Wednesday 8 August 2018

साळा लय आवडते, साळंत यायचं हाय

“गावात एका आजींच्या दोन नाती शाळेत न येता शेळ्या चारायला, कापूस गोळा करायला जायच्या. त्यातील एक मुलगी तर शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या नदीकाठी शेळ्या चरायला आणायची आणि शाळेतल्या शिकविण्याकडे टक लावून बघत बसायची. तिला ‘शाळेत ये ना’ , असं म्हटलं तर ‘साळा लय आवडते, साळंत यायचं हाय, पर आजी नाय बोलते मला’ असं म्हणायची. आम्ही शिक्षकांनी तिच्या आजीलाही नातींना शाळेत पाठविण्याची विनंती केली. पण त्या ऐकतच नव्हत्या.’
‘पोरींचे आयबाप तिकडं मंबयीत हाएत चार पैसं कमवायला. आमी गरीब हावोत. पोरगी कापूस वेचायला गेली तर पन्नास रुपये मिळतात. घरच्या शेळ्या- करड्यांना कोण चारणार? माझं वय झालंय, म्या काय जाऊ शकत नाही शेळ्या चाराया. पोरींनीच जायाला हवं. काय करायचंय गरिबाला शिक्षान?’ असाच आजींचा धोशा असायचा. मुली शिकल्या तरच तुमची गरिबी मिटू शकेल, त्यांनाही शाळेत यायची इच्छा आहे, हे परोपरीने सांगूनही आजी काही बधत नव्हत्या.शेवटी गावातील माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव राठोड यांनी मध्यस्थी केली आणि आजींना चक्क महिन्याला 100-200 रुपये देऊन शेळ्या सांभाळणारा माणूस बघून दिला, पण पोरींना शाळेत पाठवाच असं सांगितलं. आज पायल आणि काजल राठोड या दोन्ही मुली कर्नावळच्या शाळेत शिकत आहेत.” अराळकर सर सांगत होते.
ही गोष्ट आहे जालना जिल्ह्यातला मंठा तालुक्यातली. इथल्या कर्नावळ जिल्हा परिषद शाळेत धनंजय अराळकर शिक्षक आहेत. जवळपास 95 टक्के बंजारा वस्ती. सर सांगत होते, “2014 साली मी या शाळेत रुजू झालो तेव्हा वेगळी परिस्थिती होती. बहुतांश विद्यार्थी शाळेला दांडी मारायचे, अनेक विद्यार्थी पालकांसोबत ऊसतोडणीच्या गावी जायचे. मुलांनी नियमित शाळेत येणं, आम्हां शिक्षकांना गरजेचं वाटत होतं. त्यासाठी आम्ही शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी घेऊन, त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजवायला सुरूवात केली. मुलांना शाळेत पाठवाल तर त्यांचे भविष्य चांगलं असेल हे समजावण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. पण हे काम सोपं नव्हतं, कारण गावातील बंजारा समाजाच्या लोकांची गोरमाटी ही बोलीभाषा आम्हांला येत नव्हती. आम्ही मराठीतून बोलायचो आणि ते त्यांच्या भाषेत उत्तरं द्यायचे. अनेकदा तर आम्ही विद्यार्थ्यांनाच दुभाषक म्हणून काम करायला सांगायचो. पण शाळेचं महत्त्व पटवायचोच.”
हळूहळू गावकऱ्यांना शिक्षकांची धडपड लक्षात येऊ लागली. शिक्षक शिकविण्यासाठी एवढी मेहनत करीत आहेत तर आपणही आपली मुलं गावातच ठेवायला हवीत हे त्यांना समजलं. 2015-16 साली तर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत शाळेने स्थलांतर करणाऱ्या पालकांच्या मुलांची सकाळच्या नाष्ट्याची आणि रात्रीच्या जेवणाची सोयही केली होती. शिवाय त्यांना लागणारे कपडे, जीवनावश्यक वस्तू, गरज पडल्यास दवाखान्यात घेऊन जाणे, हेही शिक्षकांनी केलं. त्यामुळे गेल्या वर्षी तब्बल 37 विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबलं, अराळकर सर सांगतात. हे विद्यार्थी झोपायला फक्त नातेवाईकांकडे जायचे, बाकी शाळेने त्यांची पूर्ण काळजी घेतली. यातल्या 5-6 मुलांचे नातेवाईकही गावात नव्हते, पण गावकऱ्यांनी केवळ शिक्षकांच्या शब्दांवर त्या मुलांची आपल्या घरी राहण्याची सोय केली.
शिक्षकांनी इतके कसून प्रयत्न केल्यामुळे त्याचं तितकंच चांगलं फळही त्यांना मिळालं. विद्यार्थ्यांचं स्थलांतर 100 टक्के रोखलं गेलं. एवढंच नव्हे तर उत्तम गुणवत्तेमुळे कॉन्व्हेंटची 18 मुलं या कर्नावळ जिल्हा परिषद शाळेत दाखल झाली.
या शाळेतील शिक्षकांनी मुलांना गोरमाटी भाषेच्या माध्यमातूनच मराठीची गोडीही लावलेली आहे
- स्नेहल बनसोडे-शेलुडकर 

No comments:

Post a Comment