Friday 31 August 2018

‘स्मार्ट’ कुसळंब

''गावाचा विकास हा एकच अजेंडा गावकऱ्यांसमोर असतो. त्यामुळे प्रत्येक प्रत्येक शासकीय योजनेच्या जोडीला गावकरीही लोकसहभागातून निधी उभारतात. योजना चांगल्या प्रकारे राबवण्याचा किंवा त्यातून नवीन काही करण्याचा प्रयत्न असतो.''कुसळंब गावच्या सरपंच रोहिणी पवार सांगत होत्या. ग्रामसेवक दत्तात्रय लोमटेही दुजोरा देतात. 
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातलं 'स्मार्ट' गाव- कुसळंब. लोकसंख्या ३ हजार १४०. कुटुंब ६३१. 
साधारण तीन वर्षांपूर्वी १३व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून शुद्ध पाण्यासाठी आरओ प्लॅन्ट आणि वॉटर एटीएम सुरू करण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारचं जिल्ह्यातलं पहिलंच वॉटर एटीएम. अवघ्या 5 रुपयात 20 लिटर शुद्ध पाणी.
दोन वर्षांपूर्वी स्मार्ट व्हिलेज उपक्रमांतर्गत गावात कचरा संकलनासाठी घंटागाडीची खरेदी. डंपिंग ग्राउंड. साधरण पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचचं संकेतस्थळही करण्यात आलं. पाणंदमुक्तीची योजना सुरू होताच वर्षभरापूर्वीच अवघ्या एका महिन्यात पाणंदमुक्ती. गावात १२ फुट झाडांचं रोपण करण्यात आलं.
सध्या गावची करवसुली जवळपास ९० टक्के. शंभर टक्के वसुलीसाठी ग्रामपंचायतीनं जय मल्हार पिठाची गिरणी सुरू केली. कर भरणााऱ्यांना मोफत दळण.
ग्रामपंचायतीनं संत गाडेबाबा ग्रामस्वच्छता अभियानही राबवलं. यंदा औरंगाबाद विभागाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार कुसळंबला मिळाला.
गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत कुसळंबनं तालुकास्तरावर प्रथम येत दहा लाख रुपयांचं आणि जिल्हास्तरावर प्रथम येऊन ४० लाख असं एकूण ५० लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं. ही रक्कम मिळाल्यानंतर यातूनही विविध विकासकामं करण्यात येणार आहेत.
-अमोल मुळे.

No comments:

Post a Comment