Tuesday 13 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 5

माझ्या शाळेबद्दल जितकं लिहावं, तितकं कमीच. मोठी दूरदृष्टी ठेवून तिने आम्हा मुलींना घडवण्याचा प्रयत्न केला. मी इतर उपक्रमांबद्दल सांगितलंच आहे. पण, सर्वात स्तुत्य उपक्रम म्हणजे आपल्या दृष्टीहीन मुलींना बाहेरच्या जगाची, त्याच्या अंधत्वाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची जाणिव करून देणं. मुलींना शक्य तितकं सक्षम करणं, हेच शाळेचं मुख्य धोरण. याचसाठी आमची शाळा सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं की, मुलींना डोळस मुलांच्या शाळेत पाठवत असे.
“Inclusive Education” म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण पद्धती. ही संकल्पना समाजात मूळ धरण्यापूर्वीपासूनच दृष्टीहीन विद्यार्थीनींना जवळच्या सरस्वती हायस्कूल, नायगाव या शाळेत पाठवलं जायचं. या शाळेत पाठवण्यामागचा उद्देश असा की, मुलींच्या मर्यादित, बंदिस्त आणि अतिशय सुरक्षित वातावरणातून त्यांना खऱ्या जगाची ओळख व्हावी, जेणे करून महाविद्यालयात गेल्यावर सगळंच अगदी नवीन नसावं. मुलींना डोळस व्यक्तींमध्ये व्यवस्थित वावरता यावं. खरंच, किती दूरदृष्टी होती शाळेकडे!
याच शाळेत विद्यार्थीच नव्हे, तर कितीतरी असे शिक्षक होते, ज्यांना अंध व्यक्तींशी कसं बोलावं वा वागावं याची कल्पना नव्हती. जसजशा, दरवर्षी दृष्टीहीन विद्यार्थिनी वाढत गेल्या, तसतशी त्यांची सर्वांना सवय झाली. शिवाय, नृत्य आणि गायन प्रकारात या मुलींना असलेली गती हेसुद्धा कुतुहलाचं कारण बनलं होतं.
पुढे पुढे तर वार्षिक स्नेहसंमेलनासारख्या भव्य सोहळ्यात या दृष्टीहीन विद्यार्थिनींचा सहभाग अनिवार्य झाला. या माझ्या शाळेची अगदी ठसठशीत असलेली आठवण म्हणा किंवा मला लाभलेली देणगी म्हणा. “अभ्यास जत्रा.” खूपच मनोरंजक आणि आव्हानात्मक असा हा उपक्रम. त्यावेळचे मुख्याध्यापक शशिभूषण गव्हाणकर यांच्या बाबांनी सुरू केला होता. सरांचे बाबा म्हणून आम्हा सर्वांचेही बाबाच. या जत्रेत प्रत्येक वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना दोन तीन जणांच्या गटात विभागलं जाई. प्रत्येक गटाकडे विषय ठरवून दिले जात. इतिहासाचा गट एखादी घटना अभिनयातून समजावून देई. तर विज्ञानाचा गट छोटे मोठे प्रयोग करून दाखवत असे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे गट अभ्यासेतर कविता बोलून दाखवत. त्यांचे अर्थ स्पष्ट करणारे पोस्टर्स बनवत. यात उत्साह वाढत होताच शिवाय इतर
शाळांच्या शिक्षकांनी केलेलं कौतुक आणखीच आत्मविश्वास वाढवून जायचे. बरेचदा, बाबा स्वतः येऊन काही प्रश्न विचारत. त्यांचा आवाज ओळखलाच, तर हसून उत्तरं देत असू आम्ही. पण, जर का ते पाहुण्यांसोबत असले, तर मात्र नीट समजावून आपलं पोस्टर दाखवत असू. खरंच, काय मिळालं बरं मला या प्रकारच्या उपक्रमातून? ही शाळासुद्धा तितकीच माझी आहे, जितकी माझी कमला मेहता ही जाणीव या जत्रेने करून दिली पहिल्यांदा.
अनोळखी लोकांसमोर एखाद्या विषयावर धीटपणे कसं बोलावं, हेही प्रात्यक्षिक इथेच झालं. आणि, इतर विद्यार्थ्यांचा दृष्कोिन बदलला. या मुलींनाही आपल्यासारखाच अभ्यास असतो आणि त्याही मेहनत करून चांगलं प्रेजेंटेशन करू शकतात. हे इतर डोळस मुलांना कळलं आणि काही मुलींनी स्वतःहून मैत्री करायला सुरुवात केली. मी मला सिद्ध करू शकले, या उपक्रमामार्फत, हेच खरं. आता तिथे म्हणे ‘अभ्यास जत्रा’ भरत नाही. मुलांना स्वतःतल्या उणिवांवर मात करून त्यांना जमेच्या बाजूमध्ये बदलू शकणारी जत्रा बंद? या पेक्षा खेदाची बाब नव्हे.
- अनुजा संखे

No comments:

Post a Comment