Friday 22 November 2019

नवी उमेदचे वाचक अशोक निनाळे यांनी लिहून पाठवलेला अनुभव -

निलंगा इथल्या डी के इंग्लिश स्कुलमध्ये अशोक निनाळे शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेतली ही गोष्ट त्यांच्याच शब्दांत -
काल घडलेला एक प्रसंग तुमच्या सोबत शेयर करतो आहे.
हा प्रसंग माझ्यासारख्या प्रत्येक शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी आहे.
काल आमच्या शाळेत घटक चाचणी परीक्षेबाबत पालक मेळावा ठेवण्यात आला होता, अश्या पालक मेळाव्याचे प्रत्येक घटक चाचणीनंतर आमच्या शाळेत आयोजन केलं जातं. पालक मेळाव्यातून खूप काही अनुभव येतात. पालकांच्या विचारांच्या खूप जवळ जाता येत. पालकांची त्यांच्या पाल्याप्रति असलेली तळमळ पाहायला मिळते, फक्त तळमळच नाही तर त्यांनी सुद्धा त्यांच्या पाल्याला जास्तीत जास्त गुण मिळण्यासाठी केलेला प्रयत्न सुद्धा दिसून येतात.
आशिष बिराजदार तिसरीच्या वर्गात शिकतो आणि या वर्गाचा मी या वर्गाचा शिक्षक आहे आणि त्यांना गणित विषय शिकवतो. 15 दिवसांपूर्वी घटक चाचणीच्या धरतीवर मी एक क्लास टेस्ट घेतली आणि आशिषला क्लास टेस्ट मध्ये 20 पैकी फक्त 2 गुण मिळाले. मिळालेल्या 2 गुणांचं मला आश्चर्य वाटलं नव्हतं कारण आशिषचे आमच्या शाळेत याच वर्षी ऍडमिशन झालं आहे आणि तो असातसाच अभ्यास करायचा. तो नवीन असल्यामुळे तो माझ्याशी बोलायलाही घाबरायचा. या सर्व कारणांमुळे मला त्याची गुणवत्ता कमीच वाटत होती आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे थोडसं दुर्लक्ष ही व्हायच.
क्लास टेस्टचे गुण जेव्हा मी माझ्या वर्गाच्या व्हॅटसप ग्रुपवर टाकले. आणि अगदी 10 मिनिटांत आशिषच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी मला विचारलं की आशिष बिराजदारच नाव गुणांच्या यादीत दिसत नाहीये. यावर मी त्यांना समजावून सांगितलं, की आशिषला कमी गुण मिळाले असतील आणि गुणांची यादी फक्त पहिल्या क्रमांकापासून ते तिसऱ्या क्रमांकापर्यंतचीच आहे. त्यांनी बरं असं म्हणून फोन ठेवला.
त्यांनी फोन ठेवला. पण त्यांना त्यांच्या पाल्यामधील कमतरता जाणवली आणि आशिष सोबत तेही अभ्यासाला बसले. आशिषची आई त्याचा अभ्यास घेऊ लागली. क्लास टेस्टमध्ये घेतलेल्या कमी गुणांची खंत आशिषच्या पालकांना शांत बसू देत नव्हती. आशिषचा जेवढा अभ्यास शाळेत होत होता तेवढाच अभ्यास यांनी घरीही घ्यायला सुरुवात केली.
पालक मेळाव्याच्या दिवशी आशिषची आई सांगत होती, आशिष शाळेतून घरी आल्या आल्या मी लगेच आशिषला त्याचा होमवर्क विचारत होते. आणि पहिल्या घटक चाचणीच्या आदल्या दिवशी
अक्षरशः पूर्ण रविवार त्यांनी अभ्यास घेतला. त्या सांगत होत्या, की 3 ते 4 प्रश्न पत्रिका त्यांनी स्वतः तयार करून आशिषकडून सोडवून घेतल्या. आशिषची पहिली घटक चाचणी संपली आणि आता त्याचे पालक घटक चाचणीच्या निकालाची वाट पाहू लागले.
आणि काल ती वेळ आली. पण दिवसभर लागून असलेला पाऊस आणि जास्तीत जास्त पालक ग्रामीण भागातले असल्या कारणाने कमी जण येतील असा अंदाज आम्ही बाळगत होतो. पण सर्व अडचणींना तोंड देत बघता बघता जवळपास सर्वच पालकांची हजेरी लावली. त्यात आशिषचे पालकही आले. माझे आशिषच्या पालकांचे बोलणे झाले. मी एक एक विषयांचे गुण आशिषच्या पालकांना दाखवण्यास सुरुवात केली. आताचे हे गुण मला आश्चर्यचकित करणारे होते. त्यातल्या त्यात माझ्या विषयामध्ये ज्या आशिषने क्लास टेस्ट मध्ये 20 पैकी फक्त 2 गुण घेतले होते त्यातच आता प्रथम घटक चाचणीत 25 पैकी 22 गुण घेऊन दाखवले होते. यावर मी त्याला प्रश्नही विचारले. त्याची अचूक उत्तरंही आली. यावरून त्यांनी कसलीही कॉपी केली नाही हेही आढळून आलं.
खरंतर आशिषच्या आई पालक मेळाव्याला नाही तर आशिषचे गुण बघायला आल्या होत्या. त्याच्या आईने त्याच्या प्रगतीबद्दल ठरवलं आणि करूनही दाखवलं.
या त्याच्या सुधारणेवरून माझ्या लक्षात आलं, की शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वर्गात जेवढे कष्ट घेतात तेवढेच कष्ट पालकांनाही घरी आपल्या पाल्याबद्दल घ्यावे लागतील तेव्हाच कुठे तरी आपला पाल्य प्रगतिपथावर दिसून येईल.
"जो पर्यंत आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा म्हणजे शिक्षकाला स्वतःची परीक्षा वाटणार नाही, जो पर्यंत आपल्या पाल्याची परीक्षा म्हणजे पालकाला स्वतःची परीक्षा वाटणार नाही तो पर्यंत
पालकांचा पाल्य आणि शिक्षकांचा विद्यार्थी उत्कृष्ट घडणार नाही."
- अशोक डी निनाळे

No comments:

Post a Comment