Friday 31 August 2018

पोरक्या लेकरांचं जग भाग 6


माझ्या मनात उमलणार्‍या प्रेमाचा खरा अर्थ कळायच्या आधीच आपल्याच अस्तित्वाच्या गाभ्यापर्यंत पोहचवणाऱ्या 'त्या' मैत्रिणीला थँक्स म्हणावं की तिचा आणि स्वतःचाही तिरस्कार करावं ,हे कळेनासं झालं होतं. त्यानंतर, समोर येणार्‍या कुमारी मातांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. येईल त्या बाळाविषयी अधिक ममत्वाची आणि कुमारी मातांवुषयी तिरस्काराची भावना मनात येऊ लागली. मी त्यांच्याशी फार बोलणंही टाळत होते.
या अशा मुली आपल्यासारख्यांना जीवांना जन्म देऊन सोडून जातात, कोरडेपणाने! कुणाच्या सुखासाठी आपलं जगणं विनाकारण अनौरस ठरलं? स्वतःविषयीच नाकारलेपणा!
मला ज्या शाळेत घातलेलं होतं त्या शाळेतल्या बाई मी संस्थेतील आहे, म्हणून जास्त तिरस्कार करायच्या. मी जरासं काही केलं तरी भयंकर मारायच्या. 'कुणाची आहे ही घाणेरडी ब्याद, या असल्या चांगल्या शाळेत या मुलांना का ऍडमिशन दिली जाते ? बाई घरातला, शाळेचा सगळा राग मला पट्टीने झोडपत काढायच्या. खूप अपमानास्पद वागणूक, मुद्दाम शिक्षा द्यायच्या. माझ्या बाजूने त्या बाईंना बोलणारे कुणीच नाही,याची बोच जास्त अस्वस्थ करायची. आपलं स्वतःचं कुणी असायला हवं, ही माझी माफक अपेक्षा तेव्हा, केवळ बाईंच्या तावडीतून सुटण्यासाठी होती. त्या बाईंमुळे मी 1ली ते 4 थी त्या शाळेला भयंकर घाबरून होते. त्यामुळेही आईने नाकारल्याची जाणीव अधिक स्पष्ट होत गेली. दुसरीकडे शाळेतल्या इतर मैत्रिणींच्या कुटुंबाकडे पाहून आपलं कुटुंब नसल्याची भावना जोर धरत होती.
5 वीत वेगळ्या शाळेत आले, तेव्हा माझी त्या मारकुट्या बाईपासून सुटका झाली. मी खूप आनंदात असायचे त्या शाळेत. तिथलं वातावरण मला जास्त आवडायचं. कारण तिथल्या एक बाईं माझ्याशी खूप प्रेमाने वागायच्या. इतकं कुणी प्रेमानं वागण्या -बोलण्याची मला सवय नव्हती. तिरस्काराच्या भावनेमुळे मी स्वतःच्याच नजरेतून कोलमडून पडले होते. ती उभारी लगेच कशी मिळेल? आपली जगण्याची लायकी नसताना का जगायचं? का जगतोय आपण? या विचाराने मी अनेक वर्ष न्यूनगंडात घालवली. कुणी दुःखावर फुंकर घालायला लागलं की, दुःखाची जाणीव अधिक गडद होत जाते, तसही काहीसं होत होतं माझ्या बाबतीत.
या शाळेत असतानाच मला कविता करण्याचा, वाचनाचा नाद लागला होता. त्याच दरम्यान देवयानी ययाती, ऍन फ्रॅंक, काही धार्मिक अशी पुस्तकं संस्थेत देणगी म्हणून आली होती. ती वाचल्यामुळे, कुमारी मातांच्या अनुभवामुळे आपल्याला किमान आई तरी हवी ,ही भावना बळावत गेली.
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment