Monday 29 October 2018

ना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी

आकाशकंदील, पणत्या, रंगरांगोळ्या, उटणी, शुभेच्छापत्र, सजावटीच्या असंख्य वस्तू..... दिवाळी आलीच. रत्नागिरीतल्या अविष्कार संस्थेतही या वस्तू तयार आहेत. सहानुभूती, मदत यापेक्षा प्रौढ गतिमंद व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी 32 वर्षांपूर्वी डॉ शाश्वत शेरे यांच्या घरात स्थापन झालेली संस्था. 

गतिमंदांसाठी सौ.सविता कामत विद्यामंदिर, श्री शामराव भिडे कार्यशाळा, वर्षा चोक्सी बालमार्गदर्शन केंद्र, कै.प्रताप मंगेश कानविंदे शीघ्र उपचार केंद्र, आविष्कार उत्पादन केंद्र अशा विविध माध्यमातून संस्था कार्यरत.
संस्थेच्या श्री शामराव भिडे कार्यशाळेत प्रौढ दिव्यांग
व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. गतिमंद व्यक्तींमध्येही सुप्त कलागुण दडलेले असतात. त्यांना वाव दिला तर या व्यक्तीही उत्पादनकर्ते होऊ शकतात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात. या विचारातून 26 वर्षांपूर्वी कार्यशाळा सुरू झाली. यातून आतापर्यंत 37 व्यक्तींचं व्यावसायिक पुनर्वसन झालं आहे. आपल्या कुटुंबाला ते आर्थिक हातभार लावत आहेत. सध्या सुमारे 180 व्यक्ती या कार्यशाळेत प्रशिक्षण घेत आहेत.
स्टेशनरी, मेणबत्ती, ज्वेलरी मेकिंग, शिवण,हस्तकला, गृहशास्त्र, प्राथमिक सुतारकाम, मेणबत्ती, असे विभाग यासााठी आहेत.

गेल्या 10 वर्षांपासून दिवाळी उपक्रम. पुण्यातील लक्ष्य फाउंडेशन आणि आविष्कारचे हितचिंतक अशोक कुलकर्णी यांनी यंदा मोठी ऑर्डर दिली असल्यानं संस्थेत लगबग दिसत आहे. अध्यक्ष नीला पालकर, सचिव डॉ .उमा बिडीकर, शामराव भिडे कार्यशाळा समिती अध्यक्ष नितीन कानविंदे आणि व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यासाठी अपार मेहनत घेत आहेत. 
सर्वसामान्यांनाही लाजवेल अशा कलाकृती या निरागस मुलांनी केल्या आहेत. या वस्तू केल्यावर त्यांच्या चेहऱयावरील आनंद पाहून पालकही आनंदित होत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह मुख्य प्रवेशद्वार इथं 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुलं स्वतः या वस्तूंची विक्री करणार आहेत. मुलांच्या जिद्दीला हातभार लावण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. अधिकाधिक स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी नफ्यातली 60 टक्के रक्कम मुलांना दिली जाणार आहे. 
-जान्हवी पाटील.

No comments:

Post a Comment