Friday 26 October 2018

वंदनाची गोष्ट: भाग २ -दागिन्यांचा डबा गायब झाला होता. त्यात माझे झुमके, फुलं, रिंगा, गळ्यातलं होतं.


ज्याच्यावर भरोसा करुन आपण घरदार सोडून आलो त्या माणसाची संगत अशी खराब आहे, हे पाहून मला फार राग आला. त्याला मी तावातावाने बोलले, 'असे कसे तुझे मित्र? तू तरी नीट रहा. अशा लोकांसोबत राहू नकोस'. बाबूने हो हो केले आणि मला काही दिवसांनी माझ्या घरी आणून सोडले. लोक काहीही बोलले, तरी धाकटी बहीण घरी परतली म्हणून माझ्या मोठ्या भावाला खूप आनंद झाला. त्याचा खूप जीव माझ्यावर. मी लगेचच परत येतो, असं सांगून बाबू नाहिसा झाला. त्याला लग्न नको होतं, मला फक्त फितवायचं होतं, हे माझ्या लक्षात आलं. पण मी हार मानायला तयार नव्हते. भाऊ म्हणाला, 'चांगला नाही तो, कशाला त्याच्याबरोबर राहायचंय तुला? तू इथेच राहा.' पण मी वेडीपिशी झाले होते.
आता वाटतं, नशिबानं संधी दिली होती, ती मी घालवली. नसते त्याच्या मागे लागले, तर आज आयुष्य फार वेगळं असतं.
एकदा एकानं सांगितलं, बाबू मुलूंड टोलला दिसला. कामधाम सोडून तिथे गेले. तो दिसला. त्याला पकडून नातेवाईकांकडे घेऊन आले.
मी बाबू पुजारीबरोबर २४ जून १९९६ रोजी कोर्ट मॅरेज केलं. आमचा प्रेमविवाह होता. मी घरकाम करत होते, त्यांच्याकडून कर्ज काढून सायन कोळीवाड्यात जागा विकत घेतली. बावीस हजार कर्ज काढलं, दहा हजार रुपये मोकळ्या जागेसाठी दिले. उरलेले बारा हजार नवर्‍याला घर बांधण्यासाठी दिले. त्याने चार हजार त्यावर खर्च केले. उरलेले पैसे हरवले, असं खोटं सांगितलं.
तिथे राहत असताना मी व्हीटीला काम करायला जात असे. त्याच्यासाठी त्या जागेत दुकान काढण्याचा माझा विचार होता. त्यासाठी मी पैसे जमा करत होते. मी कामावर गेल्यावर, बाबू तिथे मित्रांना घेऊन जुगार खेळत बसे. मला याची कल्पना नव्हती. दुकानासाठी मी तीन हजार रुपये घरात साठवले होते. एकदा, ते पैसे घ्यायला मी गेले असताना, त्यात फक्त सहाशे रुपये शिल्लक राहिलेले बघून मला धक्का बसला. नवर्‍याला जाब विचारायला गेल्यावर, त्याने उलट हात उगारला. मला तू विचारणारी कोण,असं म्हणाला. त्यानंतर मी पैसे घरात साठवणं बंद केलं आणि जिथे कामाला होते, तिथे पैसे साठवायला सुरूवात केली.
१९९७ साली मी गरोदर राहिले. याच काळात एक दिवस त्याने मला भीती दाखवली की, तीन हजार रुपये दिले नाहीस, तर माझा भाऊ मला गावी घेऊन जाईल, तू मला तीन हजार रुपये दे. मी घाबरले, माझा त्याच्यावर विश्वास बसला. मी त्याला पुन्हा दागिने गहाण ठेऊन त्याला पैसे दिले. माझे सगळे दागिने आता गहाण ठेवलेले होते. मी पुन्हा कामाच्या पगारातून थोडे थोडे पैसे साठवले, पैसे जमवले आणि ते दागिने सोडवले. माझ्याकडून घेतलेले पैसे त्याने कुठे उडवले, हे माहीत नाही.
दागिन्यांचा डबा घरात होता. तोही गायब झाला. त्या डब्यात माझे झुमके, फुलं, रिंगा, गळ्यातलं होतं. त्याला मी जाब विचारला, तर तो उलट तूच नीट ठेवलं नसशील, असं मला म्हणाला. मी म्हणाले, मी कामावर जाते, घरातले दागिने असे कसे गेले, असं पुन्हा म्हणाल्यावर, मी इकडे तिकडे गेलो होतो तेव्हा गेले असतील, असं काहीबाही म्हणाला. तरीही मी कामावर साठवलेले पैसे आणि कामावर घेतलेले कर्ज याच्या मदतीने त्याला किराणा दुकान घालून दिलं. त्यावेळी मला सहावा महिना सुरू होता.
तो सुरूवातीला दुकान चांगलं बघत असे. महिन्याला दीडेक हजार कमाई होत असे. माल आणायला जातो, असं सांगून रात्री उशिरा जाई. माल न आणता रात्री बेरात्री परत यायचा. परत आल्यावर पैसे गायब झालेले असायचे. त्याच्या एका मित्राने, माझी दया येऊन मला एक दिवस सांगितलं, की तो लेडीज बारमध्ये आणि दारूच्या गुत्त्यावर जातो, जुगार खेळतो आणि पैसे उडवतो. हे चालूच राहिलं.
.........
मी गरोदरपणातही नऊ महिने काम करत होते. 

 (शब्दांकन: भक्ती चपळगावकर)

No comments:

Post a Comment