

जाधव बंधूनी 2015 मध्ये, अर्धा एकरात नऊ लाख रूपये खर्च करून सेडनेट उभारलं. त्यात काकडीचं पीक बहरात आले होते. काकडीची पहिल्या तोडणीची पट्टी 60 हजार रूपये आली होती. 6 जून 2015 मध्ये, रात्री आलेल्या चक्रीवादळ आणि गारपिटीत सेडनेट भुईसपाट झाल्याने जाधव यांचं अठरा लाख रूपयांचं नुकसान झालं. या संकटातून सावरून त्यांनी पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आहे.
आता 20 एकर शेतीपैकी तीन एकरात जाधव यांनी नोव्हेंबर 2017 रोजी क्लश सिडस 885 या वाणाची लागवड केली आहे. यासाठी त्यांना मल्चिंग पेपर, भेसळ खत, शेणखत, पिकासाठी सुरक्षा पेपर, फवारणी, मजुरी असा एक लाख 20 हजार रूपयांचा खर्च आला आहे. सध्या खरबुजाचं पीक काढणीला आलं आहे. पिवळसर रंग आणि गोड चवीचं 32 टन खरबूज बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात निर्यात होणार असून सहा लाख रूपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.
याच गावातून आधी दोन किलोमीटर पायपीट करून डोक्यावर हंडा घेऊन शेतात जावं लागायचं. आता तिथंच जाधव बंधूंनी आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांनी आता ठिबक सिंचन, तीन विहिरी, 26 बोअर शेतीत घेतले आहेत. त्यात विशेष म्हणजे अडीच एकर शेतीत 29 लाख रूपये खर्चाचं शेततळं खोदलं आहे. 96 बाय 86 स्क्वेअर मीटर शेततळ्याची खोली स्लोपमध्ये 39 फूट आहे. सध्या पूर्ण क्षमता असलेल्या शेततळ्यात चार कोटी 20 लाख लिटर पाणी साठलेलं आहे. आता एप्रिलपासून याच पाण्यावर शेती फुलणार आहे. या शेतीत जवळपास दीड कोटी रूपयांची गुंतवणक त्यांनी केली आहे.
शेती करत असतांना आलेल्या अनभुवनातुन आणि नफा, तोट्यातून शेतकरी दत्तात्रय जाधव, शंकर जाधव या दोन भावांनी जवळपास ४०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. २४ वर्षापूर्वी सूर्यफूल, बाजरी, तूर, ज्वारी ही पारंपरिक पिकं घेणाऱ्या या शेतकऱ्यांनी आज टरबूज, खरबूज, शिमला मिरची, काकडी अशी नफा देणारी पिकं घेत क्रांतीच केली आहे.
- दिनेश लिंबेकर, बीड
No comments:
Post a Comment