Wednesday 10 October 2018

बालविवाह या विषयावर एक छोटी मोहीम

नवी उमेदवर बालविवाह या विषयावर एक छोटी मोहीम करायचं ठरवलंय, असं मित्रमैत्रिणींना सांगितल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया - असला काही प्रश्नच अस्तित्वात नसल्यासारख्या होत्या. असेलंच बालविवाहाचा प्रश्न, तर तो तिकडे दूर उत्तरेत, बिहार-राजस्थानात असं त्यांचं म्हणणं. 
मी मोहिमेसाठी माहिती, स्टोरीज जमवत होते. तर किशोर पाटील या धुळ्याच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाशी बोलणं झालं. शाळेविषयी, विद्यार्थ्यांविषयी भरभरून बोलणार्‍या या शिक्षकाकडून जे कळलं, त्याने माझं मन विचलित झालं. सरांनी सांगितलं ते असं: 4 वर्षापूर्वी त्यांच्या गावातील एक मुलगी, सविता सहावीत शिकत होती. 12 वर्षांची हसरी, खेळती मुलगी. या अवघ्या 12 वर्षाच्या कोवळ्या मुलीचा विवाह 22 वर्षीय तरुणाशी लावला गेला. मुलगा मोलमजूरी करणारा. सरांनी या कुटुंबाशी संपर्क साधला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ऐकेल कोण? तरीही किशोर सर प्रयत्न करत राहिले. शेवटी मुलीच्या कुटुंबियांनी त्यांना सांगितलं, की फक्त लग्न लावू. मुलगी इथेच राहील, शिकेल. 18 वर्षांची झाली की सासरी पाठवू. पण तसं झालं नाही. तिला सासरी जावंच लागलं. सविता हुशार होती. तिने शिकण्याची जिद्द सोडली नाही. दहावीची परीक्षा तर तिने पोटातल्या बाळासोबत दिली. तिची शिकण्याची धडपड पाहिली की वाटतं, बालविवाहाची ही वाईट प्रथा कायद्याने बंद केलीच आहे. ती प्रत्यक्षातही बंद व्हावी. माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीत, अशा प्रथा काय कामाच्या? मुली या आधी माणूस आहेत. त्यांना देखील स्वप्न, इच्छा-आकांक्षा आहेत. ”
सरांनी जे सांगितलं ते वास्तव आहे. आपल्या, सुधारणावादी महाराष्ट्रातलं, देशातलं तिसरं श्रीमंत राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातलं वास्तव. मुलींच्या बाबतीत महाराष्ट्र अजूनही मागासच आहे.
बालविवाहाची महाराष्ट्रात काय स्थिती हे बघितलं, तर हबकायला होतं.
- महाराष्ट्रात ३० ते ४० टक्के मुली १८ वर्षाच्या होण्याआधीच विवाहित झालेल्या असतात. या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान व पश्चिम बंगाल यांच्या नंतर लागतो.
- बालविवाहांचं वाढतं प्रमाण असणार्‍या देशभरातल्या ७० जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातले पुढील १६ जिल्हे आहेत: अहमदनगर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, पुणे, सांगली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातुर, मुंबई, मुंबई उपनगर, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे.
- भंडारा जिल्ह्यात २००१ ते २०११ या दहा वर्षांत मुलींच्या बालविवाहात पाच पट आणि मुलांच्या बालविवाहात २० पट वाढ झाली आहे. 
- मुलग्यांचे बालविवाह अधिक प्रमाणात होणार्‍या देशातल्या १४ राज्यांच्या यादीतही महाराष्ट्राचा समावेश आहे. 
- राज्यातल्या २०-२४ वयोगटातल्या स्त्रियांपैकी २५% स्त्रियांचे बालविवाह झालेले असतात.
- बालविवाहांचं प्रमाण हे, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये वाढतं आहे. 
- राज्यात 15 वर्षाखालील मुलींची संख्या 1 कोटी 48 लाख 40 हजार इतकी असणं. त्यापैकी 63 हजार 468 मुलांचे बालविवाह झाल्याचं निदर्शनास आल्याबद्दलचा प्रश्न विधानपरिषदेत 2011, 12, 13 साली उपस्थित झाला आहे.
- अशा बालविवाहामुळे मुलींच्या शरीराचं काय नुकसान होतं त्याचाही विचार केला जात नाही. विवाहानंतर मुलीला लगेच गर्भ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढ होत नाही. वाढ खुंटते. जन्माला येणारं बालक कमी दिवसांचं, कमी वजनाचं, कुपोषित असण्याची शक्यता वाढते. नंतरच्या काळात बालकाचं हे नुकसान भरून निघत नाही. कोवळ्या वयातील लग्नानंतर येणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांमुळे मुलीची मानसिक वाढही निकोप होत नाही. लहान वयात लग्न झालेल्या पुरुषालादेखील जबाबदारीचं दडपण जाणवतं.
हे वास्तव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठीच ‘नको लगीनघाई’ ही मालिका आम्ही सुरू करत आहोत. बालविवाहाचं वास्तव आहे. पण, जबाबदार नागरिक म्हणून बालविवाह थांबवण्यातही अनेकांनी पुढाकार घेतलेला आहे. यामध्ये स्मिता काळे मुंबई, गजानन जाधव रायगड, रमेश शेलार पुणे, वर्षा पवार जालना, ॲड रंजना गवांदे अहमदनगर आहेत. काही आमदार-खासदारांना आम्ही बोलायला सांगतो आहोत. नयना, सुगंधी, सविता, जयश्री अशा मुलींच्या खर्‍याखुर्‍या स्टोरीज मालिकेत वाचायला मिळतील. 
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई!
- वर्षा आठवले

No comments:

Post a Comment