Sunday 21 October 2018

बालविवाह थांबवण्यासाठी गावोगावी घेतले मेळावे


साधारण 1980-82 च्या काळात आम्ही स्त्री आधार केद्रातर्फे वेगवेगळ्या गावात, झोपडपट्टीत महिलांच्या सभा घेतल्या. महिलांमध्ये जागृती करण्याचा आमचा प्रयत्न चालू होता. रमेश शेलार गुरूजी स्त्री आधार केंद्राने बालविवाह थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची गोष्ट सांगत होते. 
पुण्याजवळंच फुरसुंगी गाव. या गावातही बैठक झाली. सरपंच बाकी गावातील लोक असे बरेचजण यावेळी उपस्थित होते. 18 वर्षांच्या आत मुलीचं आणि 21 वर्षांच्या आत मुलाचं लग्न करायचं नाही. असा कायदाही असल्याचं आम्ही लोकांना सांगत होते. असं का तर 18 वर्षांच्या आत मुलीचं मन, शरीर लग्नासाठी तयार झालेलं नसतं. त्यामुळे पुढे मग अल्पवयीन मातेचा, बाळाचा मृत्यू अशा घटनांना सामोरं जावं लागतं. यासाठीच मुलीला किमान 18 वर्ष पूर्ण करू द्यावीत. असं आम्ही सांगत होतो. हे सांगून आम्ही वस्तीतून बाहेर पडलो. त्याच वस्तीत दोन बहिणी होत्या. त्यातल्या एकीचं 16 व्या वर्षीचं लग्न ठरलं. हे आमच्यापर्यंतही आलं. पण, तोपर्यंत नुकत्याच झालेल्या बैठकीचा फायदा झाला. जिचं लग्न ठरलं होतं तिनंच मुलाकडच्यांना सांगितलं, “माझं वय 16 वर्ष आहे आणि आई-वडील माझ्या इच्छेविरोधात माझं हे लग्न करत आहेत. आणि अजून दोन वर्ष मला लग्न करायचं नाही.” अशा तऱ्हेने हे लग्न थांबलं. यावेळी मुलगीच बोलायला पुढं आली हे पाहून स्त्री आधार केंद्राने मग वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालयात असे बालिका जागृती मेळावे घेतले.
जन्माला आल्यानंतर समान हक्क आहेत, आहाराविहाराचं स्वातंत्र्य आहे आणि 18 व्या वर्षाच्या आत तुमचं कुणी लग्न ठरवलं, फसवून करून द्यायचं ठरवलं तर त्याला तुम्ही विरोध करू शकता हा तुमचा नैतिक अधिकार आहे असंही या जागृती मेळाव्यात सांगितलं. असे जवळपास 130 मेळावे आम्ही घेतल्याचं शेलार गुरूजींनी सांगितलं.
2016 सालची ही गोष्ट. आळंदीमध्ये बरेच विवाह होतात. असाच एक अल्पवयीन मुलीचा विवाह तिथं होत असल्याचं आम्हांला कळलं. तिथं सविता लांडगे म्हणून केंद्राच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आणि पिंपळेगुरवच्या इंदू ढाले या कार्यकर्त्यांनी आम्हांला फोन केला. आमच्या कार्यकर्त्या पोलीस ठाण्यात गेल्या. तिथं विवाहाची माहिती दिली. अगदी विवाहाच्या पत्रिकाही त्यांनी मिळवल्या होत्या. त्याही दाखवल्या. मग पोलीस, कार्यकर्ते असे सर्वचजण त्या कार्यालयात गेले. तिथं त्या लग्नाचं बुकींग केलेलं त्यांनी बघितलं. लगोलग त्यांनी मुलीच्या आणि मुलाच्या पालकांना कळवलं. आई-वडील आणि मुलाकडचे लोक यांच्याशी बोलून, त्यांना समजावून सांगितल्यानं हा विवाह थांबला.
उरळीकांचनची अशीच एक घटना. थेऊरला ऊस कारखाना. ऊसतोडणी कामगाराची सविता ही मुलगी. 13 व्या वर्षी वयात आली आणि लगेचच तिचं ठरवलं गेलं. तिथल्या स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांनीच ही बातमी आणलेली. प्रतिभाताई कांचन या तेव्हा तिथल्या दूध डेअरीच्या प्रमुख होत्या. शेलार गुरूजी सांगतात, या ताईंशी फोनवर बोलणं केलं. त्यांना या विवाहाची माहिती दिली.” मग मुलीच्या पालकांना ग्रामपंचायतीत बोलावलं गेलं. मुलीची आई म्हणाली, “मुलगी सातवी शिकली. बास झालं. आम्हांला काही तिला पुढं शिकवायचं नाही. आमची तिला शिकवण्याइतकी परिस्थितीही नाही.” मुलीनंही पुढं शिकायची इच्छा व्यक्त केली. मग ते लग्न तिथंच थांबलं आणि संस्थेने तिच्या राहण्यासाठी वसतीगृहाची व्यवस्था केली आणि शिक्षणाचीही व्यवस्था केली. विशेष म्हणजे या मुलीचं तेव्हा लग्न थांबलं आणि तिला शिकायला मिळालं. नंतर गावी परतल्यावरही ती काकांच्या घरी राहिली. शिक्षण पूर्ण करूनच विसाव्या वर्षी तिचं लग्न झालं.
बालविवाह थांबवल्याच्या अगदी 1982-85 पासूनच्या अशा अनेक घटना सांगूनही आजही बालविवाह सुरू असल्याचं शेलार गुरूजी नमूद करतात. आणि आजही असे विवाह थांबावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू असल्याचं ते सांगतात.
वाचकहो, तुम्ही या मालिकेतल्या स्टोरीज वाचून, अधिकाधिक शेअर करून आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं, हेच कळकळीचं सांगणं. कारण, नकोच करूया लगीनघाई! 

No comments:

Post a Comment