Friday 31 August 2018

पोरक्या लेकरांचं जग : भाग 9


एखाद्या बालकाच्या वाट्याला 'अनाथपण' येतं, त्याला एकटी कुमारी, विधवा माता जबाबदार नसते. तर एकूणच ढासळलेली कुटुंबव्यवस्था जबाबदार असते.
अनोळखी ठिकाणी, रस्त्यावर अचानकपणे सोडलेल्या बालकांची अवस्था कुमारी मातांच्या मुलांपेक्षा फारशी वेगळी नाही. कुमारी मातांवर मातृत्व लादलेल्या घटना त्या निर्दोष असल्याची ग्वाही देतात. पण समाजमान्य मुलं जन्माला घालून केवळ सांभाळता येत नाहीत, म्हणून बेजबाबदारपणाने आपल्या बालकांना सोडून दिलेल्या पालकांना इथं कोणतीच शिक्षा नाही. आपला समाज कुमारी मातेला जितकी नावं ठेवतो, तितकी लग्नाच्या बाळाचा त्याग करणार्‍याला नावं ठेवत नाही. ही मोठी वैचारिक गडबड आहे. जन्म देलेल्या बाळासाठी पालक म्हणून सर्वार्थाने जबाबदार असणं, हे साधं मूल्य सुशिक्षित मानत नाहीत. तर, अशिक्षितांकडून काय अपेक्षा करायची? घटस्फोटितांची संख्या वाढत असताना बालकांचे मूलभूत हक्क सोयीने विसरणारा आपला समाज! प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःच्याच हक्कांसाठी, अधिकारांसाठी लढतेय, असं जाणवत राहतं. पालकांच्या बेजबाबदार वागण्याला कोणतंही न्यायालय कोणतीच शिक्षा न करता, त्या बालकालाच जेव्हा अनाथाश्रमात धाडून निराश्रित म्हणून आजन्म शिक्षा देत राहतं, तेव्हा 'उद्धवा, अजब तुझे सरकार!' असं म्हणावसं वाटतं.
माणुसकीला, ममत्वाला, नात्यांना आणि बालकांच्या हक्कांना, अधिकारांना पायदळी तुडवून एकूणच सोयीने मूल्यशिक्षण देणाऱ्या व्यवस्थेचा आपणही एक भाग आहोत, याची साधी जाणीवही आपल्याला होत नाही, हे खरं दुर्दैव. आर्थिक परिस्थिती नाही म्हणून टाक पोराला अश्रमात, नवऱ्याने सोडून दिलं म्हणून, पोरं सांभाळता येत नाही म्हणून, अर्धवट शिक्षण, कधी एकल पालकत्व, तर टाक आश्रमात... अनाथालयं तुडुंब भरून गेली आणि जणू अनाथालयांच्या निर्मितीचा कारखाना चालू झाला. तो आजही ओसंडून वाहतोय.
आपल्या मुलींना लग्न करून धाडायच्या आधी स्वावलंबी बनवणं, अन्याय सहन न करणं, जबाबदारी न टाळणं, पुरुषी व्यवस्थेला बळी न पडणं या गोष्टींचं शिक्षण द्यायला समाज गेली अनेक वर्ष विसरत आहे की काय? अशी स्थिती. दुसरीकडे पराकोटीचा स्वार्थ, बदले की आग, हतबलता या सर्व कारणांमुळेही बालकांचे हक्क आणि अधिकार वेशीला टांगले जात आहेत.
हीच मुलं जेव्हा मोठी होतात, तेव्हा ‘अनौरस’ असा व्रण जरी त्यांच्या मनात नसला तरी बेजबाबदार पालकांची आपण अपत्य आहोत, याची बोच कायम त्यांच्या मनात असते. एक वेळ कुमारी मातेचं मूल आईला सहज माफ करू शकतं. पण बेजबाबदार पालकांचं मूल आपल्या आईवडि‍लांना कधीच माफ करत नाहीत.
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment