Monday 24 September 2018

गावानं अभिनंदनाचे बॅनर्स लावलेला शिक्षक

"चांगला माणूस होण्यासाठी१५ टक्के ज्ञान आणि ८५ टक्के नम्रता हवी." यंदाच्या मायक्रोसॉफ्ट आय सी टी पुरस्कारानं सन्मानित सुनील आलूरकर सांगत होते. आलूरकर नांदेड जिल्ह्यातल्या आलूर गावचे. वडिलांची शेती. घरची परिस्थिती साधारण. वडील शिकलेले नव्हते, मात्र मुलानं खूप शिकावं ही इच्छा. मग पाचवीपासून पुढलं शिक्षण मामाकडे, अलिबागला. बी.एड झाल्यानंतर पुन्हा गावाला.
१५ वर्ष शिक्षण क्षेत्रात असलेल्या आलूरकर सरांचा आदर्श शिक्षक म्हणून खरा प्रवास सुरू झाला २०१३ पासून. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातल्या हिंगणी गावातली जिल्हा परिषद शाळा. शाळेची परिस्थिती बिकटच. मुलांना शाळेविषयी, अभ्यासाविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून सर लॅपटॉप वापरू लागले. दृक्श्राव्य माध्यमाचा वापर शिकवण्यासाठी होऊ लागला. गावात शिवजयंतीचा कार्यक्रम. डीजे, मिरवणुका यावरचा खर्च वाचवूया, तो शाळेसाठी खर्च करूया. सरांचं आवाहन. वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा राजू पाटील आणि प्रा संतोष देवराये यांनी गावकऱ्यांचं प्रबोधन केलं. गावकऱ्यांनी कल्पना उचलून धरली आणि शाळेत प्रोजेक्टर आला. रिसोर्स बँक तयार झाली. विविध साधनांच्या वापरामुळे मुलांना विषय चांगले समजू लागले. आवडू लागले. परिणामी २०१३ला शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. त्यांच्या कामाची दखल राज्य आणि देशपातळीवर घेतली गेली. गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. गावानं जागोजागी त्यांचे बॅनर्स, होल्डिंग लावले. एखाद्या शिक्षकाचे असे बॅनर्स लागण्याची ही पहिलीच वेळ. सध्या २०१८ पासून माहूर तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या शाळेत ते कार्यरत आहेत.
आलूरकर सरांची कामगिरी एका शाळेच्या यशापुरता मर्यादित नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी घडवलेली क्रांती उद्याच्या भागात.
-उन्मेष गौरकर.

No comments:

Post a Comment