Sunday 21 October 2018

तेरावा आणि गंगापूजनाचा खर्च टाळून शिक्षणासाठी मुलींच्या पालकांना केलं प्रोत्साहित

जालना जिल्हा. अंबड तालुका. शहागड गाव. इथलं वलेकर कुटुंब. कुटुंबातल्या आईचं, उषा शिवाजीराव वलेकर यांचं गेल्या महिन्यात निधन झालं. उषाताईंना तीन मुलं. मोठा मुलगा शांताराम स्पर्धापरिक्षेची तयारी करतोय. मधला धनंजय रशियातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आलेला तर धाकटया अमोलनं औषधनिर्माण शाखेचा अभ्यासक्रम केलाय. आईच्या मृत्यूचं दुःख होतंच. आईच्या स्मृतिसाठी समाजोपयोगी असं काही करायचं होतं.
तीन मुलांनी मिळून तसं ठरवलं. रूढीपरंपरा टाळून वेगळं काही करायचं ठरवलं. त्यांनी दिवंगत आईचं तेरावं आणि गंगापूजन याचा खर्च टाळला. गावातल्या 3 ते 5 वर्ष वयोगटातल्या सर्वधर्मीय 24 मुली निवडल्या. आणि प्रत्येक मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येकी 1 हजार रुपये भरले. पालकांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी नियमित बचत करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित केलं.
शासनाच्या असंख्य योजना येतात परंतु त्या गरजूंपर्यंत पोहचत नाहीत, हे लक्षात घेऊन आम्ही पैशाचा सदुपयोग करण्याचं ठरवलं,असं वलेकर बंधू सांगतात.
वलेकर कुटुंबीयांचं हे समाजभान आणि त्याला अनुसरून त्यांनी आईच्या मृत्यूनंतर केलेली कृती अनुकरणीय आहे, नाही का?
-अनंत साळी.

No comments:

Post a Comment