Wednesday 17 October 2018

नगरच्या 'दुर्गे'ची सजगता, रोखले १७३ बालविवाह


"ताई, मी चार वर्षांची होते. तेव्हा, चाळीशीत असलेल्या व्यक्तीसोबत माझं लग्न लावून दिलं आहे. आता तो पंचाना "माझी बायको द्या'' म्हणून सांगत आहे. पंचही मला त्याच्याकडे पाठवण्याचा दुराग्रह करत आहेत. विरोध केला, तर आम्हा कुटुंबियांना वाळीत टाकलं जातंय.'' कळती झालेली ती आशा आपली व्यथा अॅड.रंजना पगार-गवांदेंना सांगत होती. विषय गंभीर. मग काय, रंजना यांनी यंत्रणेच्या साथीने जातपंचांशी संघर्ष करत शिताफीने आशा अन् तिच्या कुटुंबियांची सुटका केली. अशा पद्धतीने आतापर्यंत तब्बल १७३ बालविवाह रोखण्याची कामगिरी रंजना गवांदेंनी पार पाडली.रंजना पगार-गवांदे संगमनेर इथं वकिली करतात. त्यांचा मूळ पिंड समाजसेवेचाचं. गेल्या ३ दशकांपासून त्या सामाजिक कार्यात असून अडल्यानडल्यांसाठी आधार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम, भटक्‍या-विमुक्त समाजाचे प्रश्न मांडणं, सोडवणं आणि जातपंचायतीच्या जाचातून कुटुंबांची सुटका करणं, ही त्यांची विशेष कामं. रंजनाताई सांगत होत्या, "भटक्‍या समाजात मुलींचे वय आठ-नऊ वर्ष झालं की, लग्न लावण्याची परंपरा. काही मुला-मुलींची तर रांगत्या वयातच लग्नं लावली जातात. भटक्‍या समाजात बहुतांशी बालविवाह होतात. शिवाय, हा समाज कायद्यापेक्षा जातपंचायतीला अधिक महत्व देतो. लग्न जमवणं, मोडणं, दंड करणं आदी निर्णय पंच घेतात. त्यामुळेचं सन २०१५ पासून अंनिसद्वारे 'जातपंचायत निर्मूलन अभियान' हाती घेत, अन्यायकारक निर्णय, प्रामुख्याने बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 
‘भटक्‍यांची पंढरी’ अशी ओळख असलेलं मढी (जि.नगर). इथे होळीच्या सुमारास जातपंचायती भरतात. रंजनाताईंनी तिथे बालविवाहांना विरोध केला. २०१६ मध्ये नगरला एकाच वेळी भटक्‍या समाजातील नऊ विवाह होते. सर्वच अल्पवयीन मुलामुलींचे. हे कळताच ताईंनी यंत्रणेच्या साथीने कार्यक्रम रोखला. त्यात फक्त तीन वधूे-वरांच्या वयाचे दाखले होते. बाकीचे बालविवाह. म्हणून रोखले. मात्र, त्याच रात्री त्या लोकांनी बाहेर जाऊन लग्नं लावली. ताईंनी पुन्हा पाठपुरावा केला, महिला आयोगाकडे धाव घेतली. शेवगाव (जि.नगर) इथे एकाच वेळी होऊ घातलेले तीन बालविवाह थांबवले. लग्न थांबवल्यानंतर मुली बोलत्या झाल्या, "आम्हाला शिकायचंय, मोठं व्हायचंय, पंच लग्न लावून देत आहेत. अन्याय होतोय, पण कोणाला
सांगणार.'' मुलींच्या अशा व्यथा अंतर्मुख करतात, रंजनाताई सांगतात.
श्रीरामपुरचं एक प्रकरण. एका प्रकरणात सुमनच्या नवर्‍याला, अशोकला जेलमध्ये जावं लागलं. त्यानंतर, पंचांनी सुमनचं दुसरं लग्न लावलं. शिक्षा भोगून परतल्यावर अशोकने पत्नी सुमन हिची मागणी केली. जातपंचायतीने अशोकचा विवाह एका तीन वर्षीय बालिका अमृता हिच्याशी लावला. अमृता १२ वर्षाची होताच अशोकने मुलीला स्वतःकडे पाठवण्याची मागणी केली, पंचांनीही तसे आदेश दिले. अमृतासह तिच्या आई-वडीलांनी विरोध केल्यावर त्या कुटुंबाला अख्या जातीने वाळीत टाकलं. सलग पाच वर्ष एक लाखाचा दंड केला. तिच्या घटस्फोटाला पंच विरोध करत होते. मात्र रंजना यांनी अमृता आणि तिच्या कुटुंबासाठी वर्षभर लढा दिला. पंच आणि समाजातल्या प्रमुखांचं प्रबोधन केलं. आणि अमृताला न्याय मिळवून दिला. अशा पद्धतीने आतापर्यत नगरसह औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड, भंडारा, कोल्हापुर भागात १७३ बालविवाह रोखत मोलाची कामगिरी केली.
नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कारासह २० पुरस्काराने रंजना गवांदेंचा म्हणजेच 'नगर जिल्ह्यातील दुर्गे'चा गौरव झाला आहे.
- सूर्यकांत नेटके.

No comments:

Post a Comment