Monday 26 June 2017

सराव सोपा कुठे!

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी : 
तशी मी नुकतीच नव्या जागेत नि नव्या उपनगरात राहायला आलेय. यापूर्वी जिथं होते ती शिवाजी पेठ. मोकळीढाकळी. मी लिहितेबिहिते नि कायम कामात असते म्हणून सहसा मला कोणी डिस्टर्ब करायला यायचं नाही. एरवी पेठेला स्वत:च्या घरापेक्षा कुणाकडे कोण किती वेळा आलं याचे हिशेब पाठ. त्यामुळं म्हटलं तर तिथं एकांत नि म्हटलं तर सतत नको होईल इतका लोकांतही. लोकांमध्ये असूनही वेगळं राहाता येणं नि त्यांच्या प्रेमाअगत्याचा आपण अपमान करत नाही आहोत असं त्यांना पटवून देता येणं मोठ्या कौशल्याचं काम. ते कौशल्य दहा वर्षांपूर्वी पेठेत राहायला आले होते तेव्हा अवगत नसल्यामुळं फार मजा व्हायची. 
मी उदयकाकांबरोबर रोज संध्याकाळी फिरण्यासाठी अर्थातच व्हीलचेअर घेऊन बाहेर पडायचे. फिरंगाई मंदिर किंवा गांधी मैदानापर्यंत जायचा अवकाश, एरियातलेच कुणी रिक्षा दादा हाक मारून थांबवायचे नि म्हणायचे, ‘‘ओ ताई, घराकडंच चाललोय. पैशे नकोयेत. चला घरी सोडतो.’’ त्यांच्या स्वरातलं आर्जव ऐकून फिरायला बाहेर पडलेलो आम्ही त्यांना बरं वाटावं म्हणून रिक्षात बसून घराकडं परत यायचो.
माझ्यासारखी व्हीलचेअरवर असणारी व्यक्ती स्वत:चं काही काम करते नि इतरांप्रमाणे, रोज ‘चाकं मोकळी’ करायला जाऊ शकते याचा सराव जसा मला नव्हता तसा मला पाहणाऱ्या आसपासच्यांनाही. अशा वेगळ्या स्थितीत दिसणार्‍या माणसाशी नॉर्मल कसं वागायचं याचा गोंधळ उडालेला दिसायचा. मुळात स्वच्छ आवरून, किंचितसं प्रसाधन करून व्हीलचेअरवरून त्यांच्या समोरून झुळ्कन जाणार्‍या मला स्वीकारायला त्यांना वेळ लागला. कदाचित मी थोडी मलूल, थोडी नजर चोरणारी, विस्कटलेली असते तर तसा तितका वेळ लागला नसता. त्यामुळं अशा टापटिपीत मी त्यांच्याकडं हसून पाहायचे नि जुजबी बोलायचे तेव्हा आसपासच्यांची गडबड उडायची. एखाद्या परिस्थितीतला माणूस कसा दिसावा याचीही पठडी होऊन गेलेली असते, त्यामुळं त्यांचं बिचकणं असेल! पुढे एक विशिष्ट काळ गेला तेव्हा त्यांनी मग ड्रेसचा रंग छानंय वगैरे सांगायला सुरुवात केली नि सहजपणा येत गेला.
कोल्हापुरातल्या ‘हॅपनिंग’ महाद्वाररोडवरून फिरताना माझ्या आतबाहेर ताज्या ताज्या स्वातंत्र्याचा वास तरंगत असायचा... महाद्वाररोडलाही माझ्यासारख्यांचं फिरायला येणं अगदी नवं. भर गर्दीच्या रस्त्यात रोज चार-सहा जण तरी म्हणायचेच, ‘‘अहो, आमच्यासारख्यांना बाहेर पडावं वाटंना या गर्दीत. तुम्ही कशाला येता? कुठं काही कमीजास्त झालं म्हणजे? गपगुमानं घरात शान बसावं की!’’ - मग मी कधी म्हणायचे, ‘फिरायला आलेय. तुमच्यासारखीच’. कधी म्हणायचे, ‘‘खरेदी करायचीय नीट बघूनसवरून’’, तर कधी ‘‘तुम्ही जशी ‘हिरवळ’ पाहून सुखावता तसंच काही मलापण करायचंय.’’ - उत्तरं खूप! मात्र मी येणार, रोज येणार, खरेदी करणार, फिरणार, गप्पा मारणार अशी हळूहळू महाद्वार रोडला सवय होत गेली. लोकांच्या काळजीच्या किंवा अन्य हेतूंच्या प्रश्‍नांनी कोषात न जाता आपल्या अस्तित्वाची व प्रश्नांची सवय करून देणं व्हायलाच हवं होतं... नाहीतर आपल्या साध्यासुध्या गरजांची दखल घेणं आपणही बंद करून टाकतो हे लक्षात येत गेलं.
तर चांगली भाजी घेता येणं ही ही गरजच की माझ्या नव्या संसाराची. पहिल्यांदा स्वत:साठी भाजी मार्केटमध्ये गेले नि सगळीकडं भाज्यांचे ताजे, रंगीबेरंगी ढीगच ढीग पाहून कोण आनंद झाला. भाजीवालीही नवलानं पाहत होती नव्याच स्थितीतल्या गिर्‍हाईकाकडं. मी कोथिंबीर हातात घेतली. किती? असं विचारताना मला लाजायलाच झालं कारण नवंच होतं हे सगळं माझ्याकरता. तिनं सांगितले पैसे नि म्हणाली, ‘‘ताई, ती नको, ही जुडी घ्या. तिला पाक फुल्लं आल्यात.!!’’
सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment