Friday 22 November 2019

नकळतपणे आम्ही एकमेकींना काही देत घेत रहातो (पहिली पावलं)

नुकतंच पाचवं वर्ष पूर्ण झालेली नात आहे माझी. २०१२ साली माझ्या यजमानांच्या दुर्दैवी निधनानंतर ‌एक उदास छाया माझ्या घरादारावर दाटून राहिलेली होती. २०१४ला माझी मुलगी मानसी बाळंतपणासाठी मुंबईला आली नंतर १० जुलै १४ला तीला मुलगी झाली. मी व‌ माझी मोठी कन्या दिप्ती आनंदाने भरुन पावलो.
हीच‌ माझी नात मिष्टी‌ म्हणजे कस्तुरी जिच्या बाललिलांनी एवढा आनंद दिला की दु:खाची छाया धूसर झाली. तिच्या दुसऱ्या आजी-आजोबांनीही या नातीच जंगी स्वागत केलं.
मिष्टी नावाप्रमाणेच गोड, हुशार आहे. तिची शाळा, अभ्यास यामुळे तिच्याबरोबर फारसा वेळ आता मिळत नाही पण जेव्हा मिळतो तेव्हा आजी व नातीची छान गट्टी जमते. कधी एकत्र बसून चित्र काढणं, रंगवण‌ यात आम्ही दोघीही रंगतो.
तिला न संपणारी लांब गोष्ट जेव्हा रचवून सांगावी लागते. तेव्हा माझ्या मुलींच बालपण आठवतं. मग वेळ कसा, कुठे गेला कळत नाही. सुट्टीत तिच्याबरोबर पत्ते, सापशिडी वगैरेचे डाव पुन्हा पुन्हा न थकता खेळताना एक नवी उर्जाच मिळत असते. तिला माऊ खूप आवडते मग बाहेर कुठेही माऊ दिसली की तिला दूध द्यायचा तिचा गोड हट्ट असतोच.
आज्जी म्हणून तिच्यासाठी गोष्टींची पुस्तकं आणणं किंवा तिनं काही आणायला सांगितलं आणि आठवणीने आणलं की ती खूष असते. मुलांना वाढवताना आजच्या पालकांपुढे अनेक आव्हानं आहेत. मुख्य म्हणजे त्यांना वेळ देणं व त्यांना समजून घेत कधी प्रेमाने तर प्रसंगी कठोर होत त्यांना घडवणं हे तिचे आई- बाबा करताना मी पहात असते. मोबाईल, टीव्ही वरचे कार्टून वगैरेचा कधीही अतिरेक होऊ देत नाहीत. ती तशी अजून लहानच आहे पण पुढे पुढे आव्हानं कठिण आहेत यात दुमत नाही. मुलांचं निरागस बाल्य जपतच त्यांना घडवणं जमलं पाहिजे. आता एकत्र कुटुंबं राहिली नाहीत, वाढत्या मुलांना कुटुंबात निःसंकोचपणे आधार वाटला पाहिजे. एकमेकांविषयी मैत्र भावना निर्माण व्हावी.
मिष्टीबरोबरची एक सुंदर आठवण मला सांगाविशी वाटते ती अशी की माझ्या छोट्याशा बाल्कनी गार्डन मधलं सुंदर रबर प्लॅन्ट एकदा माकडांनी तोडून विद्रुप केलं ते पाहून मला व तिलाही खूप वाईट वाटलं. नंतर ते झाड वाढता वाढेनां. मी तसंच त्याला न चुकता पाणी देत राहिले. पुढे मी एकदा मुंबईला बरेच दिवसांसाठी गेले होते व परतल्यानंतर ती मला बाल्कनीत घेऊन गेली आणि झाडाला नविन पालवी फुटलेली दाखवली मला हे फार लोभस वाटलं. नकळतपणे आम्ही एकमेकींना काही देत घेत रहातो.
मुलांचं जग झपाट्याने बदलतंय. त्यांच अवकाश विस्तारतंय. नात्यांचे हे रेशमी बंध दृढ व्हावे याकरिता प्रेमाचं, मायेचं शिंपण करत रहायचं.
- अनुराधा खरूडे

No comments:

Post a Comment