Wednesday 21 June 2017

..लोग मिलते गये, कारवाँ बनता गया!

अहमदनगर जिल्ह्यात सैन्याची छावणी आहे. लागूनच रेड लाईट एरिया. इथं राहणारी मुलंही गिरीशसोबत शाळेत शिकत. त्याला एकदा या मित्रांकडे वस्तीत जाण्याचा योग आला. गिरीश तेव्हा आठवीत. आपल्याच वयाच्या काही मुली आणि चाळीशीच्या स्त्रिया शरीरविक्रीचा व्यवसाय करताना दिसल्या. खेळण्याच्या वयातील या मुलींना असलं काम करताना पाहून “या देखील कुणाची तरी, बहिण असतील. मग हे काम यांना का करावं लागतंय? यांच्या जागी आपली बहिण असती तर आपण शांत बसलो असतो का? ” या प्रश्नांनी गिरीश हैराण झाले. या स्त्रियांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यांच्या मुलांच्याही वाट्याला हे अमानवी जगणं आलेलं. मुलांचा प्रश्न गंभीर. गिरीश सांगतात, "अस्वस्थ वाटलं. यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. पण काय करावं? कळत नव्हतं. मला यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं पण मी ते करू शकलो नाही, ही अपराधी भावना घेऊन जगण्यापेक्षा आपण कामालाच सुरुवात केली पाहिजे, असा विचार मनात येत होता”.
गिरीश कुलकर्णी यांचं कुटुंब मध्यमवर्गीय. वडील शिक्षक. समाजसेवेचं तेही अशा प्रकारचं काम करायचं? अनेक आव्हानं समोर होती.
तरीही 1989 च्या जानेवारीत त्यांनी काम सुरू केलं. दोनच मुलांना घेऊन ‘स्नेहालय’ या संस्थेचा जन्म झाला. गिरीश म्हणतात, “तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. मला असे अनुभव येत गेले, की मी फक्त चालत गेलो, आणि लोक जोडत गेले. हे काम मी नसतं केलं तर आणखी कुणीतरी केलंच असतं.”
संस्था सुरू होऊन आता 27 वर्ष झाली आहेत. “एका रात्रीत कुणी बदलू शकत नाही. बदलाची प्रक्रिया सुरूच असते. आपण त्याच बदलाच्या प्रक्रियेचा भाग असतो” ते म्हणाले. स्वत:ला बदलायचा प्रयत्न केला तर जगातला एक माणूस नक्कीच बदलू शकतो. आणि तो अनेक चांगले, सकारात्मक बदल घडवायला इतरांना उद्युक्त करू शकतो, हे आपल्या कार्याने गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या ‘स्नेहालय’नं करून दाखवलं आहे.
स्नेहालयचे चार जिल्ह्यांमध्ये 17 प्रकल्प आहेत. या संस्थांमध्ये एचआयव्हीबाधित स्त्रिया-मुलं, अनाथ मुलं, कुमारी माता, परित्यक्त्यांसाठी काम केलं जातं. सध्या संस्थेत एकूण 400 अनाथ मुलं आहेत. एचआयव्हीबाधीत मुलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल आहे. इंग्लिश मीडियमच्या शाळेत आजुबाजूच्या झोपडपट्टीतील मुलांना गाडी करून आणलं जातं. 20 एकरांचं हिंमतग्राम, अॅडाप्शन सेंटर आहे. आजपर्यंत 300 कुमारी मातांचं पुनर्वसन केलेलं आहे. ‘स्नेहाधार’, ‘स्पर्श’ मतिमंदाची शाळा, डे केअर सेंटर आहे. पुण्यामध्ये कात्रज, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि फोंडाघाटमध्येही संस्थेचे प्रकल्प आहेत. सांगण्यासारखं म्हणजे विश्वस्त मंडळामधल्या महिलांपैकी अनेकजणी देहविक्रयाच्या व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडून संस्थेच्या कामाला हातभार लावत आहेत. एका संवेदनशील तरुणानं मनात आणलं आणि अनेक उपेक्षितांना समाजात मानानं जगण्याची संधी मिळाली. अनेक एचआयव्हीबाधीत स्त्रिया व मुलं औषधं, खाण्यापिण्याची आबाळ न होता आपलं उर्वरित आयुष्य जगताहेत. गिरीश कुलकर्णींच्या बोलण्यातून जाणवतं, ‘अकेला ही चला था मगर... लोग मिलते गये, कारवाँ बनता गया!’
गिरीश कुलकर्णी संपर्क - 0241 2778353, 9011020180, 73

- मंगला घरडे, पुणे

No comments:

Post a Comment