Wednesday 31 October 2018

सॅनिटरी पॅड्सचं पाकिट लपवून न्यायची काय गरज?

"मासिक पाळीकडे आपण कटकट म्हणून पाहत असू, त्यासाठी महिन्याचे चार दिवस वाया घालवणार असू, तर महिला सक्षमीकरण, समानता या मुद्यांवर आपण कसं बोलू शकतो?" मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस विचारत होत्या.स्थळ नाशिकमधलं महाकवी कालिदास कलामंदिर. अहिल्या फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेचा कार्यक्रम: 'संकल्प स्त्रीत्वाच्या सन्मानाचा, तिचे आरोग्य, तिच्या निरोगी जीवनाचा’. गेलमार्क कंपनीच्या मदतीनं 1,064 शाळांमधल्या दीड लाख विद्यार्थिनींना 10 लाख सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप. या उपक्रमाची वंडर बुक ऑफ लंडनकडून दखल घेतली गेली.
इथे एक घडलं.
कार्यक्रमात, मुली स्टेजवर मिळत असलेलं पॅडचं पाकीट लपवून नेत होत्या. अमृता यांना ही बाब खटकली. त्यांनी मुलींशी संवाद साधला. "सॅनिटरी पॅड्सचं पाकिट लपवून न्यायची काय गरज? मासिक पाळी ही नैसर्गिक प्रकिया आहे. निसर्गाने बहाल केलेल्या स्त्रीत्वाचा सन्मान करा. आज अनेक मुली वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. कारण त्या मासिक पाळीचं चक्र भेदून पुढे गेल्या, हे त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणातून पटवून दिलं. आयुष्यात एक ध्येय बाळगा आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला अमृता यांनी मुलींना दिला. त्यानंतर, मात्र मुलींनी हातातच पाकीट ठेवून रांगेतून पुढे जाणं पसंत केलं.
अहिल्या फाऊंडेशनचे प्रमुख माजी आमदार जयंत जाधव यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. "ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या जवळून पाहिल्या आहेत. मलाही मुलगी आहे. तिच्या वयाच्या मुलींच्या अडचणी दूर व्हाव्यात, त्यांचे गैरसमज दूर व्हावेत, यासाठी उपक्रम हाती घेतला," त्यांनी सांगितलं. 
- प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment