Friday 22 November 2019

तुमची मुलं निरोगी आहेत? (बातम्या : तुमच्या आमच्या मुलांच्या)

समाज निरोगी असावा यात कोणाचंच दुमत नाही. निरोगी समाज म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीचं शरीर आणि मनही निरोगी असणं. शरीर स्वस्थ तर मनही स्वस्थ राहण्यास मदत होते. महत्त्वाचं काय, तर शारीरिक आरोग्य. समाजाचा एक महत्त्वाचा घटक विद्यार्थी, तेच जर आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रासलेले असतील तर समाज सशक्त कसा काय घडेल? आणि जर ते विद्यार्थी पालिका शाळेतील असतील तर आणखीनच अवघड. कारण या विद्यार्थ्यांची जबाबदारी पालिकेची असते.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा वार्षिक अहवाल जाहीर केला. पालिकेच्या सगळ्या १,१८७ शाळांमधील सव्वा दोन लाख मुलांच्या आरोग्याची तपासणी वर्षभरात करून हा अहवाल तयार करण्यात आला. या मुलांपैकी ३४ हजार मुलांना दीर्घकाळ उपचारांची गरज आहे हे लक्षात आलं. पालिका शाळेत येणारी मुलं ही गरीब वस्त्यांमधून येतात. या मुलांना पोषण आहारात खिचडी दिली जाते. जीवनसत्त्वांची औषधंही दिली जातात. मुलांची दरवर्षी आरोग्यतपासणी केली जाते. तरीही ३४ हजार मुलं दीर्घकाळच्या आजारांना बळी पडतात. यातून स्पष्ट होतं की वार्षिक आरोग्य तपासणी गांभीर्याने घेतली जात नाही.
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांपैकी तब्ब्ल सव्वा लाख विद्यार्थ्यांना दातांच्या समस्या असून सुमारे सात हजार मुलं कमी वजनाची आहेत. इतर आजार म्हणजे त्वचेच्या समस्या, नाक-कान घशाच्या तक्रारी, दृष्टिदोष अश्या विविध समस्या विद्यार्थ्यांना असल्याचं अहवालातून पुढं आलं. अशा आजारांमध्ये ही मुलं अभ्यास कसा करत असतील? त्यांचे पालक किती स्वस्थ असतील, हे प्रश्न मनात येतातच. कारण या मुलांचे पालक कुठे ना कुठे तरी कष्टाची कामं करत असतात. त्यांची मुलं आजारी असतील, तर ते आपल्या कामात योग्य योगदान देऊ शकतील का? समाज हा अनेक व्यक्तींचा, अनेक कुटुंबांचा आणि समाजातील अनेक घटकांचा मिळून बनलेला असतो. त्यातील एक जरी घटक दुबळा असेल तर समाजस्वास्थ्य कसं बरं टिकेल? पालिका शाळांमधून शिकून आलेल्या मुलांचं म्हणणं आहे की ही थातुरमातूर तपासणी असते. तपासताना भराभर तपासलं जातं. काहीही चौकशी न करता पुढच्या मुलाला तपासायला घेतलं जातं. अमन नावाच्या मुलाने मुलाखतीद्वारा हे माध्यमांसमोर सांगितलं. भविष्यात हेच विद्यार्थी सर्वांगाने सशक्त नागरिक होणार असतात. त्यांचं योग्य पालनपोषण होणं समाजाच्या दृष्टीने चांगलंच ठरेल. 
- लता परब

No comments:

Post a Comment