Thursday 8 February 2018

आहे तालासुराची श्रीमंती, तरीही..

प्रभाकर जगदाळे. उस्मानाबादेत राहणारा हा ज्येष्ठ संगीत कलाकार. त्यांचं नाव माहिती नाही, असा उस्मानाबादकर शोधूनही सापडणार नाही. महाराष्ट्र म्युझिक क्लब, कुमार ऑर्केस्ट्रा, मेमोरियल मेलडी, यादे पुरानीमध्ये कोंगोट्रिपल वादन आणि गायन करून 1972 ते 1995 हा काळ गाजविलेला हा कलावंत. सुमारे अर्ध शतक संगीत क्षेत्रात अव्याहतपणे काम करतोय. पण, पदरी यश नाही. ज्या गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं, त्या गाण्यांवर कॅसेट कंपन्यांनीच हक्क सांगितला. आणि जगदाळे मोबदल्यापासून वंचित राहिले. ताल, सुरांची श्रीमंती. पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे नाहीत. शेवटी त्यांनी राहतं घर विकलं. त्यातून आलेल्या पैशातून वाद्यं खरेदी केली. आणि संगीत अकॅडमी सुरु केली.
आराधीवर्गामध्ये लोकप्रिय असणार्‍या ‘तुळजापूरची जत्रा’,‘माता तुळजाभवानी’, ‘तुळजाभवानी अमृतवाणी’ या आल्बममधल्या गाण्यांना जगदाळे यांनी संगीत दिलं आहे. ‘प्रीतीचा बंगला’ या कोळीगीतांचं लेखन आणि संगीत जगदाळे यांनी केलं आहे. ‘सत्यसावित्री’ चित्रपटातील गाण्यांसाठी जगदाळे यांनी संगीत दिलं असून, शशीकांत मुंबरे, शंकुतला जाधव, अंजली नांदगावकर, संचिता मोरजकर, श्रीकांत नारायण (मुंबई) यांनी ही गाणी गायिली आहेत. ‘सत्य सावित्री’, ‘ओटी जगदंबेची’, या मराठी चित्रपटातील एकूण नऊ गाण्यांना जगदाळे यांचं संगीत आहे.
पदरी निराशा, अपयश आणि उपेक्षा आली तरीही ते खचले नाहीत. कलेचा हा वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांनी इंडो वेस्टर्न म्युझिक कला अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला. संगीत अकॅडमीसाठी लागणाऱ्या गिटार, होम थिएटरसाठी लागणारे ५० हजार रुपयेही हाती नव्हते. त्यांनी घरविक्रीतून आलेली रक्कम यासाठी खर्च केली.
जगदाळे यांनी तयार केलेल्या किंवा संगीत दिलेल्या गीताला राज्यस्तरावर नेण्यासाठी त्यांची ताकद कमी पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘निर्मल भारत, सुंदर भारत’ या गाण्याची रचना त्यांनी केली असून, या गाण्याचं रेकॉडिंगही झालं आहे. नुकतीच त्यांनी दोन देशभक्तीपर गाणी तयार करून संगीतबध्द केली आहेत. गाणी दर्जेदार असूनही या गाण्यांचा आवाज समाजापर्यंत पोहोचला नाही. शिवाय पूर्वानुभव विचारात घेता ही गाणी कुणाच्या हाती द्यावीत, असा प्रश्न आता जगदाळे यांना पडला आहे.

- चंद्रसेन देशमुख.


No comments:

Post a Comment