Friday 21 September 2018

ना कुठलं कर्ज, ना अनुदान, केवळ बचतीतून भांडवल

नाशिक जिल्हातील इगतपुरीमधलं बलायदुरी गाव. या गावातला राणी लक्ष्मीबाई महिला बचतगट. शासनाच्या तालुकास्तरावरच्या कृषी प्रशिक्षणाचा लाभ गटानं घेतला आणि ५-६ वर्षांपूर्वी मिरचीची शेती सुरू केली. पूर्वी पाचपाणी पद्धतीन शेती व्हायची. मात्र अत्याधुनिक तंत्रामुळे सुरुवातीला एकरी २५ ते ३० हजार रुपयांच्या घरात मिळणारा नफा आता एकरी ६-७लाख रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गटावर कुठल्याही बँकेचं कर्ज नाही, गटानं कधी शासनाचं अनुदान घेतलं नाही. केवळ बचतीतून गटानं भांडवल उभं केलं आहे. बलायदुरीसारख्या छोट्या गावात महिला सक्षमीकरणाचा संदेश रुजावा यासाठी भगीरथ भगत यांनी 2006 मध्ये या गटाची स्थापना केली. महिलांसोबतच्या संवादात अडथळा येऊ नये म्हणून आईला गटात सहभागी करून घेतलं. नंतर पत्नी माधुरी गटाची धुरा सांभाळू लागल्या. महिन्याला ५० रुपये बचत. राष्ट्रीयकृत बँकेत खातं. अडचणीत हेच पैसे उपयोगी पडणार असल्याचं सांगत माधुरी बचतीला प्रोत्साहन द्यायच्या. आज बचत २०० रुपयांवर पोहोचली आहे.
सदस्यांच्या घरात आपत्कालीन परिस्थिती उदभवली तर मदतपेटी तयार करण्यात आली आहे. रुक्मिणी भगत यांच्या बैलाचा मृत्यू झाला तेव्हा आणि वादळात लता चव्हाण यांच्या घराचं छप्पर उडून गेलं तेव्हा ही मदतपेटीच कामी आली. कोणाच्या घरात मंगलकार्य असल्यास ३० हजार रुपयांचं कर्ज. तर कोणाच्या मुलीचं लग्न झालं तर तिला दोन किंवा तीन हजाराचं अर्थसहाय्य.
या गटाला अलीकडेच पुण्यात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बायफ मित्र संस्थेच्या डॉ. मणिभाई देसाई गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. देशपातळीवर वैशिष्ठयपूर्ण काम करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो.
यावेळी केसरकर यांनी बचतगटाच्या कामाचं कौतुक केलं. प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी बचतगट उपयुक्त ठरल्याची भावना माधुरी भगत यांनी यावेळी व्यक्त केली.
प्राची उन्मेष, नाशिक

No comments:

Post a Comment