Thursday 25 October 2018

… आणि गुंता अलगद सुटत गेला

“तुम्ही बसने जात आहात आणि अचानक शेजारी बसलेल्या व्यक्तीने तुमच्या मांडीवर हात ठेवला”, काय कराल?...
“तुला, समोरची व्यक्ती आवडते... आवडते की तिच्या विषयी आकर्षण आहे...”
“समोरच्याला ‘लाईन’ देणं म्हणजे काय?” …
असे प्रश्न आपल्याला कुणी विचारले तर आपण त्या व्यक्तीकडे रागाने बघत सरळ निघून जाऊ. पण नाशिक येथील रचना विद्याालयाच्या सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मात्र आरोग्य भान चळवळीच्या वतीने भरविण्यात आलेल्या ‘अभिरूप न्यायालयात’ या सर्व प्रश्नांची अगदी मोकळेपणी उत्तरं दिली. 
या संवादातून मुलांमध्ये लैंगिक शिक्षण, आरोग्य तसेच स्व-विषयीचे भान यामध्ये झालेला गुंता अलगद सुटत केला. याला निमित्त ठरले ते पुणे येथील डॉ. मोहन देस यांच्या ‘आरोग्य भान’ चळवळीच्या वतीने आयोजित ‘दुसरे दशक’ कार्यक्रमाचे. वयात येणाऱ्या मुलांना शरीरात आणि मनात होणारे बदल समजावून सांगणं हे नेहमीच कसोटीच काम असतं. पालक आणि शिक्षकांपुढे हा नेहमीच प्रश्न असतो की, मुलांना मासिक पाळी, प्रजनन, गर्भधारणा, बाळाचा जन्म, प्रेम, आकर्षण, बाल लैंगिक शोषण या गोष्टी कशा समजावून सांगायच्या. नुसता ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ सांगून भागत नाही. मुलांच्या हातात गॅजेट्स आहेत. या आधुनिक गुरूला हातात घेत ही मंडळी वेगळ्याच विश्वाात रममाण होतात. अशावेळी 'लैंगिक संवाद' ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. ही गुंतागुंत सोडविण्यासाठी आरोग्यभानने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना अभिरूप न्यायालय आणि कार्यशाळेच्या माध्यमातून बोलते केले. 
नाशिक येथील ‘रचना विद्यालय’ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त शाळेच्या माजी विद्यार्थी संस्थेचे सहकार्य घेऊन सन १९९३ मधील दहावीच्या बॅचने शाळेला ‘गुरूदक्षिणा’ देण्याचे ठरवले. त्यानुसार सर्वांनी एकत्र येत शाळेतील किशोरवयीन मुलामुलींसाठी संवादातून लैंगिक शिक्षण द्यायचं ठरवलं. 
‘रचना विद्याालय माजी विद्यार्थी संस्थे’च्या सहकार्याने आणि १९९३ साली दहावी झालेल्या बॅचने यासाठी पुढाकार घेतला. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाविषयी फारशी माहिती नसल्याने किशोरवयीन मुलं-मुली कुतुहलाने तर कधी अजाणतेपणी वेगळ्याच अडचणीत सापडतात. त्यांना योग्य माहिती योग्य व्यक्तीकडून मिळावी यासाठी हा उपक्रम घेण्यात येत असल्याचे माजी विद्याार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याची सुरूवात नुकतीच ‘दुसरे दशक’ शिबिराच्या निमित्ताने झाली. दुसरे दशक म्हणजे ११ ते २० वयोगटातील मुलांशी संवाद. या अंतर्गत वयात येतांना होणारे शारीरिक बदल, आकर्षण म्हणजे काय, शरीर संबंध, समलैंगिकता, ब्रेकअप नंतर काय करायचं अशा विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात आलं. या विषयांना न्याय देता यावा पण मुलांनीही मनमोकळेपणाने यात सहभागी व्हावे यासाठी कार्यशाळेची ठराविक चौकट मोडली गेली. 
डॉ. देस यांनी कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन टाळत मुलांना एखादा आकृतीबंध तयार करायला सांगितलं. मुलांनीही एकत्र येत एक आकृतीबंध तयार केला. मुलांशी संवाद साधतांना आपलं नाव आणि आपण निसर्गातील कुठल्या गोष्टीशी साधर्म्य ठेवतो ही ओळख देण्यास सांगितलं. मुलांनाही हे काहीतरी वेगळं आहे, असं जाणवलं. आणि त्यांची कळी नकळत खुलत गेली. दोन ते चार मिनिटांमध्ये मासिक पाळी म्हणजे काय, आपण लहान असताना आणि आता पालकांच्या वर्तनात झालेला बदल, जबाबदारी घेणे म्हणजे काय अशा वेगवेगळ्या विषयांवर छोटी नाटकं बसविण्यास सांगण्यात आली. यातून आनंद, दुःख, ताण, शरीरात होणारे बदल म्हणजे काय अशा विषयांवर मुलं बोलती झाली. या सर्व विषयांशी संबंधित प्रश्न अभिरूप न्यायालयात विचारले गेले. कार्यशाळेचा विशेष म्हणजे त्याचा शेवटचा भाग म्हणायला हवा. कारण या समारोपात मुलांनीच पालकसभा घेतली. आणि कार्यशाळेत आपण नेमके काय शिकलो याची माहिती त्यांच्याच शब्दात पालकांना दिली.
- प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment