Friday 12 October 2018

आज नयना-नितिन त्यांच्या दोन लेकरांसोबत मजेत जगत आहेत.


नयना दिसायला अतिशय सुंदर. तिचं सौदर्यच तिचा जणू घात करू पाहत होतं. नयनाच्या बालपणीच तिची आई मरण पावली. ते कमी म्हणून की काय, तिचे स्वतःचे वडील नयनाकडे वाईट नजरेने पाहू लागले. आजीने परिस्थितीचं भान राखून नयनाला मराठवाड्यातल्या एका आश्रमात ठेवलं. तिथेही जमेना. म्हणून आजीने नयनाला एका ओळखीच्या बाईकडे, तिला दीदी म्हणूया, आश्रयाला ठेवले. आश्रयाला म्हणून ठेवलेल्या नयनाला खरं तर आजीने 'विकलं' होत. 'विकलं' शब्द वापरताना मनाला यातना होताहेत. आजीलाही झाल्या असाव्यात. दीदीकडे आणखीही मुली होत्या. दीदीचा व्यवसाय निराधार मुलींच्या जिवावर कमाई करणं, हा होता.
एकदा असं झालं, दीदी नयनाला दाखवायला कर्जत इथं घेऊन आली. त्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला नयना पसंत पडली. आणि बाईला 5 लाख द्यायचं ठरलं. साखरपुडा झाला. ठरल्यानुसार तिने अडीच लाख आधी घेतले. गावी जाऊन येतो. आल्यावर लग्न करू, असं मुलाकडच्यांना सांगितलं. पण, मुलाचे आईवडील लगेचच लग्न करायचं म्हणून हटून बसले.
मात्र, यावेळी बाईचा प्लॅन फसला. नयनाला तो मुलगा, नितिन त्याचं नाव, आवडला. आणि तिने नितिनकडच्या लोकांना सांगून टाकलं की, या बाईने सांगितलं असलं, तरी ती पुन्हा येणार नाही. झालं, बाईचा प्लॅन उघडकीस आला. आता हे प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी नयनाला बालकल्याण समिती रायगड (महाराष्ट्र शासन) पुढं आणलं. 'स्त्रीशक्ती संघटना रायगड'च्या अध्यक्षा आणि तत्कालीन समितीसदस्य स्मिता काळे यांना कळवलं. पोलिसांनी समितीला सांगितलं की, नयनाला ताब्यात घ्यावं. नयना अजून १८ वर्षांच्या आतली आहे. तिला १८ वर्ष पूर्ण होण्याकरिता ६ महिने बाकी आहेत. त्यानंतरच तिचं लग्न करून द्यावं.
प्रथमदर्शनी ही बालविवाह केस असावी, असंच त्यांना वाटलं.
स्मिताताई म्हणतात, "नयनाशी बोलल्यावर सत्य समोर आलं. नयनाच्या सौंदर्याचा, असहायतेचा फायदा घेऊन, दीदी अनेक मुलांना तिचं तुमच्याशी लग्न लावते म्हणून पैसे उकळायची. आणि नंतर ते गाव सोडून नयनाला दुसऱ्या शहरात नेत असे. दीदीने नयनाला मुंबई,औरंगाबाद, गुजरात आणि राजस्थान इथे नेऊन पैसे कमावले होते. अनेकांकडून पैसे घेऊन लग्न ठरवत साखरपुडा करून, लग्न नंतर, म्हणून पैसे घेऊन गंडवलं होतं."
नयनाला आणि नितिनच्या कुटुंबाला विश्वासात घेऊन बालकल्याण समितीने तिला ६ महिने बालगृहात सांभाळलं. त्याचवेळी रायगड मुख्य पोलीस अधीक्षक आणि स्मिताताईं यांनी मराठवाड्यातील संबधित पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार त्या दीदीेविरुदध तक्रार नोंदवली. अशा रीतीने, हे रॅकेट उघडकीस आणलं गेलं. नयनाबरोबर अनेक मुली मुक्त झाल्या. नयना ६ महिन्यानंतर १८ वर्षांची झाली. त्यानंतर नयनाचं नितिनशी लग्न लावून दिलं गेलं. आज नयना-नितिन त्यांच्या दोन लेकरांसोबत मजेत जगत आहेत.
- लता परब

No comments:

Post a Comment