Sunday 18 June 2017

सर्पमित्र संजय


‘‘एकदा मित्राच्या गावावरून येत होतो. रस्त्याच्या कडेला लोकं जमलेले दिसले. हातात दगड, काठया. ते सगळे एका छोटया बिनविषारी सापाला दगडाने ठेचून मारण्याच्या तयारीत होते. तो बिचारा जिवाच्या आकांताने सरपटत होता. मी पटकन समोर गेलो आणि त्याला उचलून खिशात टाकलं. आणि जंगलात सोडलं’’, नांदेड येथील सर्पमित्र संजय नरसिंग अडगुलवार सांगत होते. हे सांगतानाही त्यांना भरून आलं. ते पुढं म्हणाले, ‘‘माझ्या जीवनातील हा अविस्मरणीय प्रसंग. त्या मुक्या प्राण्याची धडपड, सरपटत, दगड चुकवत पुढं जात राहणं आठवलं की माझा कंठ दाटून येतो. साप दिसला की लोक त्याच्या जीवावर उठतात. त्यांनाही संवेदना असतात. निसर्ग चक्रातील तो महत्त्वाचा घटक’’.
संजय यांना लहानपणापासून मुक्या प्राण्यांचं प्रेम. त्यातूनच त्यांनी सापांना वाचवणं सुरु केलं. घरातून विरोध झाला. नंतर मात्र सापांविषयीचं प्रेम, त्यांना वाचवण्याची तीव्र इच्छा बघून त्यांनी विरोध करणं सोडून दिलं.
नांदेड शहराच्या आसपास वस्तीत निघणार्यां सापाचा जीव वाचवून, वनविभागाच्या मदतीनं जंगलात सोडायचं काम संजय अनेक वर्षापासून करत आहेत. वर्षाकाठी साधारण 400-500 साप ते जंगलात नेऊन सोडतात. नांदेड येथील अबचलनगरात त्यांचं किराणा दुकान आणि घर. 1990 पासून ते सर्पमित्र म्हणून काम करू लागले. मित्रांसह त्यांनी ‘सर्पमित्र सेवा संस्था’ स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत ते सापांविषयीचे समज गैरसमज दूर करण्याचे, निसर्गातील त्यांचे महत्व लोकांना समजावून सांगतात. त्यांना संजना आणि मंथन अशी दोन मुले. मुलगी संजना लहानपणापासून वडिलांनी पकडलेल्या सापांना जंगलात सोडण्यापूर्वी त्यांची काळजी घेण्यात मदत करते.
साप पकडल्यानंतर 24 तासात त्याचे जंगलात पुनर्वसन करणं कायद्याने बंधनकारक आहे. हा नियम ते कटाक्षाने पाळतात. आजपर्यंत पकडलेल्या सापांची नोंदही त्यांनी ठेवली आहे. संजय म्हणतात, ‘‘साप पकडणं जिकिरीचं असतं. सापाच्या विषारी, निमविषारी आणि बिनविषारी जाती आढळतात. बिनविषारी साप चावला तरी तो उंदीर, बेडूक असं खाद्य खात असतो. त्यामुळे त्याच्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी औषधोपचार हवेतच’’.
या कामासाठी सरकारकडून कुठलीही मदत मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. संजय सांगतात, ‘‘2012 साली नांदेडमधल्या अजयसिंह बिसेन या नगरसेवकाच्या पुढाकाराने साप पकडण्यासाठी अवजारं मिळाली होती. नांदेड मनपाने सर्पमित्र म्हणून ओळखपत्र दिलं होतं. पण मानधन, मदत, विमा मिळत नाही. एका सर्पमित्राला, विषारी साप चावला. अनेक दिवस त्याला दवाखान्यात राहावं लागलं आणि उपचारही बराच काळ चालले. खूप खर्च झाला. मदतही मिळाली नाही. अशी बिकट परिस्थिती आमच्यावर कधीही येऊ शकते’’.
मनपाला मदत मागितली तर ते म्हणतात, तुम्हाला साप पकडायला आम्ही सांगितलं का? घरात साप निघाला की ते लोक संजय यांना बोलावतात. संजय म्हणतात, ‘‘आम्ही लोकांकडून मानधन, फी घेतली तर ते आम्हाला बोलावणार नाहीत. आणि सापाला मारून टाकतील. तेच नको आहे. ते पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांना वाचवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तीच जबाबदारी मी घेतली आहे’’.
सर्पमित्र संजय अडगुलवार संपर्क क्र. - 9763123485


- उन्मेष गौरकर.

No comments:

Post a Comment