही. मीही मग शाळेला निघून गेले.
शाळेतून आल्यावर संस्थेत कमालीचा शुकशुकाट होता. पोरं नेहमीसारखी खेळत नव्हती, कामवाल्या मावश्यांनी, मोठ्या तायांनी त्यांना गप्प बसून राहण्याची तंबी दिली होती.
शाळेतून आल्यावर मला जाम भूक लागल्यानं शाळेचा ड्रेस वगैरे न बदलताच मी स्वयंपाक खोलीत (स्वयंपाकघर वगैरे इतके 'घरेलू' शब्द तेव्हा मला माहित नव्हते) बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत मला संस्था सोडून मैत्रिणीच्या घरी गेल्यावर कळली.
मी कसंबसं ताट वाढून जेवायला बसले. आज मस्त श्रीखंड पुरीचं जेवण होतं. भुकेचा आगडोंब शांत होणार, या आनंदात हावऱ्यागत मी ताटात जरा जास्तीचं वाढून घेतलं होतं. आणि जेवणाच्या खोलीचा एक कोपरा पकडून बसले जेवायला. दोन घास गेले नसतील तेवढ्यात छायाताई अंगावर खेकसली. ''गाये, लाज वाटते का ? ते परवा आलेलं बाळ गेलंय की भोसडे!! उंडगे गावभर फिरून येऊन जेवायला बसलीस? कोणी पोरं जेवलीत का, हे तर बघायचं की भवाने...." ती पुढचं काय बोलतेय, हे मला कळत नव्हतं. पण परवाचं आलेलं बाळ गेलं, हे ऐकूनच मी पळत पळत वरती बाळांच्या खोलीत गेले. अर्थातच बाळ तिथं नव्हतं, पण सुमनमावशींच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा एकसारख्या वाहत होत्या. मी दिसल्यावर त्या गळ्यातच पडून रडायला लागल्या. माझ्या तर डोळ्यासमोरून त्या बाळाचा चेहराही जाईना. कालही त्याला ताप भरला होता. पहाटे 4 वाजता सुमनमावशींनी त्याला दवाखान्यात नेलंही होतं. त्याला ऍडमिट केलं आणि तिथंच ते दुपारी गेलं हा सगळा वृत्तांत कळला.
मला एकदम परवाची अंगणात चिमणीच पिल्लू मेल्यानंतरची घटना आठवलीे. त्या संध्याकाळी, 'इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होना...’ही प्रार्थना मी जास्त मनापासून म्हटली.
- गायत्री पाठक
No comments:
Post a Comment