Sunday 18 June 2017

अशीच ... चक्कर

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी: 
किती बरं वर्षांनी गावातून अशी मोकळेपणानं चक्कर मारली? १०? १५?
अशा मोजण्याला खरंच काही अर्थ नाही. मोकळेपणानं चक्कर मारली हे महत्त्वाचंय. मला त्यात खूप खुलं नि स्वत:बद्दल मस्त वाटलं हे महत्त्वाचंय. कुणी काय म्हणेल याचा विचार करत मी स्वत:चा मोकळेपणा घालवण्याची काहीच गरज नव्हती, खरं तर.
जाऊदे. वाया गेलेली वर्ष अक्कलखाती!
शिराळ्याला, तीन नंबर शाळेत जायचे. तेव्हा अपघात झाला नि चालता येणं बंद झालं. त्याबरोबर आणखीही काय काय झालं. त्या सगळ्या गप्पा मूड लागेल तशा मारत जाईन. पण तेव्हापासून, गावात जावं लागलंच काही कारणानं, तर कुणीतरी उचलून सायकलवर किंवा दुचाकीवर बसवायचं नि मग कुठं उतरायचं असेल तर पुन्हा कुणीतरी उचलायचंच. तेव्हा आजूबाजूला जे असतील ते बघायचे. मला कसंतरी व्हायचं. मग खूप वर्षांनी, स्वत:चं काही करता येईल का हे बघण्यासाठी गावाबाहेर पडले. व्हीलचेअर वापरायला सुरुवात केली. तेव्हा प्रथमच कोल्हापुरात गणेशोत्सवाचे देखावे पाहत हिंडले. माझ्याबरोबर त्यावेळी तसेच व्हीलचेअरवाले, कुबडी किंवा वॉकर वापरणारे असेही काही होते. लोक कुतूहलानं बघत होते. आणखी कुठल्या नजरेनं पाहत असतील, तर ते बघायला वेळच नव्हता. कारण पहिल्यांदाच गर्दीबिर्दीत शिरून - देखावे बघा नि प्रसाद घ्या - वगैरेत मी रमून गेले होते.
 मग नंतर कामासाठी खूप शहरं हिंडले. सगळं इतकं अंगवळणी पडत गेलं की आपण चलनवलनासाठी काही वेगळं साधन वापरतोय याचा आठव यायचा नाही.... किंवा असंही की ते साधन, म्हणजे व्हीलचेअर इतकी मनापासून आपलीशी झाली होती की इतरांच्या नजरेत काही दिसलं तरी त्यांच्या प्रश्नांेना बरेचदा खेळकरपणे... गंभीरपणेही उत्तरं देता यायला लागली.
तरी, बरंका, तरीही... मी जिथं खूप वर्ष राहिले नि माझं घरी बसून असणं ज्या गल्लीवाल्यांनी नि गाववाल्यांनी खूप वर्ष पाहिलं तिथं घ्या चेअर नि फिरा असं मी केलेलं नव्हतं. मी माझ्या जोडलेल्या माणसांबरोबर त्यांच्या कारमधून जायचे नि गाडी कोपर्यािला लावल्यावर घराजवळ नेणारी एक चिंचोळी गल्ली तेवढी व्हीलचेअरवरून पार करायचे.
त्या खेपेस मात्र ठरवलं की गावात फिरून माझी गल्ली, शाळेचा परिसर, नागपंचमीच्या वेळेस जायचो, तो अंबाबाई देवळाचा परिसर असा सगळा व्हीलचेअरवरुन चालत पार करायचा. मित्र राहूल नि माझा मानसबाप उदय बरोबर होता. घराच्या मागच्या दारानं बाहेर पडल्यावर पहिल्यांदा स्वागत केलं डवरीणबाईंनी. त्यांनी मला पाहिलं नि ‘ए सोनालीऽऽऽ’ अशी सणसणीत आरोळी ठोकली. टिपिकल हिरवी नऊवारी साडी नेसणार्याा नि ठसठशीत कुंकू लावणार्याल डवरीणबाई रोज ओढ्याला म्हशी घेऊन जायच्या, तेव्हा मला अशीच हाक मारायच्या. माझ्या घरी एकटी असतानाच्या काळात विशिष्ट वेळेची सोबत करायच्या. मधे खूप काळ गेला होता. वयाच्या खुणा उमटल्या होत्या त्यांच्या देहावर. पण मला पाहताना त्यांना झालेला आनंद तोच जुना पण आणि ताजादेखील! लगबग करत आल्या नि गळ्यात पडल्या. त्यांचे खरखरीत हात गालावरून, गालावरूनच काय, माझ्या अख्ख्या अंगावरून फिरवत म्हणाल्या, चांगली दिसतीस गं बाई. कवा आलीस? इलुसा चा करते, चल आत. किती दिवस लावलेस गं यायला? - डवरीणबाईं कडाकडा बोटं मोडत माझी माया करत राहिल्या.
का लावले मी इतके दिवस मोकळेपणानं फिरायला?
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment