Tuesday 13 February 2018

जेव्हा लष्करी अधिकार्‍यांच्या पत्नी एकत्र येतात

अ‍ॅड मीनल वाघ भोसले यांचे पती नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन सेंटरमध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यंच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पोस्टींगदरम्यान लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा ताण मीनलेने अनुभवला. मित्रपरिवारातील एका अधिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबाची सुरू झालेली वाताहत मीनल यांना अस्वस्थ करून गेली. याच कालावधीत चीता आणि चेतक हेलिकॉप्टर्सचे १४ हून अधिक अपघात झाले. त्यामध्ये १७ हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले. पतीसोबत चर्चा करताना समजलं की कालबाह्य आणि सदोष लष्करी सामग्रीमुळे लढाऊ विमानांचे अपघात होत असून त्यामुळेच वैमानिकांचे जीव जात आहेत. अशा अपघातांत नाहक जाणारे बळी रोखण्यासाठी त्यांनी आवाज उठवण्याचा निर्धार केला. पती लष्करी अधिकारी असताना त्याच यंत्रणेविरोधात आवाज उठवणं अवघडच. लष्करी अधिकाऱ्यांच्या समविचारी पत्नींना सोबत घेत त्यांनी चार वर्षापूर्वी ARMY WIVES AGITATION GROUP अर्थात लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नीची संघटना स्थापन केली.
लष्करी अधिकारी आणि जवानांचे नाहक जाणारे बळी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी कालबाह्य, सदोष लष्करी सामग्रीचा वापर थांबविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन मिग २१ विमानाप्रमाणे अपघातांच्या मालिकेत सापडलेल्या लष्कराच्या चीता व चेतक हेलिकॉप्टर्सचा वापर त्वरित थांबवावा, अशी आग्रही मागणी केली. या मागणीला पर्रिकर यांनी प्रतिसाद देत काही तांत्रिक पर्याय दिले. लष्कराची लढाऊ विमानांची गरज पाहता ही खरेदी पैसे असूनही लगेच शक्य नसल्याने चीताच्या जुन्या इंजिनऐवजी नवीन इंजिन बसवून त्याचं नामकरण ‘चित्तल’ असं करण्यात आलं. दुसरीकडे, स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून ‘कामाऊ’ हे नवीन लढाऊ विमान लष्करी सेवेत दाखल केलं गेलं. हे सगळं मार्गी लागत असताना मीनल यांच्या संघटनेने अपघातात मृत्यू पावलेल्या जवानांच्या पत्नींना त्यांचा आर्थिक हिस्सा मिळावा यासाठीही काम सुरू केलं आहे. या प्रयत्नांमुळे एका वीरपत्नीला मुंबई परिसरात पेट्रोलपंपासाठी जागा मिळणार आहे.

 -प्राची उन्मेष

No comments:

Post a Comment